शाळा

Showing posts with label साम्ययोग : दै.लोकसत्ता. Show all posts
Showing posts with label साम्ययोग : दै.लोकसत्ता. Show all posts

Saturday, 10 December 2022

रामाचे चरण..

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖रामाचे चरण..


ही उत्तर प्रदेशातील गोष्ट आहे. एका गावात रामचरण नावाचे एक अंध गृहस्थ रात्रीच्या वेळी विनोबांचे दर्शन घ्यायला आले. त्यांना या कार्यासाठी अर्धा गुंठा जमीन द्यायची होती. त्यांची क्षमता तेवढीच होती. मात्र ते आले तेव्हा विनोबा विश्रांती घेत होते. दान घ्यावे यासाठी त्यांनी खूप विनवण्या केल्या. निदान अर्धा गुंठा जमीन घ्या, त्यामध्ये खतासाठी खड्डा खोदता येईल, असे त्यांचे म्हणणे होते.


शेवटी, ‘संत बाबाला दान देण्याकरिता म्हणून मी मुद्दाम इतक्या दुरून आलो आहे. त्यांना उठवू नका. त्रास होईल. माझे दानपत्र तेवढे त्यांना द्या!’ असे म्हणत दानपत्र देऊन ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी विनोबांना ही गोष्ट समजली. ते सद्गदित झाले. अश्रुभरल्या नेत्रांनी ते एवढेच म्हणाले, ‘अरे! साक्षात् परमेश्वर माझ्या भेटीला आला होता आणि तुम्ही मला उठवले नाहीत आणि मीही निजून राहिलो! त्याने मला प्रभू रामाच्या चरणांचे दर्शन घडवले. तो आंधळा नव्हता. देवच होता. त्याला कुणी सांगितले दान द्यायला? कुणी दिली प्रेरणा? त्याला डोळय़ांविना दर्शन कसे झाले? हे देवाचे काम आहे. तोच आपल्याकडून करवून घेत आहे. आपण निमित्तमात्र आहोत.’


भूदान यज्ञ एका राम नवमीला सुरू झाला आणि या यज्ञात साक्षात् श्रीरामानेच आहुती दिली. अशा असंख्य प्रसंगांनी भूदान यात्रा भूषणास्पद ठरली. स्वातंत्र्योत्तर भारताची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जडणघडण करण्याचे कार्य या यात्रेमुळे झाले. भूदान म्हणजे जमीन घ्यायची आणि द्यायची इतका सरधोपट प्रकार नव्हता. अर्थात त्याही पातळीवर भूदान यात्रेने लक्षणीय कार्य केले. त्याचा पाठपुरावा करणे ही सर्वाची समान जबाबदारी होती. ती बहुसंख्य देशवासीयांनी पेलली. स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही मूल्य रुजवण्यात, देशाला स्थैर्य देण्यात आणि जगाला शांततेच्या मार्गावर नेण्यात ज्या अनेक व्यक्तींचा वाटा होता त्यात विनोबांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो.


भूदान यज्ञाच्या निमित्ताने विनोबांच्या दोन वचनांचे स्मरण होते. ‘नित्य यज्ञाशिवाय राष्ट्र उभे राहात नाही,’ हे पहिले वचन. विनोबांची यज्ञ संकल्पना फारच अनोखी होती. आठ तास उत्पादक श्रम करणे ही त्यांची यज्ञाची कल्पना होती. एवढेच कार्य केले तरी देशासमोरचे अनेक प्रश्न सुटतील ही त्यांची भूमिका होती. भूतमात्रांची सेवा आणि शरीर परिश्रमातून मोक्षप्राप्ती हे दोन मोठे संस्कार वासाहतिक काळात या देशावर झाले. रामकृष्ण परमहंस आणि महात्मा गांधी यांचे त्यातील योगदान लक्षणीय होते.


विनोबांनी केलेले कार्य हे देशसेवकाचे कार्य होते. नम्रता, सेवा आणि शरीरपरिश्रम हा त्यांच्या कार्याचा गाभा होता. आपण केलेले कार्य ते परमेश्वराला अर्पण करून मोकळे होत. मग ती साहित्य सेवा असो, की जमिनीचे फेरवितरण. आपण सेवेसाठी आहोत ही त्यांची धारणा जराही ढळली नाही. त्या अनुषंगाने, ‘उंच टेकडी होण्यात मला मौज वाटत नाही. माझी माती इतस्तत: पसरावी असे मला वाटते’ हे त्यांचे उद्गार बोलके आहेत. याचाच पुढचा टप्पा म्हणजे भूदान. ‘भूदानाचा पराभव म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचा पराभव असेल,’ या नम्र धारणेमुळेच त्यांना ‘रामचरणां’चे बळ मिळाले.



🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com


===========================

संकलन: सुनील द.महामुनी, भूम

दिनांक- ९ डिसेंबर २०२२

Thursday, 8 December 2022

मी ब्रह्मपुत्र आहे..

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖 मी ब्रह्मपुत्र आहे..


‘मी रिकाम्या हाताने या देशात आलो आहे आणि रिकाम्या हातानेच परतेन. पण पाकिस्तानात भूदानाचे कार्य सुरू झाले, तर लाखो लोकांचे हृदय जोडण्याचे कार्य होईल. मैत्री, प्रेम, करुणा, दु:खितांची सेवा हे धर्माचे सार आहे. कुराणात म्हटले आहे- मिम्मा रजक्ना, हुम् युन्फिकून.. म्हणजे आपल्या उत्पन्नातील थोडे इतरांना द्या..


अल्लाहून् नुरुस् समावति वाल् अरद्.. म्हणजे अल्ला धरित्री- आकाशाचा प्रकाश आहे. लहानसा दीप, घराच्या एका कोपऱ्यात असतो, पण सारे घर आलोकित करतो. त्याचप्रमाणे ईश्वर लहानशा हृदयात वास करतो. परंतु त्याचा प्रकाश सर्वत्र पसरतो. ईश्वरावर अशा प्रकारे श्रद्धा ठेवून मी येथे आलो आहे.


आपण सारे एक आहोत; ज्याप्रमाणे अल्ला एक आहे, मानव एक आहे. जातिभेद, धर्मभेद, देशा-देशांतील भेद, मालिक-मजूर भेद, जोपर्यंत मिटत नाहीत, ग्राम-परिवार होत नाही तोपर्यंत ग्राम-निर्माण होणार नाही. त्याची उन्नती होणार नाही. म्हणून मी पहिल्या दिवसापासून भूदान मागत आहे.


पत्रकार विचारतात की भूदानासाठी अशी संस्था उभी करणार का? मी उत्तर देतो, माझा संस्थेवर विश्वास नाही. माझा विश्वास मनुष्याच्या हृदयावर आहे. मला विचारण्यात आले की भारतातील तुमचे कार्य पूर्ण झाले का? मी म्हणालो, माझे काम प्रेमाचे आहे. सगळय़ांवर माझे प्रेम आहे. हे प्रेम देश-विदेश, हिंदू-मुस्लीम असा भेद मानत नाही. पूर्वेकडे तोंड करून ईश्वराचे नाव घ्यायचे की पश्चिमेकडे, हे सर्व बाहेरील भेद आहेत. खरी गोष्ट तर हृदयात आहे. आपण सर्वाना फसवू शकतो, पण ईश्वराला फसवू शकणार नाही. सत्यच धर्म बाकी सर्व गोष्टी बाह्य आहेत.


मला जेव्हा प्रश्न करतात की मी कुठला निवासी आहे? तेव्हा मी म्हणतो की ब्रह्मपुत्र नदी जशी सगळय़ा देशांची तसा मीदेखील सर्व देशांचा आहे.


भूदान हा एका देशासाठीचा विचार नाही. तो सर्व देशांसाठी आहे आणि विशेषत: आशिया महाखंडासाठी आहे. जिथे जमीन कमी, लोकसंख्या अधिक आहे. प्रेमाच्याच


मार्गाने भुकेचा प्रश्न सोडवावा लागेल. इस्लामचा अर्थ शांती आहे. परंतु पोटात भूक असताना शांती कशी प्राप्त होईल? म्हणून प्रथम पोटाची शांती झाली पाहिजे, त्यानंतरच चित्ताला शांती मिळेल.


लोक विचारतात की सगळय़ा प्रश्नांना भूदान हे पूर्ण उत्तर आहे, की हे एक साधनमात्र आहे? माझे म्हणणे हे आहे की, माझा उद्देश प्रेमभावना व्यापक करणे हा आहे. सर्व देशांतील सर्व जण एकमेकांचे भाऊ आहेत. त्यांच्यात दुजेपणा वा भेद नाही. प्रत्येक गाव एक परिवार होईल. ही भावना भूदानासाठी आहे.’ (संदर्भ- आचार्य विनोबा भावे- विजय दिवाण).


भूदानच नव्हे तर विनोबांच्या समग्र जीवनचरित्राचे हे सार आहे. भूदान, ग्रामदान आणि अंतिमत: साम्ययोगाचे लघुरूप म्हणून या चिंतनाकडे पाहता येईल. विनोबांनी उदंड यत्न केला. जगताचा जयकार केला. नंतर ईश्वराची प्रार्थना केली. त्या प्रार्थनेची ईश्वराने कशा प्रकारे दखल घेतली?


🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com


===========================

संकलन: सुनील द.महामुनी, भूम

दिनांक- ८ डिसेंबर २०२२

Wednesday, 7 December 2022

विश्वसेवक..

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖 विश्वसेवक..



गांधीजींचे रामनामाशी अत्यंत खोल नाते होते. विनोबांच्या बाबतीतही हीच स्थिती होती. रामनामावर बापूंच्या चिंतनाला विनोबांनी प्रस्तावना लिहिली. ती, ‘रामनाम- एक चिंतन’ या नावाने प्रसिद्ध आहे. या पुस्तिकेत विनोबांनी रामाच्या व्यक्तित्वाचा नेमका वेध घेतला आहे. रामाला ते ‘विश्वनंदन’ मानतात. राम प्रथम ‘विश्वनंदन’ आहे आणि नंतर तो ‘दशरथनंदन’ झाला.


विनोबांच्या बाबतीतही हे रूपक वापरता येते. विनोबा प्रथम विश्वसेवक होते आणि नंतर ते देशसेवक झाले. त्यांनी नेहमीच अखिल विश्वाचा विचार केला. अध्ययन आणि कार्य या दोन्ही क्षेत्रांत ते ‘सेवक’ या नात्याने वावरले. स्वत:वर असणारी जबाबदारी ते पूर्णपणे जाणत होते. पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेशमधील त्यांची १६ दिवसांची पदयात्रा याची साक्ष होती.


५ सप्टेंबर १९६२ रोजी त्यांनी बांगलादेशात प्रवेश केला. त्यांच्या या पदयात्रेवर पाकिस्तानातील (पश्चिम) वृत्तपत्रांनी जोरदार टीका केली. तिला उत्तर देताना पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री महंमद अली यांनी विनोबांच्या पदयात्रेचा हेतू नेमकेपणाने सांगितला. ते म्हणाले, ‘विनोबांना पूर्व पाकिस्तानातून जाण्याची परवानगी केवळ मानवतेच्या दृष्टीनेच देण्यात आली असून, पाकिस्तान सरकारच्या या कृतीचे फक्त भारतातच नव्हे, तर साऱ्या जगात अभिनंदन करण्यात आले आहे. विनोबाजी आपल्या पदयात्रेद्वारे शुभेच्छेचाच प्रचार करतील आणि त्यामुळे उभय देशांत मैत्री स्थापन होण्यास मदत होईल. आम्ही भारताशी मैत्रीपूर्ण संबंध राखू इच्छितो.’


विनोबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोनारहाट या गावातून पूर्व पाकिस्तानात प्रवेश केला. त्या वेळी पाकिस्तानातील जनतेने त्यांचे मनापासून स्वागत केले. आरंभी ही जनता ‘पाकिस्तान जिंदाबाद’ या घोषाने विनोबांचे स्वागत करत असे. विनोबांनी त्यांना सांगितले की ‘जय जगत्’ या घोषात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘जय हिंदू’ या दोहोंचा समावेश होतो. पुढे लोकांनी, त्यांचे ‘जय जगत्’ म्हणत स्वागत केले.


पूर्व पाकिस्तान हा दाट लोकवस्तीचा भाग. एक वर्ग मैल क्षेत्रात ९०० लोकवस्ती होती. अशा क्षेत्रात भूदान मागणे हे मोठेच धाडस होते. तरीही इथून ११० एकरांचे भूदान झाले. अब्दुल खलिफ या गृहस्थांकडे चार एकर जमीन होती. त्यातील एक एकर जमीन त्यांनी दान म्हणून दिली. विनोबा त्यांना म्हणाले, ‘तुम्हाला अल्लाचे आशीर्वाद मिळावेत म्हणून मी त्याच्यापाशी प्रार्थना करेन.’


दोन आठवडय़ांच्या पदयात्रेत विनोबांना लोकांचे अपार प्रेम मिळाले. जमीनवाला बाबा, फकीर, साधुबाबा ही बिरुदे मिळाली. लोक त्यांना आपले दु:ख सांगत आणि चमत्काराची अपेक्षा करत. अल्लावर श्रद्धा ठेवा, एवढाच विनोबांचा प्रतिसाद असे. या यात्रेत विनोबांना एक हिंदू महिला भेटली. तिने या भागात एक शिवमंदिर उभारले होते. विनोबा त्या मंदिरात आवर्जून गेले. नंतर त्यांनी सांगितले की ‘या देशात मी त्या वृद्धेच्या म्हणण्यानुसार दर्शनाला न जातो तर त्या मंदिराच्या प्रतिष्ठेला ठेच लागली असती आणि त्या वृद्धेच्या मनावरही आघात झाला असता.’


कोणाच़ा न करी द्वेष दया मैत्री वसे मनीं

मी माझे न म्हणे सोशी सुख- दु:खें क्षमा- बळें

            -गीताई – अ. १२/ श्लोक १३


गीतेतील भक्त लक्षणाचे हे प्रत्यक्ष दर्शन होते.


🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com


===========================

संकलन: सुनील द.महामुनी, भूम

दिनांक- ७ डिसेंबर २०२२

सहदेवाचा धर्म

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖सहदेवाचा धर्म


मी अस्पृश्य म्हणून जन्माला आलो असतो तर कोण जाणे माझी अहिंसा डळमळीत झाली असती.


– विनोबा


महाकाव्यांच्या संदर्भात आपण बरेचदा एकसाची समजूत करून घेतो. म्हणजे बंधुप्रेम म्हटले की रामायण आठवते आणि बंधुवैर म्हटले की महाभारत. सात्त्विकता म्हणजे रामायण आणि कुरघोडी व संघर्ष म्हणजे महाभारत. महाभारत म्हणजे जमिनीसाठीचा संघर्ष आणि रामायण म्हणजे शुद्ध नैतिकता. ही यादी कितीही वाढवता येते. मुद्दा एवढाच की या दोन्ही महाकाव्यांच्या कथानकात कमालीचे साम्य आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण रामायण, महाभारतात सामावले आहे.


दोन्ही महाकाव्यांमध्ये जमिनीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. रामायणात तो नैतिकतेला प्राधान्य देऊन सोडवला आहे. अर्थात या नैतिकतेच्या आड संघर्ष आहे. महाभारताची रचना बरोबर उलट दिसते. तिथे जमिनीचा प्रश्न संघर्षांच्या मार्गाने सोडवण्यात आला असला तरी अंतिमत: नैतिकता महत्त्वाची ठरते. परिशुद्ध भक्ती आणि नीती पाहायची असेल, तर भागवत हातात घ्यावे लागते.


रामायणात नीती आहे तर भागवतात भक्तांमध्ये अभेद मानला आहे. भीष्म आणि बिभीषण या दोन्ही नावांचा अर्थ ‘भीषण’ असा असला तरी भागवत धर्माच्या दृष्टीने हे दोन्ही ‘भागवत’ आहेत. हा अभेद विनोबांनी महाभारतातदेखील पाहिला. यक्ष, धर्मराजाला ‘तुला कोणता भाऊ जिवंत करून हवा,’ हा प्रश्न विचारतो तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता धर्मराज, सहदेवाचे नाव घेतो. कुंती आणि माद्री या दोघींची संतती जिवंत असली पाहिजे अशी भूमिका घेण्याऐवजी विनोबा धर्मराजाच्या उत्तरात अंत्योदयाचे तत्त्व पाहतात. प्रथमस्थानी असणाऱ्याने अंतिम स्थानी असणाऱ्याच्या उत्कर्षांसाठी प्रयत्न करावा, असा विचार मांडतात. 


हे तत्त्व त्यांना पूर्वजांकडून संस्काराच्या रूपाने मिळाले. गांधीजींच्या सहवासात ते विकसित झाले आणि त्यांच्यानंतर विनोबांनी दलितांच्या समस्येचा स्वतंत्रपणे विचार करत, भूदान यज्ञ हाती घेतला. आरंभी ते आपल्या सहकाऱ्यांसह नालवाडीमध्ये, दलित वस्तीत विशेषत: मेहतरांच्या प्रश्नांवर काम करत. त्यांचे हे कार्य स्थानिक दलित मंडळींनाही झेपले नाही. पुढे आश्रमात मैला सफाईचे कार्य विनोबांचे मधले बंधू बाळकोबा भावे यांनी सुरू केले. आधुनिक भारतातील पहिला ब्राह्मण मेहेतर असेही बाळकोबांचे वर्णन केले जाते.


जात्यंताच्या प्रश्नावर भावे घराण्याच्या तीन पिढय़ांनी महत्त्वाचे कार्य केले. हे कार्य निव्वळ प्रतीकात्मक न होता मूलगामी बदलाचे कार्य ठरले ते भूदान यज्ञामुळे. भारतात जमिनीचा प्रश्न हाती घेणे म्हणजे जातीचा प्रश्न हाती घेणे, असा अर्थ होतो. भूदानाची सुरुवात दलित वर्गाच्या भूमिसमस्येपासून झाली. तेलंगणात विनोबांनी जमीन मागितली ती तिथल्या दलितांची उपजीविका सुरळीत चालावी म्हणून. पुढे संपूर्ण भूदान यज्ञात विनोबा याची दक्षता घेत असत.


विनोबांच्या साम्ययोगात, दलित, शेतमजूर, छोटे शेतकरी, स्त्रिया, एके काळचे गुन्हेगार, आदींना प्रधान स्थान आहे. या वर्गाची सेवा करण्यात विनोबांनी धन्यता मानली. आधुनिक सहदेवाच्या समग्र हितासाठी हा नव-धर्मराज अतीव श्रमला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विनोबांवर प्रसंगी टीका केली असली तरी त्यांच्या दलित वर्गाबाबत असणाऱ्या तळमळीबाबत कौतुक करायला ते विसरले नाहीत.



🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com


===========================

संकलन: सुनील द.महामुनी, भूम

दिनांक- ६ डिसेंबर २०२२

Sunday, 4 December 2022

क्रांतिपर्वाची उपाख्याने

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖क्रांतिपर्वाची उपाख्याने


विनोबांचे समग्र जीवन शांती आणि क्रांती अशा दोन टप्प्यांमध्ये पाहता येते. गांधीजींच्या सहवासात त्यांनी साम्ययोगाचे अंतर्मुख होऊन दर्शन घेतले. ते होते शांतिपर्व. त्यांच्यानंतर समाजाभिमुख होत साम्ययोगाची साधना केली. भूदान यज्ञ हे त्या साधनेचे प्रकट रूप होते. ते क्रांतिपर्व होते. क्रांतीची ही उभय रूपे मिळून विचारक्रांती म्हणजेच अिहसक क्रांती जन्माला येते. विनोबांच्या शब्दांत सांगायचे तर ही संक्रांतीची पद्धत झाली. संक्रांती म्हणजे संपूर्ण क्रांती अथवा सम्यक् क्रांती.


भूदान यज्ञाच्या निमित्ताने या विचारक्रांतीचे अनोखे दर्शन जगाला झाले. या सम्यक् क्रांतीने पुढे वेगळे वळण घेतले आणि आपल्याला तिचा विसर पडला. आपली कार्य करण्याची पद्धत पुढच्या पिढीसाठी अडचण होऊ नये यासाठी त्यांनी क्षेत्रसंन्यासही घेतला. अर्थात त्यांचा क्षेत्रसंन्यास हे काही एकमेव कारण नव्हते. तथापि विनोबा निवृत्तीच्या वाटेवर चालत होते. त्यांचे कार्य पुढे जाण्याऐवजी वेगळय़ा वाटेने गेले.आज त्या क्रांतिपर्वाच्या आठवणी तेवढय़ा आहेत. भूदान यज्ञ नावाच्या यज्ञाच्या अनुषंगाने पुढे आलेल्या कथा एखाद्या महाकाव्यातील उपाख्यानांप्रमाणे आहेत. उपाख्याने मूळ काव्यापेक्षा सरस असतात. भूदान यज्ञातील मनोज्ञ कथा तसा प्रत्यय देतात.


एका गावात सुतारकाम करणाऱ्या माणसाने मोठय़ा कष्टाने मिळवलेली सर्व म्हणजे १२ एकर जमीन भूदान यज्ञात दिली. विनोबांनी त्या गृहस्थांना विचारले, या पुढे उपजीविका कशावर चालेल? यावर तो दाता म्हणाला, ‘माझा धंदा चांगला चालला आहे. मी जमीन कसू शकत नाही. ते काम मी इतरांकडून करवून घेतो आणि मग मला पिकाचा हिस्सा मिळतो. तुमचे बोलणे ऐकले आणि समजले की हे माझे वागणे बरोबर नाही. म्हणून सर्व जमीन दान म्हणून दिली.’ उत्तर प्रदेशातील मंगरोठ या गावातील सर्व जमिनीचे दान झाले. ते पहिले ग्रामदान होते.


अगदी छोटय़ा शेतकऱ्यापासून बडय़ा जमीनदारापर्यंत सर्वानी या यज्ञात आहुती दिली. समाजातील प्रेमभावना वाढीस लागावी आणि घेणाऱ्या हातांना देण्याचीही सवय लागावी हा विनोबांचा प्रयत्न होता. त्याला मिळालेले यश स्तिमित करणारे होते. विनोबा एखाद्या गावात आले की ते गेल्यावर गावकरी म्हणत, ‘आमच्या गावात गांधीबाबा आला. आम्हाला जमीन देऊन गेला. खूप दिवसांनी आला म्हणून त्याची दाढी वाढली होती.’ एका अभ्यासकाची ही आठवण आहे.


विनोबांची अशा प्रसंगांवरची प्रतिक्रिया पाहिली तर साम्ययोगाचे समग्र रहस्य हाती येते. ते म्हणत, मी तर गरिबांकडूनही दान घेतो. एक एकरवाल्याला गुंठाभर जमीन देण्याची इच्छा झाली आणि मी ते दान स्वीकारले. असे दान करण्याची इच्छा होणे यालाच मी विचारांची अिहसक क्रांती म्हणतो. जिथे विचारक्रांती होते तिथे जीवन प्रगतीकडे जाते. सद्विचार जागृत होतात.


