बदली

Wednesday, 30 September 2020

नि:स्पृह देणं


💐 नि:स्पृह देणं 💐


    समाजातील काही व्यक्ती स्वतःची ओळख निर्माण करतात ती समाजासाठी करत असलेल्या कार्यातून. असेच एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व म्हणजे "श्री.संजय गरबड मराठे  सर".वेल्हाणे हे धुळे जिल्ह्यातील जन्मगाव असलेल्या सरांनी कर्मभूमी मात्र ठाणे जिल्ह्यात निर्माण केली,1997 पासून ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत तलासरी,भिवंडी आणि आता अंबरनाथ या तालुक्यांत प्राथमिक शिक्षक म्हणून आपला ठसा उमटवला.

  निस्वार्थ कार्यपद्धतीने ते आपल्या सर्वांना परिचित आहेत

     आज प्रशस्तीपत्रक मिळालं पण  खरं तर लौकिकार्थाने.

खरं तेव्हाच मिळालं जेव्हा ... अवकळा असलेली शाळा ...आदराने नम्र ,नतमस्तक होत यायला 

लावणारी *मराठेसरांची    शाळा*  म्हणून ओळखली जाऊ लागली.

         आजचा दिवस खरंतर श्रमसाफल्याचा, आपण चाललेली वाट मैलाचा दगड बनल्याची प्रचिती देणारा. शिक्षणाचे तत्व व फलित यामध्ये जेव्हा तफावत वाढत चालली होती त्यावेळी सुरू झालेले कार्य आजतागायत त्याच तळमळीने अव्याहत चालू आहे.



          मुलामुलींच्या शैक्षणिक समस्यांपेक्षा त्यांच्या मानसिक ,भावनिक,सामाजिक,नैतिक या व्यावहारिक स्वरूपाच्या समस्या सोडवत त्यांच्या मनात स्थान मिळवणारा दुर्मीळ शिक्षक तुमच्या रुपात समाजाला लाभला.  गुणवत्ता ही फक्त कागदावरच न राहता जेव्हा प्रत्यक्षात  वावरू लागते त्यावेळी तो शिक्षक - शिक्षक न राहता *गुरू* बनतो. आज त्याच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नि ज्यांनी तुमच्यात मार्गदर्शक बघितला त्यांच्या मनातल्या गुरूचा सन्मान झाला, म्हणून तो आमच्यासाठी सर्वार्थाने गौरवास्पद होता, कौतुकास्पद होता, अभिमानास्पद होता.

         शिक्षकी पेशा हा काळवेळ न मानणारा व्यवसायच जणू, अतिशय संवेदनशील कविमन नि समाजाप्रती तळमळ घेऊन आलेला एक व्यक्ती जेव्हा शिक्षक म्हणून सुरुवात करतो तेव्हा परिस्थिती काही फारशी अनुकूल नसते.

      कधीकधी शून्यातून केलेली सुरुवात सोपी असते ........आहे ती  परिचित रुळलेली व्यवस्था बदलण्यापेक्षा आणि हेच अवघड काम सुरू झालं अस्नोली शाळेत.

    असं कार्य होत असताना त्यामागचे कष्ट बरेचदा समाजापासून दूर राहतात, परंतु तसे न होता त्या कार्याची दखल घेणे प्रशासनासह  सहकाऱ्यांनाही भाग पडले. शाळेच्या प्रवेशद्वारापासूनच शाळा नम्रता अंगी बाणवत सुगंधी सुरुवात  करते नि विद्यार्थ्यांची किलबिल त्यांच्यातील गुणवत्ता, नि  प्रसन्नता शाळेची एकेक पायरी उलगडवत जाते.

        असं म्हणतात की शिक्षक हा फक्त शाळेचा नसतो तर साऱ्या गावाचा असतो. लोक त्याकडे विश्वासाचा , आधाराचा नि प्रत्येक समस्येवर उपाय शोधणारा समजत असतात. खरच या कसोटीवर10 ते 5  असे कामाचे तास न मानणाराच उतरू शकतो,असे कार्य उभे रहायला अंतर्मनातुन तळमळ लागते.

      आणि तो विश्वास तेथे निर्माण झाला म्हणून अनेकांनी मित्र ,मुलगा ,भाऊ या रुपात नातं जोडलं नि ते वेळोवेळी तुम्ही निभावलंही. सहकाऱ्यांनाही हक्काचा व योग्य सल्ला देणारा मित्र सापडला तुमच्यात . तुमचे विरोधक ते खंदे  समर्थक हा प्रवास तुमच्यातील माणूस अधोरेखित करतो.

