बदली

Wednesday, 30 September 2020

बालकवी एक निसर्ग

 आज बालकवींचा स्मूती दिवस...त्या निमित्ताने....


*बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे*

 (जन्म : धरणगाव, १३ आॅगस्ट १८९०; मृत्यू : जळगाव, ५ मे १९१८) हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. इ.स. १९०७ मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी ठोंबऱ्यांना बालकवी ही पदवी दिली. बालकवींची कारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती.



 *बालकवी एक निसर्ग*


      1907 साली जळगाव येथे पाहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले.त्या कविसंमेलनात सतरा वर्षाच्या ठोंबरे यांनी आपल्या काही कविता वाचून दाखविल्या.त्यांना संमेलनात उपस्थित असलेल्या सर्व रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.ठोंबरे यांचे वय व त्यांच्या कवितेतील आशय लक्षात घेऊन या संमेलनाने त्यांना 'बालकवी' ही पदवी बहाल केली.

            ' बालकवी ' हे शब्द उच्चारताच फुलराणी,श्रावणमास,औदुंबर,निर्झराज,पाखरास,अरुण,अप्सरांचे गाणे ह्या कवितांची नावे एखादया चित्रपटाप्रमाणे डोळ्यापुढे पटापट सरकत जातात.

           बालकवी म्हणजे निसर्गकवी.हे समीकरण रसिकमनामध्ये दृढमूल झालेले आहे.बालकवींचे काव्य म्हणजे निसर्ग.अवती भोवतीच्या सजीव-निर्जीव सृष्टी भोवतालचा प्राकृतिक निसर्ग हाच बालकवींच्या कवितेचा आशय होता .त्याच्या जीवनविषयक अनुभूतीची ,कल्पनांची ,विचारांची आणि सुख-दुखात्मक जाणीवांची परिभाषा निसर्गाच्या प्रतिमांचीच होते.त्यांचे पूर्ण भावजीवन निसर्गरूपातूनच प्रत्ययास येते.बालकवींच्या प्रत्येक कवितेमध्ये निसर्गाचे दर्शन होते.'फुलराणी' ही कविता तर फारच बोलकी आहे.


            *फुलराणी*: -  1910-11 या काळात बालकवींच्या ज्या अनेक कविता मासिक मनोरंजनातून प्रथम प्रसिद्ध झाल्या त्यातच फुलराणी ही होती.

         *'हिरवे हिरवेगार गालिचे*

          *हरित तृणांच्या मखमालीचे*'

            या पहिल्याच ओळीपासून दृक आणि स्पर्श संवेदनेच्या पाकळ्या या अलगद फुलू लागतात.साध्याभोळ्या फुलराणीचे गोजिरवाण्या सुर्यकिरणांशी विवाहमंगल लावून दिले आहे.

*"प्रणयचिंतनी विलीनवृत्ति-कुमारीका ही डोलत होती;*

         *डुलता डुलता गुंग होवून-स्वप्ने पाही मग फुलराणी"*

           हया ओळी वाचल्यानंतर डोळ्यापुढे एक स्वप्न संगमात रमणारी खरोखरची मानवी मुग्धा कुमारीकाच उभी राहते.

             बालकवींनी आपल्या प्रत्येक  कवितेमध्ये निसर्गाचे रूप शब्दबद्ध केले आहे.निसर्गाचे उदात्तीकरण करतांना ते किती परींचा वापर करीत! निसर्ग सौंदर्याने तपशील ,निसर्ग दृश्याचे बारकावे ,निसर्गाच्या अंगप्रत्यगाचे वर्णन इत्यादींनी त्यांच्या कवितेचे अंतरंग ओतप्रोत भरलेले असे. निसर्गाविषयी आस्था ,निसर्गाविषयी कळकळ आणि याही पेक्षा निसर्गाविषयीची आत्मियता उफाळून येई.निसर्गाविषयी  किती बोलू आणि किती सांगू असे जणू त्यांच्या मनाला होऊन जाई.


*श्रावणमास*:-

             श्रावणमास ही अशीच एक अभिजात काव्यसौंदर्याने नटलेली नवनव्या कल्पनांनी कमनीय बनलेली श्रावणातील सुखाची रिमझिम जाणवून देणारी लक्षणीय कविता.तशा श्रावनमासावर अनेक कवींनी कविता लिहिल्या पण बालकवींची सर त्यातील फारच थोडयांना आलेली आहे.हे एक सुरेख बोलके शब्दचित्र आहे. 

*"श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे:*

*क्षणात येते सरसर शिरावे क्षणात फिरुनी ऊन पडे,*

*वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,*

*मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे!'*

           श्रावणमास ही कविता वाचताना श्रावण महात घडणाऱ्या 'इंद्रधनूचा गोफ','पंख भिजलेली पाखरे' ,'चरणारी गुरे','गाणी गाणारे गोप' इ.चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.


*खेड्यातील रात्र*:-

                 खेड्यातील रात्र हया कवितेत खेड्यातील त्या रात्रीचे त्या उजाडमाळाचे भयानक सृष्टीरूप दिसून येते .