देण्याने दैवी संपत्ती निर्माण होते. त्याच्या समोर आसुरी संपत्ती टिकत नाही. आसुरी संपत्ती ममत्वभावावर आधारित आहे आणि दैवी संपत्ती समत्वावर आधारित आहे. मी दान घेतो तिथून मी हृदयमंथनाची, हृदयपरिवर्तनाची, चित्तशुद्धीची, मातृवात्सल्याची, मैत्रीची आणि गरिबांप्रति प्रेमाची आशा धरतो. जिथे दुसऱ्यांच्या चिंतेची भावना जागृत होते तिथे समत्व बुद्धी प्रकट होते.


🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com

===========================

संकलन: सुनील द.महामुनी, भूम

दिनांक- ५ डिसेंबर २०२२

Wednesday, 30 November 2022

जय जगत्!

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖जय जगत्!


भूदान यज्ञामध्ये भूसंपादनाएवढेच प्रेमसंपादनालाही महत्त्व होते. किंबहुना थोडे अधिकच होते. जय जगत् असा घोष करणाऱ्या विनोबांना आशियात मूलभूत बदल होण्याची गरज वाटत होती. त्यांना युरोपपेक्षा आशियातील परिवर्तन महत्त्वाचे वाटत होते. किमान दक्षिण आशिया तरी एक व्हावा असा त्यांचा आग्रह होता. भूगोल वेगळा झाला असला तरी इतिहास आणि संस्कृती एक होती. म्हणूनच आसामची सीमा ओलांडून भूदान पदयात्रेने पूर्व पाकिस्तानात म्हणजे आजच्या बांगलादेशात प्रवेश केला.


विनोबांनी अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या तीन देशांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक असावे यासाठी प्रयत्न केले होते. या उपक्रमाला ते ‘एबीसी ट्रँगल’ म्हणत. तिथे त्यांचे सहकारी होते सरहद्द गांधी खान अब्दुल गफ्फार खान. या त्रिकोणाच्या निर्मितीसाठी उपकारक ठरतील असे दोन ग्रंथ विनोबांनी संपादित केले. ‘कुराण सार’ आणि ‘धम्मपद’ (नवसंहिता). त्यांच्या कुराण साराबद्दल जाणत्या मंडळींच्या मनात आदराची भावना दिसते. विनोबा हिंदू होते तसेच ते सच्चे मुसलमान होते. कुराण शरीफ जवळपास मुखोद्गत असणाऱ्या विनोबांची त्या ग्रंथावर भक्तीच होती. म्हणून कुराण पठणाच्या वेळी त्यांना अश्रू अनावर होत.


ही त्यांची भावना धम्मपदाच्या बाबतीतही होती. खरे तर विनोबांना अध्ययनासाठी निवांत वेळ मिळाला नाही. तो तसा मिळाला असता तर विनोबांनी गीतेप्रमाणेच बायबल, कुराण आणि धम्मपदाचे आणखी सखोल अध्ययन केले असते. पिख्तॉल, स्कोफिल्ड, आचार्य नरेंद्र देव आदींच्या तोडीचे संशोधन केले असते. ‘तुम्ही मला भूदान द्या मी तुम्हाला धर्मग्रंथांचे संशोधन करून देतो.’ ते शंकराचार्याच्या बाबतीत म्हणत की, ‘आचार्य उद्या अध्ययन सोडून देतो म्हणाले असते तर मी त्यांना तसे करू दिले नसते.’ विनोबांचे हे उद्गाार सूचक आहेत.


विनोबांना अध्ययनाची व्यसन म्हणावे एवढी ओढ होती. त्यांना चालतेबोलते विद्यापीठ म्हणत ते अक्षरश: खरे होते. याचा अर्थ असा की एका आदर्श विद्यापीठात जी ज्ञानसाधना होते ती या माणसात सामावली होती. तिचा विकास करण्याची त्यांची इच्छा असली तरी जनतेच्या प्रश्नांना बाजूला सारून अभ्यास करण्याची त्यांची तयारी नव्हती. म्हणून ते श्रमत राहिले आणि त्यांच्या श्रमिकाने त्यांच्यातील ज्ञानवंताला उन्नत केले. भूदान यज्ञात विनोबांनी दिलेली अध्ययन आहुती सहसा लक्षात घेतली जात नाही. या काळात ते जंगम विद्यापीठ झाले. ‘कायकवे कैलास’ हा मंत्र घेऊन वावरले.


हा श्रमण, आपल्या सहकाऱ्यांसह ५ सप्टेंबर १९६२ रोजी आसामची सीमा ओलांडून पूर्व पाकिस्तानात म्हणजे आजच्या बांगलादेशात दाखल झाला. यावर पंडित नेहरू म्हणाले, ‘विनोबांची ही पूर्व पाकिस्तानची यात्रा थोडय़ा दिवसांपुरती असली तरी उभय देशांमध्ये सौहार्द स्थापन करण्यास सहायक होईल.’ या यात्रेबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या तथापि तिथे विनोबांना मंत्र पोहोचवता आला. ‘जय जगत्!’


🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com

===========================

संकलन: सुनील द.महामुनी, भूम

दिनांक- ०१ डिसेंबर २०२२

Tuesday, 29 November 2022

भूदानस्य कथा..

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖भूदानस्य कथा..

जेथे मी दान घेतो तेथून मी हृदयमंथनाची, हृदयपरिवर्तनाची, चित्तशुद्धीची, मातृवात्सल्याची, मैत्रीची आणि गरिबांप्रति प्रेमाची आशा धरतो. जेथे इतरांच्या चिंतेची भावना जागृत होते तेथे समत्व बुद्धी प्रगट होते..

.. भूदान हा एका देशासाठीचा विचार नाही, तो सर्व देशांसाठी आहे आणि विशेषत: आशिया खंडासाठी आहे. जिथे जमीन कमी, उद्योगधंदे कमी आणि लोकसंख्या अधिक आहे..

                                          -विनोबा

माणसाला अंतिमत: ओढ असते ती स्थिरावण्याची. शांतपणे आयुष्य जगण्याची. रामायण, महाभारत, राम, कृष्ण, बुद्ध, अशोक, अकबर आदींचा जीवनप्रवास शांततेने जगण्याचीच प्रेरणा देतो. वैदिक धर्मही कर्मकांडांकडून शांततेकडे वळला आणि उपनिषदांचे तत्त्वज्ञान आकाराला आले. आरण्यके आणि उपनिषदे या अतिप्राचीन दर्शनांनी त्या वेळेच्या थकलेल्या समाजमानसाला शांत केले. श्रमण आणि भिक्खू संस्कृतीने हा अहिंसा धर्म अधिक व्यापक आणि तितिक्षाप्रधान केला. क्रोधाला अक्रोधाने जिंकावे, दुष्प्रवृत्तींना दूर करून सत्प्रवृत्तींनी समाजात अग्रस्थानी राहावे, विरोधकांकडेही सत्याचे कण असणार, ते जाणून घ्यावेत, त्यांचा स्वीकार करावा आणि जीवन उन्नत करावे. ‘धर्मक्षेत्रे मतिर्मम’ या शिकवणीचा विसर पडू नये.

या देशातील समाजशास्त्र आणि धर्मशास्त्र वरील मूल्यांवर आधारित आहे. या मूल्यांचा विसर पडला की इथले समाजशास्त्र आणि धर्मशास्त्र सावध होते. तातडीच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना भूतकल्याणप्रधान दर्शनाची प्रस्थापना होते. वैदिक, अवैदिक, भारतासाठी तुलनेने नवीन असणारी दर्शनेही याला अपवाद नाहीत. दारा शुकोह आणि अकबर यांचे चिंतन याची साक्ष देणारे आहे. शिवरायांनी तर ‘मुद्रा भद्राय राजते’ अशी मुद्रा धारण करून कल्याणकारी राज्य कल्पनेचा उदोकार केला.

या भूमीतील संत, महाकवी, सम्राट ते अगदी बालकेही स्नेह आणि साधुतेला अनुकूल असे मन घेऊनच जन्माला येतात. भरतखंडातील ही दार्शनिक परंपरा सार्वत्रिक आणि सर्वमान्य आहे. तिला छेद बसेल असे काही घडले की ती परंपरा दुष्ट बुद्धीचाच नाश करते. गांधीजींच्या सत्याग्रहाचे आणि विनोबांच्या सत्याग्रही भूमिकेचे आणि साम्ययोगाचे मूळ या परंपरेत आहे.

या विश्वकल्याणदायी भूमिकेचे पुनर्दर्शन भूदानामुळे झाले. किमान पाच हजार वर्षांचे चिंतन भूदानामध्ये एकवटले. विनोबांनी सर्व धर्माचा आदर करत त्यांच्या कालसुसंगत शिकवणीची पुनस्र्थापना केली. तेच तत्त्व घेऊन त्यांनी भूदान यज्ञात सेवा अर्पण केली.

या यज्ञाला अपार प्रतिसाद मिळाला. व्यवहार आणि अध्यात्म एकमेकांना पारखे नाहीत कारण दोहोंना दृष्टीने व्यष्टी आणि समष्टीचे ऐक्य मान्य आहे. या आणि अशा असंख्य कारणांनी भूदानाने परमादर मिळवला आणि आजही तो टिकून आहे.

भूदानाच्या अशा कितीतरी रम्यता आणि साम्यता प्रकट करणाऱ्या कथा आहेत. त्यांचे गुण आपल्या जवळचे झाले की युद्धाच्या कथा ऐकवणारसुद्धा नाहीत मग त्यामुळे त्यांच्याबद्दल वाटणारी रम्यता खूप दूरची गोष्ट झाली.


🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com

===========================

संकलन: सुनील द.महामुनी, भूम

दिनांक- ३० नोव्हेंबर २०२२

Monday, 28 November 2022

जेव्हा देव जागा होतो

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖जेव्हा देव जागा होतो


भूदान यज्ञाचा विशेष म्हणजे जमीन देणाऱ्यांमध्ये भौतिक अर्थाने गरीब आणि आध्यात्मिक अर्थाने श्रेष्ठ दाते होते. भूदान यात्रेत विनोबांना नेहमीच भरघोस दान मिळाले नाही. संपूर्ण देशात भूदानाला प्रतिसाद मिळत असताना काही राज्यांमध्ये रोज जेमतेम चार-पाच एकर जमीन मिळाली, असेही घडले होते. गया जिल्ह्यात फिरताना त्यांना एक दिवस फक्त सवा एकर जमीन मिळाली. हा देवाचा प्रसाद आहे आणि आपण तो स्वीकारून भ्रमंती करायची ही त्यांची भूमिका होती.