        सामाजिक जाण नि भान जपत कित्येकांचे तारणहार बनलात तुम्ही, खरंतर तुमचे सामाजिक कार्य हा  स्वतंत्र लेखनाचा विषय परंतु आपल्या संस्कृती प्रमाणे दान हे कायम गुप्त ठेवायचे असते नाहीतर देणाऱ्याला अभिमान नि घेणाऱ्याला संकोच वाटतो.

     *कर्मन्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन*  पासून "यातून मला काय मिळणार"  हे पदोपदी भडिमार करणाऱ्या  जगतात आपण येऊन पोहचलो आहोत. आपल्या अनुभवातून शिकवण्याचं *देणं*  चालू ठेवलं नि म्हणून आयुष्याला कलाटणी देणारं संचित लाभलं ,हे असं निरंतर,निस्पृह देणं सतत चालूच राहणार कारण *देणं* हीच तुमची संस्कृती झालीय. तुम्ही हे समाजाला निस्पृहपणे देणं तुमच्या मुलांनी , विद्यार्थ्यांनी बघितलेलं आहे आणि हा खोल संस्कार त्यांच्यात रुजला गेलाय.

        *आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावे, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी*  या 'बाबा आमटेंच्या'  वचनाला अक्षरशः जगणारा माणूस , आनंदवनाच्या मातीचा कळवळा जपणारा माणूस दुसऱ्याच्या दुःखाने व्यथित न झाला तरच नवल.

         खरंतर व्यावसायिकता , प्रयोगशीलता आणि सामाजिक जबाबदारी यांचं संतुलन साधून दर्जेदार पिढी घडवण्याचे  कार्य  आपल्या विद्यार्थ्यांच्या आजच्या समाजातील स्थानावरून समजते.

आपला भवताल समजून घेऊ इच्छिणाऱ्या आणि स्वतः पलिकडील जग जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्या शिक्षकाला माणसांचा गराडा न पडता तरच नवल.

        खऱ्या अर्थाने अजातशत्रू असे व्यक्तिमत्त्व असणाऱ्या माणसाशी विद्यार्थ्यांसोबत पालकही नाळ जोडतात.  सर्वतोपरी आधार शोधतात, कित्येक माऊली लेकाचा भक्कम आधार तर लेकीसूना आपलं दुःख हलकं करतात. या प्रवासात आलेले सर्व खाचखळगे नि अडचणी यांना  हिमतीने भिडत ध्येय कधीही नजरेआड नाही होऊ दिले आणि त्याच हिमतीची दखल आज जगाला घ्यायला लावली .

      तोच हा दिवस ...तुमच्यासोबत सर्वांना आनंदाश्रूने न्हाऊ घालणारा, आदर्श शिक्षक म्हणून तुम्ही आहातच पण आदर्श मित्र ,भाऊ,पिता नि मुलगा ही आहात, नि याचा आम्हाला सार्थ अभिमानही.

     प्रस्थापितांविरुद्ध लढत वंचीत रानपाखरांना शाळेच्या मुख्य प्रवाहातच आणले  नाही तर जगण्याच्या लढाईत ताकदीने उभे केले, ते जेव्हा रस्त्यावर ही तुमच्या पायाशी वाकतात तेव्हा मिळतो आदर्श शिक्षकाचा पुरस्कार ... त्या विद्यार्थ्यांच्या निखळ निर्मळ नजरेत.

     जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकच नव्हे तर भावनिक विकासाचीही जबाबदारी घेतात नि तो विद्यार्थी जीवनात उच्च स्थानावर जाऊनही शिक्षकाला विसरत नाही तेव्हा मिळतो तो पुरस्कार. शिक्षक म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वात डोकावणारा शिक्षक आदर्श शिक्षकापेक्षा काय कमी असणार हो? तुम्ही विद्यार्थ्यांचे फक्त शिक्षक किंवा मार्गदर्शकच  नाही बनून राहिलात तर ज्या जीवनाच्या टप्प्यावर जी मदत लागेल ती पित्याच्या भक्कम पाठिंब्याने पुरवलीत, त्यामुळेच पित्याचे छत्र हरवलेला मुलगा लोकसेवा आयोगाच्या अत्युच्च स्थानी  स्वतःला सिद्ध करू शकला  नि परत गुरुकडे आल्यानंन्तर दक्षिणा म्हणून तुझ्यासारख्या मुलांना पुढे आणण्याचे परोपकारी काम त्याच्यावर सोपवणारे तुम्ही.