       *'ओढ्यात भालू ओरडती,*

        *वाऱ्यात भूते बडबडती,*

        *डोहात सावल्या पडती*

      *काळ्याशार त्या गर्द जातीमध्ये रात देत हुंकार.'*

          वरील कडव्यात श्रुतीसंवेदनेला आवाहान  केले आहे.ही श्रुतिसंवेदना तरी कशी? नि:स्तब्धतेतून आवाजाचे भेसूर विडंबन करावे तशी. 

    *भरराणी काकस्थानी*

     *उठतात ज्वाळ भडकोनी*

     *अस्मान मिळाले धरणी,*

      *आर ना पार अवकाळ रात्रिचा प्रहार घुमे तो थोर,'*

         हया कडव्यात दृकसंवेदना व श्रुतिसंवेदना यांच्या आवाहनांचा समन्वय साधला असून विचित्र भयाण नि निशब्द दबा धरणाऱ्या अदृष्टांच्या संदिग्धतेमुळे तो अर्थ भारावला आहे.


*आनंदी आनंद:-*

               हया कवितेसारखी कविता मराठी काव्यात सापडणे कठीण.कितीही वेळा वाचली तरी तो ताजेपणा,सौंदर्यशोधक वृत्ती ,धुंद बेहोशी यांची मोहिनी आपल्या मनाला आल्याशिवाय राहत नाही.

      *'सूर्यकिरण सोनेरी हे*

       *कौमुदि ही  हंसते आहे,*

       *खुलती संध्या प्रेमाने,*

        *आनंदे गाते गाणे,*

                   *मेघ रंगले,*

                   *चित्त दंगले,*

                   *गान स्फुरले,*

         *इकडे ,तिकडे,चोहीकडे*

          *आनंदी -आनंद गाडे!'*

         या सगळ्या काव्यपंक्तीतून कवीची रंगून गेलेली वृत्ती दिसते.व ती आपल्यालाही रंगून सोडते.


    *बालविहंग*:-

            या कवितेत सूर्यास्तानंतर संध्यासमयी  आकाशात वरवर उडत जाणाऱ्या पक्षाचे वर्णन आहे.कधी बालकवींना तो पक्षी कविप्रतिमेचे मूर्तरुप वाटते.तर कधी तो पक्षी एखाद्या भिंगरी सारखा आहे असे वाटे,आकाश देवता जणू एखाद्या बाळाला हातावर घेऊन  हिंदोळत आहे असे वाटे ,तर एखाद्या क्षणी वाटे की हा पक्षी नसून संध्या पुष्पांमधला परागकण आहे...

            'फुलराणी' या कवितेच्या प्रारंभी 'हिरवे हिरवे' पण ' गार ' गालिचे आहेत .आणि 'त्या सुंदर मखमली वरती' डोलणारी फुलराणी आहे.'श्रावनमासा ' त क्षणात सरसर शिरवे येते तर दुसऱ्या क्षणी 'पिवळे पिवळे ऊन' पडते.'औदुंबर' कवितेतील निळा सावळा झरा ऐल तटावर आणि पैलतटावरही हिरवळी घेऊन वाहत असतो......

            बालकवींच्या निसर्ग कवितांचा आस्वाद घेताना त्यांच्या तळमळणाऱ्या अस्वस्थ मनाचे भान ठेवलेच पाहिजे.'दिव्यरसी विरणे जीव जीवित त्यांचे नाव !'जीवनाचा अथवा जगण्याचा खरा अस्तित्वाअर्थ म्हणजे सृष्टीच्या दिव्यरसात स्वत:च असे विरून जाणे,विरघळून जाणे.अथवा या दिव्याशीच एकरूप होऊन जाणे. बालकवींच्या दृष्टीने जीवनाचा हा खरा अर्थ कळला 'निर्झराला'.'बालविहंगा'ला हा अर्थ कळला.'तारकांना' किंबहुना हा अर्थ कळला सृष्टीच्या सगळ्या बाळांना.

           बालकवींच्या निसर्ग कविता समजून घेताना त्याची भूमिकाही समजून घेतली पाहिजे.प्रेम,सौंदर्य,दिव्यत्व इ.ज्या ज्या  मूल्यांचा अभाव माणसाच्या लौकिक जीवनात आहे ,त्या मूल्यांचा साक्षात्कार बालकवींच्या सौंदर्यात होतो.

            त्यांच्या अशा अनेक कवितांमध्ये आपल्याला निसर्गाचे दर्शन घडत असते.आणि म्हणूनच म्हणावसं वाटते "बालकवी एक निसर्ग".


                   *संजय गरबड मराठे*

                   104, मेघदूत अपार्टमेंट,

                    व्हीनस सिनेमा मागे,

                    उल्हासनगर-4,(ठाणे)

                    पिन -421004

                    फोन 9421983888

2 comments:

  1. खूप गहन अर्थपूर्ण काव्य आहे सर हे.खूप छान वाटले वाचतांना शब्दांची ही जादू अशी आहे कि आपण त्या वातावरणात बसलोय असे वाटते..!!

    ReplyDelete

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...