केरळमधून धाडलेल्या एका पत्रात त्यांनी नोंदवले की ‘काही वेळा दिवसाच्या शेवटी दानाच्या समोर शून्य लिहावे लागते. अशा वेळी शून्यातही शक्ती असते.’ लौकिक यशापयशाला त्यांनी फारसे महत्त्व दिले नाही. एकदा दुपारच्या वेळी रामगढचे राजेसाहेब त्यांच्या भेटीसाठी आले. त्यांनी एक लाख एकरांचे दान केले. विनोबांनी ते दानपत्र स्वीकारले आणि पुन्हा वाचनात मग्न झाले. दान मिळाले म्हणून आनंद नाही आणि मिळाले नाही म्हणून खेद नाही. गीताईचा दाखला द्यायचा तर,

कर्मातचि तुझ़ा भाग

तो फळांत नसो कधी

नको कर्मफळी हेतू

अकर्मी वासना नको

सारांश, भूदान यज्ञ हे मानवाला उन्नत करणारे कार्य होते. एका अर्थी ती मनाची मशागत होती. विनोबांच्या मते, ‘मनुष्य जसजसा सुसंस्कृत होईल तसतशी त्याला आपल्या संग्रही वृत्तीची लाज वाटेल. पूर्वीच्या काळी मोठमोठय़ा राजांना किती तरी राण्या असत. त्याची लाज वाटणे दूरच उलट त्यात प्रतिष्ठा मानली जाई. आज एखाद्याला दोन बायका असल्या तर तो खाली मान घालून स्पष्टीकरण देतो. एवढा मोठा फरक झाला आहे. थोडक्यात आजवर कामनियमन झाले. आता अर्थनियमन करायचे आहे. यामुळे काही दिवसांनी असे होईल, की, आपल्या जवळ जास्त जमीन आहे हे सांगायची माणसाला लाज वाटेल.’

एकदा एक तरुण पाच एकर जमिनीचे दानपत्र देऊन गेला. घरी गेल्यावर त्याच्या आईने, किती जमीन दिलीस हे विचारले. पाच एकराचा आकडा ऐकून ती माउली नाराज झाली. ती म्हणाली, ‘बाबा, आपल्याला सहावा हिस्सा मागतात. आपल्याकडे साठ एकर जमीन आहे. तू फक्त पाच एकर जमीन दिलीस. परत जा आणि त्यांची क्षमा मागून दहा एकरांचे दान करून ये.’ दुसऱ्या दिवशी तो परत गेला आणि पाचऐवजी दहा एकरांचे दान करून आला.

काश्मीर यात्रेमध्ये विनोबा, अत्यंत कठीण पदयात्रा करत होते. भूदानासाठी पीर पंजालच्या साडेतेरा हजार फूट उंचीवर चालणाऱ्या विनोबांचे छायाचित्र पाहून एका माउलीने विनोबांना भूदानपत्र पाठवले. ते पाहून विनोबा म्हणाले, ‘मी पीर पंजालच्या साडेतेरा हजार फूट उंचीवर चढलो होतो, पण या बाईची उंची पीर पंजालपेक्षा अधिक आहे.’

‘दानं भोगो नाश:’ असे एक वचन आहे. संपत्ती तीन वाटांनीच जाते. दान, भोग अथवा नाश. विनोबांची आई म्हणत असे, ‘देतो तो देव आणि राखतो तो राक्षस.’ भूदान घेत विनोबा, माणसातील देव जागा करत होते.


🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com

===========================

संकलन: सुनील द.महामुनी, भूम

दिनांक- २९ नोव्हेंबर २०२२

जीवनदान यज्ञ

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖जीवनदान यज्ञ

दानामध्ये दात्याचा हात वर आणि घेत्याचा हात खाली अशी धारणा असते. तिच्यामध्ये फार काही चुकीचे नाही. दानामुळे दात्याचे नाव होते, पण दान घेणाऱ्याला अगदी याचक म्हणण्याइतपत वेळ येते. आपल्याला दानशूर माहिती असतो, पण दात्याला शुद्ध करणारे एखादे दान आहे का हे मुद्दाम शोधावे लागते. विनोबांनी भूदानामध्ये देणारा आणि घेणारा एकाच पातळीवर आणले.

या दानयज्ञाला चालना देणारा माणूस स्वत:च दात्यांसमोर उभा आहे. सर्वात जास्त जमीन मला हवी कारण मी भूमिहीन आहे आणि सर्वात जास्त जमीन माझ्याकडे आहे म्हणून मी जमीनदारही आहे अशी विनोबांची भूमिका होती. याचा सामाजिक आणि आर्थिक अंगाने विचार केला तर आत्ता जमीन दिली तर स्वत:चा उद्धार करून घ्याल आणि मिळालेल्या जमिनीचा सुयोग्य वापर केला, ती कसली तर तुमचे समग्र परिवर्तन होईल. थोडक्यात भूदानाची प्रक्रिया ही समाजाच्या कल्याणाची प्रक्रिया होती.

विनोबांनी भूदानाच्या अनुषंगाने काही कळीच्या गोष्टी सांगितल्याचे दिसते. त्यांच्या मते, ‘दान म्हणजे न्याय्य हक्क. न्याय म्हणजे कायद्यातील न्याय नव्हे तर ईश्वराचा न्याय. ईश्वराचा न्याय म्हणजे सर्वाना पाणी, सर्वाना प्रकाश, सर्वाना जमीन. मी भिक्षा मागायला नव्हे तर दीक्षा द्यायला आलो आहे. देणाऱ्याची आणि घेणाऱ्याची प्रतिष्ठा वाढवायला आलो आहे.’

विनोबा जमीनदारांना स्वामित्व विसर्जनाची दीक्षा देत होते. मोठय़ा जमीनदारांनी दिलेली किरकोळ जमीन ते नाकारत. एकदा तीनशे एकर जमीन असणाऱ्या श्रेष्ठीने केवळ एक एकर जमीन दान म्हणून दिली. विनोबांनी ते दान थेट नाकारले. त्या जमीनदाराला सांगितले की, ‘इतके कमी दान दिल्याने तुमची बदनामी होईल. मी सगळय़ांची प्रतिष्ठा वाढवायला आलो आहे. श्रीमंतांची आणि गरिबांचीही. जर मला आश्रमासाठी जमीन हवी असती तर मी हे दान स्वीकारले असते. पण मी आज दरिद्री नारायणाचा प्रतिनिधी या नात्याने मागतो आहे.’ त्या जमीनदाराने ३० एकराचे दानपत्र भरून दिले.

या प्रसंगामुळे विनोबांच्या लक्षात आले की दानाची प्रेरणा असली तरी कंजुषी आहे. त्यामुळे त्यांनी लहान दान घ्यायचे नाही हे ठरवले. एकदा १० हजार एकर मालकीची असणाऱ्या जमीनदाराने शंभर एकर जमिनीचे दानपत्र लिहून दिले. विनोबांनी त्या दानपत्राला स्पर्शही केला नाही. विनोबांनी भर सभेत दानपत्रे फाडून टाकल्याचेही प्रसंग आहेत.

पालकोटच्या राजाने ४५ हजार ५०० एकर जमिनीचे दान केले. ते भूदानाचे कार्यकर्ते बनले. आपले वैभव सोडून ते खादीधारी कार्यकर्ते झाले. एवढेच नव्हे तर ते भूदानासाठी पदयात्राही करू लागले. भूदान यज्ञाची महत्ता त्यांच्या शब्दांत जाणली, तर या भूदानाविषयीचे अनेक प्रश्न दूर होतील : ‘विनोबा आमची जमीन घेतात आणि आम्हाला जीवनदान देतात. त्यांनी आम्हाला वाचवले आहे. नाही तर रशिया- चीनच्या जमीनदारांप्रमाणे आमचीही दुर्गती झाली असती. या भूदान यज्ञात जमीन अर्पण करण्यात आमचे हित आहे. काळाची पावले ओळखून वागण्याने आमचे कल्याण होईल. नाही तर विनाश अटळ आहे.’

दान घेणारा आणि देणारा दोघांनाही विनोबांनी यानिमित्ताने जीवनदान दिले.

🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com

===========================

संकलन: सुनील द.महामुनी, भूम

दिनांक- २८ नोव्हेंबर २०२२

Friday, 25 November 2022

दानमंत्र..

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖दानमंत्र..


मनन केले की तारणारा तो मंत्र, अशी मंत्राची व्याख्या आहे. कुणी मंत्री भेटायला आले की विनोबा त्यांना विचारत, ‘मंत्री आहात मग तुमचा मंत्र कोणता?’ विनोबांच्या कल्पनेतील मंत्री मनन आणि चिंतन करणारे होते. असंख्य मंत्र आणि सूत्रे हा विनोबांचा विशेष होता. भूदान यज्ञाच्या अनुषंगाने त्यांनी अगणित मंत्र दिले. परंपरा आणि नवता यांचा मेळ हा त्यांचा विशेष होता. भूदानाचा विचार स्पष्ट करणारे काही मंत्र आवर्जून ध्यानात घ्यावेत असे आहेत. शिवाय ते सार्वकालिक कल्याणाचा मार्ग दाखवणारे आहेत.


आरंभ ‘सबहि भूमी गोपाल की’पासून करायला हवा. जमिनीवर मालकी कृष्ण परमात्म्याची आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून ती जमीन कसणाऱ्याची. यातील गो-पाल शब्दाची योजना अत्यंत समर्पक आहे. भूदानाच्या आरंभी विनोबांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, ‘या प्रवासात फिरताना एक काम प्रामुख्याने माझ्या डोळय़ांपुढे राहणार आहे. मला गरिबांना जमिनी द्यायच्या आहेत. मातेची व पुत्राची जी ताटातूट झाली आहे ती दूर करून मला त्यांचा संबंध जोडायचा आहे. जो जो म्हणून शेतावर मेहनत करणार आहे त्याला जमीन मिळालीच पाहिजे.’ भूदान म्हणजे फक्त जमिनीचे वाटप नव्हते. याबाबत विनोबांनी स्पष्ट सांगितले, ‘या कामाचे नाव भूदान यज्ञ असे आहे. केवळ भूदान नव्हे. दान केवळ श्रीमंत करतात तथापि यज्ञामधे प्रत्येक व्यक्तीला सहभागी होता येईल आणि तसेच झाले पाहिजे. भूदान यज्ञ हे एक अहिंसक क्रांतीचे काम आहे.’


कम्युनिस्टांचा प्रभाव ओसरावा म्हणून काँग्रेसने भूदानाचा पुरस्कार केला, अशी टीका आजही होते. विनोबांनी अत्यंत स्पष्टपणे भूदान यज्ञाचा हेतू सांगितला. ‘तेलंगणामधे कम्युनिस्टांचा उपद्रव होता म्हणून जमिनी मिळाल्या, अशी आपण कल्पना करून बसलो तर हिंदूस्थानामधे अहिंसक क्रांतीची आशा सोडावी लागेल.’ भारतात चीन आणि रशियासारखी क्रांती होणार नाही, असे त्यांचे मत होते. ‘बाळाला भूक लागते तेव्हा परमेश्वर आईच्या स्तनात दुधाची योजना करतो. जो ईश्वर मला भूदान मागण्याची प्रेरणा देतो आहे, तोच ईश्वर समोरच्याला प्रेरणा देईल. जमिनीचे न्याय्य वितरण ही काळाची गरज आहे.’


‘देशात पाच कोटी भूमिहीन आहेत. ३० कोटी एकर जमीन लागवडीखाली आहे. त्या जमिनीचा सहावा हिस्सा मला हवा आहे. राजाला सहावा हिस्सा देण्याचा आपला जुना प्रघात आहे. आजचा राजा आहे गरीब जनता. त्याच्याकरिता पाच कोटी एकर जमीन द्या.’


‘माझा हा प्रजासूय यज्ञ आहे. यात प्रजेला राज्याभिषेक होईल आणि मी या यज्ञाचा घोडा म्हणून सर्वत्र फिरतो आहे. प्रजेच्या राज्यात प्रत्येकाला आपल्यासाठी काही होत आहे, याची जाणीव होणे म्हणजे सर्वोदय.’

