शाळा

Showing posts with label पु. ल. प्रेम. Show all posts
Showing posts with label पु. ल. प्रेम. Show all posts

Monday, 19 July 2021

आठवणीतील गदिमा - पु.ल.

 आठवणीतील गदिमा - पु.ल.



पुण्याला 'बालगंधर्व' थिएटर उभे राहत होते,गोपाल देउसकरांच्या सुंदर चित्रांशी स्पर्धा करणार्‍या चार ओळी पाहिजे होत्या. पंचवटी गाठली. माडगूळकरांना म्हणालो, "स्वामी, चार ओळी हव्या आहेत ....बालगंधर्वाच्या पोट्रेटपाशी".मागणी संपायच्या आत माडगूळकर म्हणाले ,"असा बालगंधर्व आता न होणे." तेवढय़ात कुणीतरी आले. गप्पागोष्टी सुरु झाल्या. मी समस्यापूर्तीची वाट बघत होतो. तासाभरात निघायचे होते. त्या श्लोकाला चाल लावायची होती.

उदघाटन -समारंभाच्या प्रसंगी गाण्याच्या गीतांच्या तालमी चालल्या होत्या. त्यांत माडगूळकरांचे "असे आमुचे पुणे" होतेच. तालमीच्या ठिकाणी बाळ चितळे श्लोक घेऊन आला. सुरेख, वळणदार अक्षरात लिहिलेला. बकुळ पंडितला मी चाल सांगितली. रंगमदिराच्या उदघाटनाच्या वेळी रसिकांनी भरलेल्या प्रेक्षागारातले दिवे मंदावले.रंगमंचावर मांडलेल्या बालगंधर्वांच्या 'नारायण श्रीपाद राजहंस' आणि 'स्वयंवरातली रुक्मिणी' अशी दोन दर्शने घडवणार्‍या त्या अप्रतिम चित्रांवरचे पडदे दोन युवतींनी बाजुला केले , आणि लगेच माडगूळकरांच्या गीताचे गायन सुरु झाल्यावर रसिकांना कळेना , की त्या रंगशिल्पाला दाद दयावी की गीतातल्या शब्दशिल्पाला !. प्रेक्षागारात पुन्हा प्रकाश आला त्या वेळी त्या 'रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्' ह्या अनुभूतीने पर्युत्सुक झालेल्या रसिकांच्या खिशांतले शेकडो हातरुमाल अश्रू पुसत होते.

गीतांच्या जन्मकाळाशी गुंतलेल्या अशा किती आठवणी....

डेक्कन जिमखान्याच्या टेनिस कोर्टाजवळच्या रस्त्यातून जाताना एका विजेच्या खांबापाशी आलो की आठवते: रात्रीचे चित्रीकरण आटपून चालत आम्ही दोघे घरी येत होतो. पहाट होत होती,रस्त्यातले म्युनिसिपालटीचे दिवे मालवले.

त्या खांबापाशी क्षणभर थांबून माडगूळकर उदगारले,

"विझले रत्नदीप नगरात !"

"आता जागे व्हा यदुनाथ"

गीत भावनेच्या तादात्म्य पावण्याच्या त्यांच्या असंख्य खुणा त्यांच्या गीतातून आढळतात.शब्दयोजनेतले त्यांचे अवधान सुटत नाही. अशी शेकडो गीते त्यांनी रचली. चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिल्यामुळे आमच्या 'आर्डरी' ही विचित्र असायच्या. 'आर्डरी' हा त्यांचाच शब्द. कधीकधी चाल सुचलेली असायची.

"स्वामी,असं वळण हवं."

"फूल्देस्पांडे, तुम्ही बाजा वाजवीत राहावे".


मित्रांच्या नावांची गंमत करणे हा त्यांचा आवडता छंद असायचा. मग मधुकर कुळकर्ण्याला "पेटीस्वारी",राम गबालेला "रॅम् ग्याबल", वामनराव कुळकर्ण्यांना "रावराव"...कुणाला काय , कुणाला काय असे नाव मिळायचे. चाल पेटीवर वाजवत बसल्यावर चटकन त्या चालीचे वजन त्यांच्या ध्यानात येई. मग त्या तालावर झुलायला सुरुवात. बैठकीवर उगीचच लोळपाटणे. पोटाशी गिरदी धरुन त्याच्यावर चिमटय़ात अडकवलेल्या कागदाचे फळकूट पुढय़ात ठेवून कातरायला सुरवात.मग अडकित्याची चिपळी करुन ताल ...नाना तर्‍हा .एखाद्या अचानक तिथे आलेल्या नवख्याला वाटावे , इथे गीत आकाराला येते आहे, की नुसताच पोरकटपणा चाललाय !. एखादे दांडगे मूल पाहावे तसे वाटत असे.त्यांच्यातला नकलाकार जागा झाला की मग तो मूलपणा पाहावा. खरे तर मानमरातबाची सारी महावस्त्रे टाकून शैशवात शिरलेल्या माणसाचे ते दर्शन असायचे. ह्या स्वभावगत मूलपणाने त्यांना खूप तारलेले होते. प्रापंचिक जबाबदाय्रा फार लवकर त्यांच्या अंगावर पडल्यामुळे विशीतच फार मोठे प्रौढपण त्यांच्यावर लादले गेले होते, त्यातून ही मूलपणाकडची धाव असायची की काय,ते आता कोणी सांगावे ?..