    खरंतर शिक्षणाबरोबर माणूस  घडवण्याचे काम ही अविरत सुरूच होते, प्रत्येक नवा उपक्रम आयुष्यभर पुरेल इतकी शिदोरी देणारा आहे.... विद्यार्थ्यांनाही आणि शिक्षकांनाही  नव्हे सर्वांनाच.    विद्यार्थी बँकेची सुरुवात ते यशस्वी 3,50,000 पर्यंत मारलेली मजल..... गावकऱ्यांचा किती विश्वास होता तुमच्यावर याची प्रचिती देतो.

       विद्यार्थी बँक तर गावातील कित्येक माऊलींच्या  संसारात पै पै वाचवून सुरक्षित ठेऊन एखादी वस्तू किंवा संसारातील वेळेवर येणारी अडचण सोडवणारी स्वयंपूर्ण नि आत्मनिर्भर करणारी यशस्वी योजना ठरली . विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने जीवनाच्या प्रवाहात कामी येणारे जीवनाचे ज्ञान देणाऱ्या उपक्रमांपैकी हा एक महत्वपूर्ण .... बचतीबरोबरच मानाने जगायला लावणारा.

        ज्ञान रचनावाद ,कृतीयुक्त अध्यापन हे आज प्रचलित शब्द परंतु 2008 -2009 ला बाहेरील देशातील प्रतिनिधी येऊन तुमचा सन्मान करून गेलेत. बाहेरील राज्यातील प्रतिनिधी येऊन आपले उपक्रम पाहून गेलेत.2008-2009 या शैक्षणिक वर्षात गुणवत्ता विकास कार्यक्रमात शाळाला कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळवून दिला... किती उपक्रम, जीवनात लागणारी शिदोरी पुरवणारे आहेत. बोधपर कथा, महत्वपूर्ण कात्रणं संकलन,परिसरातून मिळणारे ज्ञानरचनावादी शिक्षण.... किती उपक्रम? खरंतर मराठेसरांची ओळखच मुळी 'उपक्रमशील शिक्षक'  म्हणूनच.

       त्यामुळे शाळा बघण्यासाठी कित्येकजण दुरून येत, नि शाळेचं वैभव बघून आपणही काहीतरी करावं याची स्फूर्ती घेऊन जात . त्यांच्या प्रेरणेने असे कित्येक शिक्षक नि शाळा अंतर्बाह्य बदलल्या  फक्त विद्यार्थी च नाहीत तर पालकही जेव्हा विश्वासाने आधाराची अपेक्षा करतात नि कित्येक माऊली लेकाचा भक्कम खांदा शोधतात त्यांचं दुःख हलकं करण्यासाठी -  तेव्हा तो त्या व्यक्तीने दिलेला सर्वोच्च   पुरस्काराच असतो, होय ना?

     आपल्यातील माणूस वेगळी वाट निवडतो नि त्यात यशस्वी होतो तेव्हा त्याच्या वाटेवरून चालायला व्यवसायबंधु  तयार होतात... तेव्हा आपण चाललो तो मार्ग पथदर्शकाची भूमिका बजावणारा आहे याची प्रचिती समाजात येऊ लागली की समजावं आपण खरे आदर्श आहोत. असा पुरस्कार मग फक्त एक  सोपस्कार म्हणून बाकी राहतो.

   अशा कितीतरी गोष्टी ज्या आपण शिक्षक म्हणून जगताना प्रचलित पाऊलवाट न सोडता सहजरित्या चपखल या शब्दात सहज बसवली, त्या एरव्ही जगण्याला ,जगणं निभावणाऱ्या नि माणूस म्हणून जगणाऱ्या तुमच्यातील शिक्षकाला वेळोवेळी तुमच्या विद्यार्थ्यांनी ,ग्रामस्थांनी, माउलींनी, मित्र,सहकारी यांनी त्या त्या क्षणी अतिशय मोलाचा मनस्वी कौतुक नि आशिर्वादरूपी पुरस्कारच तर दिला आहे.

      आजपर्यंत कवितेतून भेटलेला प्रस्थापित समाजव्यवस्थेने कष्टी झालेला ,त्यावर कठोर भाष्य करणारा, हळव्या मनाचा कवी सतत व्यक्तिमत्वातून जाणवत राहतो. भावनाच शब्द होऊन कविता तयार होतानाचा प्रवास असाच अविरत चालू राहणारच आहे.त्यातून समाजमन प्रतिबिंबित होणार आहे.

     आज फक्त तो प्रत्यक्ष स्वरूपात साकार झाला,हेही गरजेचं आहे कारण आजचं जग प्रत्यक्ष स्वरूप मानतं म्हणून केवळ. आमच्यासारख्यानी  कधीच दिला होता तो सर तुम्हांला, *आदर्श शिक्षक पुरस्कार*.


      ●सौ.सुषमा बाळासाहेब आढाव.

                      कळवा,ठाणे.

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...