‘या यज्ञात केवळ दान महत्त्वाचे नाही. तर त्याची म्हणजे जमिनीची समान विभागणी देखील महत्त्वाची आहे. दानं संविभाग: जो भूमिहीन आहे त्याचा प्रथम उद्धार झाला पाहिजे. हेच अंत्योदयाचे तत्त्व आहे.’या दान मंत्रांचा आणि विनोबांच्या समग्र चिंतनाचा कळस म्हणजे जय जगत्.


🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com

===========================

संकलन: सुनील द.महामुनी, भूम

दिनांक- २५ नोव्हेंबर २०२२

Wednesday, 23 November 2022

समाधिस्थ समूह

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖 समाधिस्थ समूह


विनोबा भूदानात लोकांशी सतत संवाद साधत. त्यात अभ्यास, कळकळ आणि क्रांतिकारी विचार असत. त्यांचा हा संवाद संकलित करणे ही एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे. त्यातील बराच भाग संकलित झाला असला आणि त्यावर संशोधन झाले असले तरी हे काम काही पिढय़ांचे आहे. आजही एखाद्या वाडी वस्तीवर गीता प्रवचने दिसतात. ती ज्ञानेश्वरीसोबत आढळतात. एक मोठा समूह या यज्ञात सहभागी झाल्याच्या या खुणा आहेत. भूदानात फक्त ठरावीक गटाने जमीन द्यावी आणि काहींनी ती घ्यावी हे विनोबांना नामंजूर होते. हा यज्ञ आहे आणि त्यात प्रत्येक व्यक्तीचा सहभाग हवा हा त्यांचा आग्रह होता. मुळात त्यांना जमीन ‘देणे’ ही गोष्टही नामंजूर होती. तो गरिबांचा अधिकार आहे, असे सांगून त्यांनी दान शब्दातून येणाऱ्या नकारात्मकतेला छेद दिला.

विनोबांच्या या व्यापक चिंतनाला रामकृष्ण परमहंसांच्या जन्मगावी म्हणजे कामारपुकूर येथे नेमके रूप मिळाले. भूदान यात्रा तिथे गेली आणि त्या अनुषंगाने झालेल्या संवादात विनोबा म्हणाले, ‘रामकृष्ण परमहंस अत्यंत सहजपणे समाधी अवस्थेत जात. आपल्यासमोरचे आव्हान आणखी मोठे आहे. आपल्याला सामूहिक समाधी अवस्था गाठायची आहे.’ विनोबांना योग, समाधी यांचे कालसुसंगत आणि व्यापक अर्थ अभिप्रेत असत. आठ तास शरीरपरिश्रम ही विनोबांच्या लेखी योगसाधनेची पूर्वअट होती. खुद्द रामकृष्ण परमहंसांचे तमाम अध्यात्म भूतमात्रांच्या सेवेत लोपले होते. विनोबांच्या सामूहिक समाधीमध्ये रामकृष्ण आणि गांधीजींचा अनोखा मेळ दिसतो. जे गुण व्यक्तीच्या ठायी असावेत असे वाटते ते सामूहिक पातळीवर आले पाहिजेत हा विनोबांचा आग्रह होता. गांधीजींनी आश्रमाचे नियम केले, ते जुन्या काळी व्यक्तिगत आध्यात्मिक साधनेचे नियम होते. रामकृष्णांनी आपली व्यक्तिगत साधना सर्वधर्मसमन्वयासाठी आणि मानवसेवेसाठी खर्ची घातली. एवढेच नव्हे तर त्यांनी विवेकानंदांनाही तोच मंत्र दिला. भूदान यज्ञ हा सामूहिक समाधीचा सर्वोच्च आविष्कार होता.

भूदान यज्ञाने परंपरेचे जतन झाले, तसेच त्यामुळे दोन आधुनिक मूल्यांना गती मिळाली. पहिले आर्थिक समत्वाचे मूल्य होते. आर्थिक समता साधत असताना व्यक्तीची प्रतिष्ठा उंचावेल याची काळजी घेतली गेली. समता आणि प्रतिष्ठा यांचा एकत्रित आढळ म्हणजे बंधुता. प्रतिज्ञेतील हे मूल्य भूदानामुळे प्रतिष्ठित झाले. याचे विविध पातळय़ांवर चांगले परिणाम झाले. मात्र त्यांचा क्रमश: विसर पडला. हा केवळ जमिनीसाठीचा कार्यक्रम नाही तर तो अहिंसक क्रांतीचा प्रयत्न आहे, हे विनोबांनी कितीही वेळा सांगितले असले तरी ही पदयात्रा तेवढय़ापुरतीच पाहिली गेली.

ही कोंडी सामान्य जनतेनेच फोडली. विनोबांना एकाही ठिकाणी भूदानाला नकार मिळाला नाही. कारण जनतेला विनोबांच्या प्रयत्नांचे मोल समजले होते. भूदानाशी जोडलेले असंख्य पवित्र प्रसंग भूदानाबाबत जनतेचे प्रगल्भ आकलन दाखवणारे आहेत. केवळ एखादी व्यक्ती, ठरावीक पक्ष किंवा निव्वळ प्रतिक्रियात्मक कार्य भूदान यज्ञाला जन्म देऊ शकत नाही. ‘स्व’चे विसर्जन आणि समूहाचे सर्जन त्यासाठी अत्यावश्यक असते. भूदानाचा हा शाश्वत संदेश आहे.


🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संकलन:सुनील द. महामुनी, भूम

दिनांक- २४ नोव्हेंबर २०२२

Tuesday, 22 November 2022

करुणेचा सार्थवाह

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖करुणेचा सार्थवाह


भारताच्या प्राचीन आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहासात ‘सार्थवाह’ ही संकल्पना महत्त्वाची आहे. ‘सार्थ’ म्हणजे योग्य वा नेमका आणि ‘वाह’ म्हणजे नेणारा किंवा वहन करणारा. भारतात आणि या उपखंडातील व्यापारी समूहांना या सार्थवाहांचा मोठा आधार वाटे. बौद्ध धर्मात या समूहांचे धार्मिक आणि आर्थिक योगदान दिसते. सार्थवाहांनी व्यापारी संस्कृती विकसित केली तर संतांच्या पदयात्रांनी सद्विचारांचा प्रसार केला.


भूदान यज्ञ हा या उभय क्षेत्रांचा मेळ होता. सत्य, प्रेम आणि करुणेचा संदेश देत असताना लोकांना उपजीविकेचे साधन देणेही आवश्यक होते. तरच साम्ययोगाचे पूर्णरूप अवतरणार होते. आकडेवारीच्या अंगाने भूदान यज्ञाचा आढावा घेतला तर तो आकडा पाहून स्तिमित होण्याखेरीज वेगळी प्रतिक्रिया देणे अतिशय कठीण आहे. ७ मार्च १९५१ रोजी विनोबांना पहिले भूदान मिळाले. त्यानंतर १३ वर्षे ते पायी फिरत होते. ६ एप्रिल १९६४ रोजी ते पुन्हा सेवाग्रामला आले. या काळात त्यांची जवळपास ४७ हजार मैल एवढी पदयात्रा झाली. दानात त्यांना ४७ लाख ६३ हजार ६७६ एकर जमीन मिळाली. याचा अर्थ एक मैल चालल्यानंतर त्यांना सरासरी एक हजार एकर जमीन मिळाली होती.


विनोबांना मिळालेल्या एकूण जमिनीपैकी २४ लाख ४४ हजार २२२ एकर जमिनीचे भूमिहीनांमध्ये वाटप झाले. पुढे कमाल जमीन धारणा कायदा आला आणि सरकारने पहिल्या टप्प्यात २५.६४ लाख एकर जमीन अधिग्रहित केली. यातील बरीचशी जमीन पडीक होती. बऱ्याच जमिनी तंटय़ातील होत्या. सरकारने ताब्यात घेतलेल्या जमिनींपैकी ११.७८ लाख एकर जमिनीचे वाटप झाले. याउलट भूदानात मिळालेल्या जमिनींपैकी सन १९७० पर्यंत १२.१६ लाख एकर जमिनीचे वाटप करण्यात आले. हा आकडा कायद्याने वितरित केलेल्या जमिनीपेक्षा अधिक आहे. कायदा आणि कत्तल हे प्रश्न सोडवण्याचे मार्ग नव्हेत. करुणेच्या मार्गाने प्रश्न सुटतात हा विनोबांचा विचार होता. सरकारने तो स्वीकारला नाही. तथाकथित बुद्धिजीवी मंडळी त्यातील उणिवा शोधत राहिली. त्यांच्या या कृतीवर मौन बाळगणेच ठीक.


भूदानाच्या तीन देणग्या मात्र बदलणे अशक्य आहे. एक- विनोबांच्या भूदानाला अधिक व्यावहारिक आणि तार्किक पर्याय देणे कुणाला जमले असे दिसत नाही. भूदानाचे वैश्विक योगदान गाठणे तर फार दूर. दोन- कायदा आणि कत्तल या दोन्हींचा वापर फोल आहे. हिंसेपेक्षा कायदा बरा इतकेच. आणि तीन- सत्य, प्रेम आणि अहिंसेचा मार्ग कळकळीने दाखवणाऱ्या माणसाबरोबर सर्वसामान्य जनताही तो मार्ग आपलासा करते. त्यामुळे विनोबांनी जमीन मागितली आणि जनतेने ती दिली नाही, असे घडल्याचे एकही उदाहरण नाही. स्वतंत्र भारताला शांतता आणि अहिंसेच्या मार्गावर स्थिर करणे हा भूदानाचा सखोल अर्थ आहे. त्यामुळे अशांततेकडून करुणेकडे घेऊन जाणारा सार्थवाह विनोबांचे योगदान किमान काही काळ तरी विसरणार नाही.


🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com


===========================

संकलन: सुनील द.महामुनी, भूम

दिनांक- २३ नोव्हेंबर २०२२

तोडी भवपाश पांडुरंगे

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖 तोडी भवपाश पांडुरंगे


तूं माझी माउली मी वो तुझा तान्हा।

पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे॥

तूं माझी गाउली मी तुझें वासरूं।

नको पान्हा चोरूं पांडुरंगे ॥

तूं माझी हरिणी मी तुझें पाडस।

तोडी भवपाश पांडुरंगे॥

तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज।

चारा घाली मात्र पांडुरंगे॥

कासवीची दृष्टी सदा बाळावरी।

तैसी दया करीं पांडुरंगे॥

नामा म्हणे विठो भक्तीच्या वल्लभा।

मागें पुढें उभा सांभाळिसी॥

संत नामदेवांवर विनोबांचे विशेष प्रेम होते. विनोबा त्यांचे वर्णन प्रेमळ संत असे करत. भूदान यात्रेत नामदेवांच्या भक्तीचे आणि प्रेमाचे स्मरण विनोबा सतत करत असत. या यात्रेत माझ्यापुढे नामदेव चालत होते असे विनोबांचे म्हणणे होते. या यात्रेत तब्बल १९ हजार ४३६ एकर जमिनीचे दान घेऊन ठरल्याप्रमाणे विनोबा दिल्लीला पोहोचले. तिथे त्यांचा मुक्काम ११ दिवस होता. या काळात त्यांची नियोजन मंडळाच्या सदस्यांशी चर्चा झाली.

प्रत्येकाला काम, ग्रामोद्योगांना चालना, शेतीसुधारणा, गोवंश हत्याबंदी आणि मूलभूत शिक्षण पद्धती या पाच गोष्टी नियोजन मंडळासमोर ठेवल्या. तथापि मंडळाने त्यांचा स्वीकार केला नाही. विनोबांचा दिल्ली दौरा निष्फळ ठरला.अखेरीस २५ नोव्हेंबर १९५१ रोजी त्यांनी दिल्ली सोडली. भूदान हे एकमात्र ध्येय ठेवून आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी पदयात्रा सुरू ठेवली. भूदानाचे कार्य म्हणजे ईश्वराची आज्ञा आहे, हे त्यांनी अंतर्मनातून स्वीकारले होते. त्यामुळे भूदानाचा पराभव हा प्रत्यक्ष परमेश्वराचा पराभव असेल, अशी भूमिका त्यांनी घेतली.

भूदानामध्ये दान महत्त्वाचे होते तसे विभागणीलाही महत्त्व होते. ‘दा’ धातूचा एक अर्थ देणे असा आहे तर दुसरा अर्थ तोडणे असा आहे. आपल्याजवळची चांगली गोष्ट तोडून दुसऱ्याला देणे म्हणजे दान. भूमी ही चांगली वस्तू आहे तर तिचा सहावा हिस्सा आपल्याच बांधवांना देणे हा भूदानाचा नेमका अर्थ आहे. ही परंपरा गौतम बुद्ध आणि शंकराचार्याची. दान म्हणजे सम विभाग आणि दान म्हणजे सम्यक् विभाजन ही दोन सूत्रे दोन परंपरांचे प्रतिनिधित्व करणारी आहेत. विनोबांनी या दानाला भूमीचे परिमाण जोडले आणि ही दान परंपरा विशाल झाली. महाकाव्ये आणि संतवचनांच्या आधारे ते दानाचा महिमा सांगत.

भूदानात विनोबांची आणि जनतेची हृदये उचंबळून येणारे कित्येक प्रसंग दिसतात. अशा क्षणी विनोबा फक्त प्रार्थना करत. देवाचे बळ या कामाच्या पाठीशी उभे आहे असे मी प्रतिक्षणी अनुभवतो आहे. मी प्रार्थना करतो की, ‘लोक मला जमीन देवोत वा न देवोत. तुझी इच्छा असेल तसे होऊ दे. पण माझे तुझ्याजवळ एवढेच मागणे आहे की मी तुझा दास आहे. माझे अस्तित्व नाहीसे कर. नाव पुसून टाक. तुझेच नाव जगात चालो. तुझेच नाव राहो. जे काही राग, द्वेष आदी विकार माझ्या मनात असतील त्या सर्वातून तू या बालकास मुक्त कर!!’


🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com

===========================

संकलन: सुनील द. महामुनी, भूम

दिनांक- २२ नोव्हेंबर २०२२

Sunday, 20 November 2022

लोकभाषेत साम्यसंवाद

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖लोकभाषेत साम्यसंवाद



तेलंगणाहून विनोबा पवनारला परत आले. त्यांच्यासमोर भूदानाच्या रूपाने सामाजिक समत्वाचा नवा मार्ग विस्तारला होता. साम्ययोगाचे आर्थिक आणि सामाजिक रूप भूदानातून गवसेल याची विनोबांना पूर्ण खात्री होती. साम्यवाद्यांचा विरोध नव्हे तर साम्ययोगाची प्रस्थापना हे त्यांचे ध्येय होते. शत्रूवर प्रेम करून त्याची दुष्ट बुद्धी नष्ट करणारी समाजरचना साम्ययोगाशिवाय उभी राहणार नव्हती.


अशातच पहिली पंचवार्षिक योजना जाहीर झाली. शासनव्यवस्था जनतेला दिलासा देणार नाही याची विनोबांची खात्री झाली. सरकारला शेतीपेक्षा उद्योगांची निर्मिती अधिक महत्त्वाची होती. खेडय़ांना उपेक्षित ठेवून या देशाचा विकास होणार नाही ही गांधीजी आणि विनोबा या दोहोंची विचारसरणी होती. त्यामुळे साहजिकच विनोबांचा अपेक्षाभंग झाला.


विनोबांची नाराजी नेहरूंपर्यंत पोहोचली. नियोजन मंडळासमोर आपले विचार ठेवण्यासाठी विनोबांना दिल्लीला येण्याचे निमंत्रण नेहरूंनी दिले. विनोबांनी ते स्वीकारले पण दिल्लीला पायी येणार असल्याचा आपला निश्चय कळवला. १२ सप्टेंबर १९५१ रोजी विनोबा दिल्लीच्या दिशेने मार्गस्थ झाले. पायी जाण्याचे मुख्य कारण भूदान होते. प्रत्येक ठिकाणी काही तेलंगणसारखी परिस्थिती नव्हती. त्यांच्या दृष्टीने भूदान म्हणजे केवळ जमीन देण्या-घेण्याचा कार्यक्रम नव्हता तर तो अिहसक क्रांतीचा मार्ग होता. गांधीजींच्या पश्चात अवघ्या तीनच वर्षांत अिहसात्मक क्रांतीच्या चक्राला विनोबा गती देत होते.


या पदयात्रेत ते लोकांशी संवाद साधत. भूदानाचे तत्त्वज्ञान लोकांना अगदी सोप्या भाषेत सांगत. ‘सूर्य घरोघर जातो त्याचा प्रकाश राजाला मिळतो तितकाच सफाई कर्मचाऱ्यालाही. परमेश्वर आपल्या वस्तूंची कधी विषम वाटणी करत नाही. त्याने हवा, पाणी, प्रकाश आणि आकाश यांच्या वाटणीत भेदभाव केला नाही. मग जमीनच तेवढी मोजक्या लोकांच्या हाती राहावी असे तो कसे करील? म्हणून मला वाटते की तुम्ही तुमच्या जमिनीवरील मालकी सोडायला हवी.’


विनोबांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. तेलंगणच्या यात्रेत विनोबांना रोज सरासरी २०० एकर जमीन मिळाली होती. दिल्ली यात्रेत हा आकडा सरासरी ३०० एकरांचा होता. खरे तर यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते आणि नाही. कारण इथल्या जनतेने नेत्यांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. धन हवे धन. जीव हवा जीव, पण ही गुलामी नको अशी त्यांची स्वातंत्र्यलढय़ातील धारणा होती.आता विनोबा सुराज्यासाठी जमीन मागत होते. आपल्याकडून जमीन घेऊन हा माणूस स्वार्थासाठी ती वापरणार नाही. तिचे फेरवाटप करून या समाजाचे हितच करेल हे लोकांना नव्याने सांगण्याची गरज नव्हती. त्यामुळे भूदानाला गती येणार हे उघड होते.


श्रद्धा आणि बुद्धी यांच्या ऐक्यातून समाजरचनेचे भव्य रूप नजरेसमोर ठेवून जीवन वेचणे हा सत्पुरुषांचा स्वभाव असतो. माउलींना ‘ब्रह्मविद्येचा सुकाळु’ करायचा होता. नामदेवांना प्रेमस्थापना करायची होती. नाथ जबाबदार समाजाचे स्वप्न पाहात होते. तुकोबा अखिल विश्वात साम्यस्थापना कशी होईल हे पाहात होते तर समर्थाना आनंदवनभुवन हवे होते. याचप्रमाणे, विनोबांना समग्र साम्ययोग जागवायचा होता.


🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com


===========================

संकलन: सुनील द.महामुनी, भूम

दिनांक- २१ नोव्हेंबर २०२२

Wednesday, 16 November 2022

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖 भूदान गंगेचे प्रवर्तक

गीताईची रचना करताना विनोबांना पाचव्या अध्यायाने अडवले. कर्म श्रेष्ठ की संन्यास हा प्रश्न त्यांना उलगडत नव्हता. शेवटी या दोहोंमध्ये फरक नाही हे त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी गीताईच्या लिखाणास आरंभ केला. त्यांच्या नि:शंकतेचे प्रतिबिंब पुढील श्लोकात दिसते.

कर्मी अकर्म जो पाहे

अकर्मी कर्म जो तसें


तो बुद्धिमंत लोकांत

तो योगी कृत-कृत्य तो

भूदानाच्या आरंभी ते पुन्हा एकदा पेचात पडले. जमीन मागणारे, ती मागणी पुढे नेणारा आणि तिची पूर्तता करणारा सगळेच परस्परांसाठी अनोळखी होते. प्रश्न आर्थिक होता आणि तो सोडवण्याचा मार्ग नैतिक. रामचंद्र रेड्डी यांना इतक्या सहजपणे जमीन द्यावी असे वाटणे या कृतीचा अर्थ काय होता? विनोबा प्रश्नांकित झाले. रात्रभर ते या घटनेचा अर्थ शोधत होते, पण तो मिळत नव्हता. भूदान मागावे की नाही हा प्रश्न निरुत्तरित होता.

हे अजब आणि अवाढव्य दान मागण्याची क्षमता आपल्यात आहे का? आपण ना कुठल्या संस्थेचे सदस्य ना आपल्याला राजकीय पक्षाचा पाठिंबा. सहकाऱ्यांना विचारावे तर कोण हो म्हणणार? जमिनीचा प्रश्न सुटावा असे मला वाटते तर त्यासाठी तुमच्यातील किती जण दान देतील, इतक्या थेटपणे मागणी करावी लागणार होती. यासाठी किती जमीन लागणार होती तर ५ कोटी एकर! विनोबांना त्याक्षणी आपण शक्तिशून्य आहोत, हे प्रकर्षांने जाणवले.


कैसें माझें श्रेय होईल सांगा

पायांपाशीं पातलों शिष्य-भावें

हा गीताईतील श्लोक त्यांनी अंतरंगीच्या कृष्णासमोर नक्की मांडला असणार.

त्याचवेळी उमगले की हा दैवी संकेत असून परमेश्वराचा आदेश आहे. आपण भले शक्तिशून्य असू पण ‘विश्वासशून्य’ नाही. या घटनेचा अर्थ आपण समजलो नाही तर अहिंसेवर आपला विश्वास नाही असे होईल. ही अवस्था विनोबा नाकारणार हे उघड होते. गांधीजींच्याकडे आल्यापासून धारण केलेले अहिंसेचे व्रत असे सोडून द्यायचे? ते शक्य नव्हते.

अखेरीस त्यांना उमगले की विश्वशक्ती आपल्याकडून काही काम करवून घेत आहे. आपण ते नाकारणे ही आत्मवंचना होईल. यापुढे पदयात्रा करत भूदान मागायचे. त्याक्षणी विनोबा शांत झाले. त्यांनी रामाचे नाव घेतले आणि त्यांना गाढ झोप लागली.

दुसऱ्या दिवशीच्या सभेत त्यांनी बापाकडे मागावी तशी गावकऱ्यांकडे जमीन मागितली. मीही भूमिहीन आहे शिवाय तुमचा मुलगा आहे, मला माझा हिस्सा द्या. हे म्हणताना आणि ऐकताना श्रोत्यांना आणि वक्त्याला अश्रू अनावर होत होते. विनोबांनी, भूमिहीनांनी आणि उदारहृदयी ग्रामस्थांनी भगीरथ प्रयत्नाने भूदान गंगा आणली. गाव ‘शिवा’ने ती धारण केली. शिव, शिवगण आणि शिवभक्त सारे त्या गंगेने शांतावले. सारे तिचे सारखेच प्रवर्तक होते. हे साम्ययोगाचे आणखी एक रूप.

भूदानाचे हे तत्त्वज्ञान पाहिले की त्या यज्ञाच्या मूल्यमापनाचे आयाम बदलतात. तरीही या यज्ञाचे आर्थिक फलित नाकारण्याची आवश्यकता नाही. ते महत्त्वाचे आहेच.

🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संकलन: सुनील द.महामुनी, भूम

दिनांक- १७ नोव्हेंबर २०२२

सत्य संकल्पाचा दाता नारायण

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖 सत्य संकल्पाचा दाता नारायण


सत्य संकल्पाचा दाता नारायण।


सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥


भावबळें फळ इच्छेचें तें ॥ध्रु.॥


अंतरींचें बीज जाणे कळवळा।


व्यापक सकळां ब्रम्हांडाचा ॥२॥


तुका म्हणे नाहीं चालत तांतडी।


प्राप्त काळ घडी आल्याविण ॥३॥


– संत तुकोबा


पोचमपल्लीमधील लोकांनी ८० एकर जमिनीची मागणी केली. विनोबा म्हणाले, ‘एवढी जमीन तुम्हाला मिळवून दिली तर तुम्ही ती सामुदायिक पद्धतीने कसाल का? कारण प्रत्येकाला जमिनीचा स्वतंत्र तुकडा देता येणार नाही. या प्रस्तावात आणखी एका क्रांतिकारी कल्पनेचे बीज होती. ही कल्पना म्हणजे ग्रामदान. जमीन समूहाच्या म्हणजे गावाच्या मालकीची होणार असल्याने ती विकणे अशक्य होणार होते. भूमी, ग्राम, प्रखंड असे समग्र दान विनोबांनी मागितले त्याचे बीज कळत नकळत पोचमपल्ली येथे पेरले गेले.


विनोबांचा प्रस्ताव गावकऱ्यांनी स्वीकारला आणि विनोबांनी तो सरकारकडे मांडण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले. तथापि, ते मनातून साशंक होते. कारण यापूर्वी सरकारने जमिनीच्या प्रश्नावर त्यांना दिलेले आश्वासन पाळले नव्हते. तो प्रश्न निर्वासितांना जमीन देण्याचा होता. ते भूमिहीन दलित बांधव होते आणि त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी नेहरू आणि राजेंद्रप्रसाद यांनी घेतली होती. तरीही विनोबांना दिलेल्या वचनाची पूर्तता झाली होती. पोचमपल्लीच्या भूमिहीनांच्या वाटय़ाला निराशा येऊ नये म्हणून विनोबांनी गावकऱ्यांकडून आणखी अपेक्षा केली.


सरकारने हे वचन पाळले नाही किंवा उशीर केला तर गावपातळीवर काही व्यवस्था होऊ शकेल का? रामचंद्र रेड्डी या यज्ञात दानाहुती देण्यासाठी उभे राहिले. या लोकांना जमीन द्यावी अशी आमच्या वडिलांची इच्छा होती तेव्हा आम्ही पाच भाऊ मिळून शंभर एकर जमीन या बांधवांना देऊ, असे त्यांनी लिखित स्वरूपात कळविले. जगाच्या आणि देशाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण होता आणि विनोबांच्या दृष्टीने ‘ईश्वरी साक्षात्कार’. त्या रात्री त्यांना झोप आली नाही. हे कार्य ईश्वराचे आहे आणि ते कार्य तो आपल्या माध्यमातून करून घेतो आहे, हे विनोबांच्या ध्यानी आले. नंतरच्या काळात, ‘भूदानाला अपयश आले तर तो परमेश्वराचा पराभव असेल’ या त्यांच्या उद्गारला पोचमपल्लीचा संदर्भ होता.


विनोबांच्या या कृतीमध्ये राजकारण होते का? याचे उत्तर होकारार्थी असेल. या युगात राजकारण टाळता येणार नाही. राजकारण करावे पण ते गुप्त ठेवावे हा समर्थाचा उपदेश त्यांचा आदर्श होता. मानवी समाज, अहिंसक आणि साम्याधिष्ठित रूपात असावा आणि त्यांच्या वाटय़ाला पाशवी दु:ख येऊ नये हे त्यांचे व्यापक राजकारण होते. काँग्रेसविषयी त्यांना आपुलकी वाटणे स्वाभाविक होते, परंतु त्यांनी या पक्षाची भलामण कधीच केली नाही. पुढे भूदानापेक्षा पहिली निवडणूक महत्त्वाची आहे हे सर्व नेत्यांनी त्यांना दाखवून दिले. यावर सूर्य नेहमी एकाकी चालतो आणि एकला चलो रे ‘भाग्यवान’ अशी भूमिका घेत विनोबा सामाजिक साम्य स्थापनेसाठी वाट तुडवत राहिले. संतांचा संकल्प मुळात ईश्वराचा संकल्प असतो. त्यामुळे संत संकल्प करतात तेव्हा देवाला त्यांना बळ द्यावेच लागते.


🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संकलन: सुनील द.महामुनी, भूम

दिनांक- १६ नोव्हेंबर २०२२

Tuesday, 15 November 2022

भक्त भू-माउलीचे मैत्र जीवांचे

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖भक्त भू-माउलीचे मैत्र जीवांचे



कोणाच़ा न करी द्वेष दया मैत्री वसे मनीं


मी माझें न म्हणे सोशी सुख-दु:खें क्षमा-बळें

    – गीताई


‘माउली’ शब्द रूढ केला तो ज्ञानोबांनी. ज्ञानेश्वरीमध्ये या शब्दाचा इतका वैविध्यपूर्णरीतीने आणि नितांत सुंदर उपयोग आहे की एका ठिकाणी ज्ञानदेवांनी आत्म्यालाच ‘माउली’ संबोधले आहे. जगातील कोणत्याही साहित्यामध्ये आत्म्याला माउली म्हटलेले नाही, हा विनोबांचा निर्वाळा आहे. ज्ञानदेवांपासूनचा हा शब्द म्हणजे भागवत धर्माची महत्त्वाची ओळख आहे.


विनोबांनी ही परंपरा भूदान यज्ञाच्या निमित्ताने आणखी पुढे नेली. जमीन ही आई आहे आणि प्रत्येकजण तिचे बाळ आहे. त्यामुळे कुणालाही जमिनीपासून दूर ठेवता येणार नाही. विनोबांनी गीताईप्रमाणेच भूमिलाही माउली म्हटले आणि साम्ययोग सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातही प्रस्थापित झाला.भूदानाच्या संदर्भात मिळालेल्या जमिनीइतकाच हा सांस्कृतिक वारसाही महत्त्वाचा आहे. यासाठी पोचमपल्ली येथे काय घडले हे पाहायला हवे.


१८ एप्रिल १९५१ रोजी सकाळी विनोबा पोचमपल्ली इथे पोहोचले. गाव तीन हजार लोकवस्तीचे. विणकर आणि दलितांचे. तीन हजारांतील दोन हजार लोक भूमिहीन होते. व्यसन आणि बेरोजगारी यांच्या विळख्यातील हे गाव कम्युनिस्टांचा दहशतीखाली होते. विनोबा गावात पोहोचले आणि त्यांनी प्रथम दलित वस्तीला भेट दिली. तिथल्या एका घरात एक बाळ आणि त्याची आईच विनोबांना दिसली. त्यांनी बाळाला उचलून घेतले. त्या आईने बाळासह विनोबांचे दर्शन घेतले. विनोबा घराबाहेर आले. तेवढय़ात स्थानिक लोकही आले. एक शांत संवाद सुरू झाला. सर्वासाठी हा सुखद क्षण होता. लोक आपल्या अडचणी विनोबांना सांगू लागले. रोजगार, शिक्षण, घर अशा अडचणी सांगितल्या.


या दलित मंडळींची महत्त्वाची मागणी जमिनीची होती. जमीन नसल्याने त्यांना जमीनदारांकडे जावे लागे. मजुरी म्हणून त्यांना उत्पन्नाचा विसावा हिस्सा, एक कांबळे आणि पायताणाचा एक जोड मिळे. इतक्या कमी मजुरीमध्ये उपाशी राहून ते शेतकाम करत. तुम्हाला किती जमीन हवी असे विनोबांनी त्यांना विचारल्यावर त्यांनी ८० एकरांचा आकडा सांगितला. विनोबांनी प्रश्न ऐकून घेतले पण त्याक्षणी त्यांच्याकडे उत्तरे नव्हती. थोडेफार उपाय सांगायचे, सरकारकडे विनंती करू, असे आश्वासन द्यायचे इतकेच त्यांच्या हाती होते. विनोबा आपले प्रश्न सोडवतील ही लोकांची खात्री होती, तर भारतीय संस्कृतीतील सत्कृत्याची परंपरा आपला बचाव करेल असा विनोबांचा विश्वास होता. त्यानंतर घडला तो इतिहास होता.


भारतीय संस्कृतीने त्या लेकरांना निराश केले नाही. रामचंद्र रेड्डी यांच्या हातून पहिले भूदान झाले. केवळ जमीन दिली आणि घेतली असा हा प्रकार नव्हता. त्या दानात एक प्रकारचा सन्मान होता. देणारा आणि घेणारा दोघेही आत्मोन्नतीच्या दिशेने पुढे जात होते. मित्रांनी मिळून सहजपणे एखादा प्रश्न सोडवावा तसे या प्रसंगी झाले होते. सख्य भक्तीचे हे दर्शन आज विशेषत्वाने आठवते कारण आज विनोबांचा स्मृतिदिन आहे. तो ‘मैत्री दिन’ म्हणून साजरा होतो. गीता, पसायदान आणि भूदान ही मैत्र दर्शने हा साम्ययोगाचा पाया आहे.


🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संकलन: सुनील द.महामुनी, भूम

दिनांक- १५ नोव्हेंबर २०२२

Sunday, 13 November 2022

भूदान भागवत

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖 भूदान भागवत



‘‘सगळय़ा जगात अंधार दाटला आहे. आपल्या देशातही जुना प्रकाश मंदावला आहे. एकूणच अंधारले आहे. मोठाले प्रश्न ‘आ’ वासून उभे आहेत. अशा काळात प्रकाशाचा शोध घेणे हे आपले सगळय़ांचे कर्तव्य आहे. अशा वेळी सर्वोदयच मदतरूप होऊ शकतो. त्याकडेच आमचे डोळे लागले आहेत.’’ – पं. जवाहरलाल नेहरू(शिवरामपल्ली येथे झालेल्या सर्वोदय संमेलनासाठी दिलेल्या संदेशातून,७ एप्रिल १९५१.)


भागवत धर्म म्हणजे काय याची व्याख्या करताना विनोबा म्हणतात, ‘‘भक्त, नाम आणि ईश्वर यांचे ऐक्य म्हणजे भागवत धर्म.’’ तसे विनोबांचे चरित्र म्हणजे काय? ‘विरक्ती, सत्संगती आणि सेवा’ या चरित्राला कप्पे नाहीत. विनोबा म्हटले की ही सांगड येतेच. त्यांच्या चरित्रातील तीन तपशील मात्र महत्त्वाचे आहेत. बनारस हिंदूू विद्यापीठातील गांधीजींचे भाषण, गीताई आणि भूदान यज्ञ.विनोबा आश्रमात आले. गांधीजींच्या निकट राहून ते प्रथम सत्याग्रही बनले. यातील प्रथम सत्याग्रहीवर अंमळ जास्त जोर दिला की गांधीजींचे ते भाषण आणि नंतरच्या भूदान यज्ञासाठीची विनोबांची तपश्चर्या या गोष्टी बाजूला पडतात.


यातील गांधीजींच्या बनारस विद्यापीठातील भाषणाचे मराठी रूपांतर इथेच येऊन गेले. गीताईचा यथाशक्य परिचय आला आणि येईलही. तिसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे भूदान यज्ञाचा आरंभिबदू. विनोबांच्या चरित्रांमधे त्याचा उल्लेख असतोच. यासाठी विनोबांनी कशी कार्यसाधना केली ते शिवाजीराव भावे लिखित विनोबा चरित्रात आढळते. प्रत्यक्ष भूदान सुरू झाले तेव्हा, त्या अनुषंगाने आलेले लिखाण प्राय: भावनिक आणि मूल्यमापनाची अजब घाई करणारे असल्याचा अनुभव येतो. अर्थात ती घटना आणि तो कालखंड समाज ढवळून काढणारा होता त्यामुळे अशा प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते.


आजही भूदानाची समग्र नोंद झाली असेल असे म्हणणे कठीण आहे. नवीन साधने सापडली की अध्ययन त्या अनुषंगाने बदलते. तथापि भूदान यज्ञाला आज जवळपास सात दशकांचा काळ लोटला आहे. भूदानाचे समर्थक आणि टीकाकार तटस्थ भूमिका घेतील असे वातावरण आहे आणि त्याचे प्रतिबिंब अलीकडच्या संशोधन साहित्यात दिसते.


यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे विनोबांच्या काही चरित्रांत अत्यंत तटस्थपणे या घटनेचे विवरण वाचायला मिळते. याचा वस्तुपाठ म्हणून विजय दिवाण लिखित विनोबांच्या चरित्राकडे पाहता येईल. या चरित्र पुस्तकातील भूदानाचा प्रसंग संशोधनाची शिस्त बाळगत आला आहे. त्याचा आणखी एक विशेष म्हणजे भूदानाच्या आरंभाची उत्कटता त्यांनी जराही कमी होऊ दिली नाही. प्रयोग आणि उत्कटता, श्रद्धा आणि प्रज्ञा, चिंतन आणि अंमलबजावणी यांचे व्यापक दर्शन म्हणजे भूदानाचा आरंभ आहे. ते भव्य आहे कारण ते अपार साधे. अगदी ‘गीताई माउली माझी’सारखे आहे. भूमी आणि भूमिपुत्र यांची ताटातूट थांबवणे हा भूदानाचा मुख्य भाग्य होता. भागवत धर्माची व्याख्या भूदानालाही लावली तर ‘भूमी, भूमिपुत्र आणि गोपाल’ यांचा समन्वय म्हणजे भूदान. मूळ भागवत विद्वानांची परीक्षा करते; तर हे भागवत, पंडित, भक्त आणि सेवक यांची पारख करते.


🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संकलन:सुनील द. महामुनी, भूम

दिनांक- १४ नोव्हेंबर २०२२

Friday, 11 November 2022

चिंतन साम्याचे नाम रामाचे

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖चिंतन साम्याचे नाम रामाचे


शस्त्र-वीरांत राम मी


– गीताई अ. १०


जो जनतेचे रक्षण करतो,


पोषण करतो, पालन करतो


तोच पिता साक्षात मानावा,


जन्म देइ तो निमित्त केवळ.


– रघुवंश प्रथम सर्ग श्लोक ३४


व्यास आणि कालीदास यांचे हे रूपांतरित काव्यांश आणि भूदान यांचा निकटचा संबंध आहे. विनोबांनी तशी योजना जाणीवपूर्वक केली नसेलही परंतु हा योग जुळून येणे, ही लक्षणीय गोष्ट आहे.


गांधी-विनोबांच्या आयुष्यात रामनाम, रामराज्य या संकल्पना श्वासोच्छ्वासाहून अधिक मोलाच्या होत्या. गीताईमध्ये वीर म्हणून कृष्णाने रामाचा उल्लेख केला आहे. गीताईसाठी विनोबांनी कालिदासाचा अनुष्टुप वापरला आहे. महाभारत, रघुवंश आणि भूदान यांचे नाते सखोल आहे. भूदान यज्ञ हा मानवतेच्या कल्याणार्थ होता. कल्याणकारी राज्य हे त्याचे एक ध्येय होते. अशा राज्याचा वस्तुपाठ रघुवंशाच्या प्रथम सर्गात कालिदासाने अत्यंत उचित शब्दांत मांडला आहे. या सर्गातील राजा दिलीपाचे शासन सांगताना कालिदास कल्याणकारी राज्याचे चिरंतन चित्र रेखाटतो..


प्रजानां विनयाधानात्


रक्षणात् भरणादपि।


स पिता पितरस्तासां


केवलं जन्महेतव: ॥


तेलंगणा प्रांतात मानवतेचे मंगल चिंतणारी भूदान यज्ञासाठीची पदयात्रा सुरू झाली तो दिवस श्रीरामनवमीचा होता आणि तारीख होती १५ एप्रिल १९५२. धार्मिक आणि सांस्कृतिक आयामांप्रमाणेच भूदानाला भौतिक पैलूही होते. पदयात्रेच्या सुरुवातीला विनोबा कैदेतील कम्युनिस्टांना भेटले. त्यांची दुर्दशा आणि तुरुंगांची वाईट स्थिती त्यांनी जाणून घेतली, ती दूर करण्याचे आश्वासन देत त्यांच्या हिंसक मार्गाविषयी चर्चा सुरू केली.


विनोबांची अशी भूमिका होती की निजामाच्या राजवटीतील हिंसा एकवेळ समजून घेता येईल, परंतु देश आता स्वतंत्र झाला आहे. तरीही हिंसेचा मार्ग का पत्करायचा? यावर, आम्हालाही हा मार्ग सोडायचा आहे तथापि अद्याप निर्णय झालेला नाही, अशी भूमिका साम्यवाद्यांनी घेतली. या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांची भेट घेण्याची मागणी विनोबांकडे केली. विनोबांनी ही मागणी सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवली पण याचा फायदा घेऊन अटक होईल, अशी प्रमुख नेत्यांना शंका आली आणि त्यांनी भेटीचा सोपस्कार नाकारला.


याच वेळी एक अनोखी आणि अंतर्मुख करणारी घटना घडली. चर्चा झाली त्यादिवशी गावकऱ्यांनी रामनवमीचा प्रसाद केला होता. तो स्वीकारण्याची विनंती त्यांनी कम्युनिस्ट बांधवांना केली आणि त्यांनी गावकऱ्यांची मागणी मान्य केली. प्रसादाऐवजी त्यांनी ‘भोजन’ घेतले असेल पण ही घटना सात दशकांपूर्वीचे सामाजिक सौहार्द सांगणारी आहे. इथे तुकोबांच्या-चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सर्प तया. या वचनाचे स्मरण होते. साम्ययोग्याचे प्रेम आणि साम्यवाद्यांची उत्कटता यांच्या ऐक्याचे याहून चांगले उदाहरण सापडणे कठीण. भौतिक जीवनाच्या छटा अशा एकरूप होतात आणि शेवटी परमसाम्यावस्थेत लीन होतात. हाच तो साम्ययोग.


🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संकलन: सुनील द.महामुनी, भूम

दिनांक- ११ नोव्हेंबर २०२२

Wednesday, 9 November 2022

मनांची मशागत

 🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता


📖मनांची मशागत


विनोबा, हिंसेने होरपळलेल्या तेलंगणमध्ये सर्वोदय संमेलनाच्या निमित्ताने गेले. ३० दिवस आणि ३५० मैलांची पदयात्रा केली. जिथे मुक्काम केला तिथल्या गावकऱ्यांची मने आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ७ एप्रिल, १९५१ रोजी ते शिवरामपल्लीला पोहोचले. या संमेलनासाठी देशभरातून कार्यकर्ते आले होते. संमेलनातील सर्व चर्चा जमीनदार आणि पोलीस व त्याच वेळी प्रत्युत्तर म्हणून सुरू असणारी कम्युनिस्टांची हिंसा याभोवती फिरत होती. या हिंसाचारात भूमिहीन आणि गरीब शेतकरी भरडले जात होते. कम्युनिस्टांना कसे रोखायचे यावर चर्चा सुरू होती.


विनोबांनी मात्र वेगळीच भूमिका घेतली. जमीनदारीमुळे साम्यवाद फोफावतो आहे, हे त्यांना मान्य नव्हते. जमिनीच्या प्रश्नावर अन्य कुणी काम करत नसल्याने या भागात कम्युनिझम फोफावतो आहे, असे ते म्हणाले. त्यांनी जमिनीच्या प्रश्नाची फेरमांडणी करताना सांगितले की, प्रत्येकाला शेतीत काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. न्यायाधीशांपासून भूमिहिनांपर्यंत सर्वानी शेतकाम केले पाहिजे. प्रत्येकाला जमिनीचा तुकडा देता येईल का, या प्रश्नावर विनोबांनी उत्तर दिले की ही गोष्ट शक्य आहे. नापीक जमीन घ्यायची आणि ती लागवडीयोग्य करायची हा त्यावरचा उपाय आहे आणि अशी जमीन कसणे हे खरे आव्हान आहे. त्या जमिनीच्या हस्तांतराची कायदेशीर प्रक्रियाही सोपी आहे.


भूदानामध्ये अनेकांनी नापीक जमिनी देऊन विनोबांची फसवणूक केली अशी टीका सर्रास होते. तथापि नापीक जमिनी नाकारायच्या नाहीत, अशी विनोबांची सुरुवातीपासूनची भूमिका होती. शिवरामपल्लीच्या या संमेलनाला स्वामी रामानंद तीर्थ उपस्थित होते. त्यांनी या भागातील दु:खद स्थिती विनोबांसमोर मांडली आणि तेलंगणात पदयात्रा करण्याची विनंती केली. विनोबा शिवरामपल्लीमध्ये एक आठवडा राहिले. परिसरातील दलित, भूमिहीन आदींशी त्यांनी चर्चा केली. त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि कम्युनिझमचा प्रभाव असणाऱ्या भागात पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सरकारची परवानगीही घेतली. विनोबांनी पदयात्रा सुरू केली तेव्हा हा भूभाग कसा होता?


हैदराबाद राज्यात एकूण जमीन ५ कोटी ६० लाख एवढय़ा जमिनीची नोंद होती. यापैकी ६० टक्के म्हणजे ३ कोटी जमीन मालगुजारांकडे होती. यातील ३० टक्के जमीन जागिरीची आणि १० टक्के जमीन निजामाची होती. परिणामी या भागातील शेतमजूर आणि गरीब शेतकरी गुलामीचे जीवन जगत असणार हे उघडच होते. जमिनीच्या व्यक्तिगत मालकीचा विचार केला तर १ लाख ते १० हजार एकर जमीन बाळगणारे जमीनदार होते. ही इथल्या भूमिहिनांची आणि गरीब शेतकऱ्यांची स्थिती होती.


अशा परिस्थितीत विनोबांनी हिंसा आणि सत्याग्रह यापेक्षा करुणा आणि प्रेम यांच्या आधारे भयभीत आणि आक्रमक जनसमूहांना शांत केले. विनोबांनी अव्यवहार्य मार्गाने जात जमिनीचा प्रश्न बोथट करून टाकला अशी टीका होते, परंतु त्या परिस्थितीत हिंसा अथवा अहिंसा यांचा शस्त्र म्हणून वापर करणे हे सर्वोदयाच्या तत्त्वज्ञानाविरुद्ध होते. विनोबांचे कृषी-तत्त्वज्ञान आर्थिक, राजकीय आणि आध्यात्मिक परिमाणांनी युक्त होते. भारतीय समाजमानसावर त्याचे दूरगामी परिणाम झाले.


🖊अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संकलन: सुनील द.महामुनी, भूम

दिनांक- १० नोव्हेंबर २०२२

बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर

 ▪️बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर                      महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आणि समाजसुधारणेच्या प्रदीर्घ इतिहासात कर्मवीर ...