गडकरी गेले त्या वेळी रसिक महाराष्ट्र असाच सुन्न झाला होता म्हणतात. माडगूळकरांना गडकर्‍यांविषयी अतोनात प्रेम. आम्ही जोडीने केलेल्या प्रवासात गडकर्‍यांच्या कवितांचेच नव्हे, तर नाटकांतील उतार्‍यांचे पठण हा आमचा आवडता छंद असायचा. हरिभाऊ आपटे,नाथमाधव,गडकरी ,बालकवी, केशवसुत, फडके, खांडेकर,अत्रे ह्या आधुनिक काळातल्या साहित्यकारांचे मार्ग पुसैतु आम्ही ह्या साहित्याच्या प्रांतात आलो. मी मुंबंईत वाढलो आणि माडगूळकर माडगुळ्यात वाढले,तरी आमच्या साहित्यप्रेमाचे पोषण एकाच पध्दतीने चाललेले होते. गडकर्‍यांच्या निधनानंतर वर्षभराच्या आतच आमचा जन्म. माडगूळकर माझ्यापेक्षा फक्त एक महिन्याने मोठे, बालपणातले आमचे इतर वातावरण मात्र निराळे होते.


"त्या तिथे, पलिकडे,तिकडे,माझिया प्रियेचे झोपडे" ही कविता प्रथम त्यांच्या तोंडून ऐकल्यावर मी म्हणालो होतो, "महाकवी, तुम्ही लकी !" (माडगूळकर मात्र स्वताला 'महाकाय कवी' म्हणत.) तुमच्या प्रियेच्या झोपडय़ाकडे वळताना त्या वळणावर आंब्याचे वाकडं झाड होतं. आम्ही वाढलो त्या वातावरणात वळणावर जळाऊ लाकडांची वखार !


"महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्या-या माणसापेक्षा समाजाला गाणे देणा-या माणसाचे उपकार फार मोठे असतात. Song has longest life अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढय़ानुपिढय़ा बांधून ठेवते एवढेच कशाला ?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंत:करण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली,तमाशाच्या फडात , देवळात ,शाळेत,तरुणांच्या मेळाव्यात,माजघरात,देवघरात,शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत... त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे ?.


माडगूळकरांचे चिरंजीवित्व गाण्यांनी सिध्द झाले आहे, व्यक्तिश: मला तर माडगूळकरांचे स्मरण करणे माझ्या पंचविशीपासून ते आता साठीकडे वळलेल्या माझ्याच आयुष्याकडे पुन्हा वळून पाहण्यासारखे वाटते. आम्ही काम केलेला एखादा जुना चित्रपटच पाहण्यासारखे.त्यातली माडगूळकरांची भूमिका आणखी खूप पाहायला मिळणार अशी आशा होती. कवितेच्या त्या जिवंत झर्‍यातून अजून कितीतरी ओंजळी भरभरुन प्यायला मिळणार आहेत अशी खात्री होती. प्राणांन्तिक संकटातून ते वाचले होते. इडापीडा टळली असा भाबडय़ा मनाला धीर होता.आणि अचानक चित्रपटगृहातल्या अंधारात ती बाहेर पडायच्या दरवाजावरची Exit ची लाल अक्षरे पेटावी, आणि "म्हणजे ?,एवढय़ात संपला चित्रपट ?",असे म्हणता म्हणता 'समाप्त' ही अक्षरे कुठल्या रिळाच्या शेवटी लिहिली आहेत हे कुणाला कळले आहे ?. मी चित्रपटव्यवसाय सोडून बेळगावला गेल्यावर माडगूळकर मला म्हणाले होते, "मित्रा, अशी मैफिल अर्ध्यावर टाकून जाणं बरं नव्हे.आम्ही आता काय म्हणावे ? आणि कुणाला म्हणावे ?.

- पु.ल. देशपांडे

धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही - पु.ल.

 धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही - पु.ल.


भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्रमातच वावरत होते असे मला वाटते. निखळ वैज्ञानिक दृष्टिकोनाचे एकूणच आपल्या देशातील हिंदूंना आणि मुसलमानांना वावडे. बरे, ज्या ख्रिस्ती लोकांशी संबंध आला, ते पाद्री धर्मप्रसारक. शाळा-कॉलेजे त्यांनीच चालवली. त्यांच्याही डोळ्यांना झापडे बांधलेली. शिवाय आपल्या देशात शारीरिक श्रमाइतकाच वैचारिक श्रमाचा तिटकारा.


बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे, की ब्राम्हण इंग्रजी विद्या शिकले ते कारकुनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून. लाखात एखादा सोडला तर ब्राम्हणांच्या घरातही पाठ्यपुस्तकापलीकडे व्यासंगासाठी ग्रंथसंग्रह नव्हता. वेदांचा फक्त अभिमान बाळगायचा; त्याला अक्कल लागत नाही. पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाहीत. सारे अभिमान आंधळे! कुणी तरी भारतात सोन्याचा धूर निघत होता म्हणायचे आणि इतरांना तो आपण पाहिल्यासारखे वागायचे. आमचे इतिहाससंग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणासारखे. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही, आत्मपरीक्षण नाही. सदैव वास्तव नाकारत जगायचे. कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर दैवावर.


 न्यायमूर्ती रानड्यांसारखी माणसेदेखील इंग्रजी राज्य हे Divine dispensation मानताना पाहिली की आश्चर्य वाटते. आमचे देवदेखील वरती हिंदुस्थानचा नकाशा घेऊन जरा चार इंग्रज पाठवून भारतीयांना शहाणे करू या म्हणत बसले होते. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात जातिभेद नष्ट झाल्याच्या भ्रमातच आपण सारे जण वावरत होतो. जातीय संघटनांच्या शक्तीची जाणीव, मते पदरात पाडून घ्यायला स्वातंत्र्यानंतर जेव्हा व्हायला लागली तेव्हा सेक्युलर भारताचा जयजयकार करणाऱ्या नेत्यांची गाळण उडाली. लाखातला एखादा अपवाद वगळला तर उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचारापर्यत सारे काही जात, धर्म, पंथ यांच्या दुराभिमानाला जागवतच चालत असत. मग निवडणूक-प्रचाराचे नारळ तुळजाभवानीपुढे फुटतात, दर्ग्यावर चादर चढते, देवळावर कळस चढतात. तान्ही पोरे दुधावाचून तडफडत असली तरी दगडी पुतळ्यावर शेकडो दुधाच्या घागरी उपड्या होतात. आपल्या देशात केवळ हिंदूच नव्हे तर मुसलमान, ख्रिश्चन, बुध्द, जैन, शीख- सगळ्यांची अस्मिता जात आणि पंथाधिष्ठितच आहे. एखाद्या राजकीय किंवा भाषिक चळवळीच्या प्रसंगी किंवा चीन-पाकिस्तानसारख्या युध्दाच्या प्रसंगी माणसे एकत्र आल्यासारखी वाटतात; पण लगेच पुन्हा आपापल्या जातीच्या कळपात जातात. मुसलमानांतले शिया आणि सुनी, आगाखानी, कटियारी, मोमीन, खोजे, बोहरी वगैरे लोकही एकमेकांपासून विधर्मीयांइतकेच दूर आहेत. केरळातले सिरीयन ख्रिस्ती आणि मंगळूरचे कॅथॉलिक किंवा महाराष्ट्रातले प्रोटेस्टंट किंवा मेथॉडिक यांच्यात वैमनस्याच्या भिंती उभ्या आहेत. गोव्याच्या ख्रिस्ती लोकांत बामण खिरिस्तॉव आहेत. आहिंसा परमो धर्म मानणाऱ्या श्वेतांबर आणि दिगंबर पंथांच्या जैनांच्या देवाच्या अलीकडील घटना तुम्हाला ठाऊक असतीलच.

 मनुष्यस्वभावात हा जा नावाचा व्हायरस इतका घट्टपणे कसा रोवून घेऊन बसतो हे एक विलक्षण कोडे आहे.


  आर्थिक अभ्युदयाबरोबर जातीच्या प्रश्नांची तीव्रता कमी होईल असे वाटले होते. कामगार-चळवळीला जोर आल्यावर सारे कामगार यापुढे ‘कामगार’ हीच जात मानतील, असाही विश्वास होता. पण तेही खरे ठरले नाही. त्या चळवळीच्या नेत्यांचे पितळ कामगार-चळवळीच्या प्रारंभीच्या काळात सूत-गिरण्यांतल्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या कामगारांना दूर ठेवण्यापासूनच उघडे पडले होते. खुद्द कम्युनिस्ट देशांतही पुन्हा एकदा राष्ट्रवादाने जोर धरल्यासारखे दिसते. रशियन कामगार आणि चिनी कामगार आता एकमेकांचे वैरी झालेले दिसताहेत. ज्या चीनमध्ये माओचे रेड बुक म्हणजे रोज सकाळी उठून भक्तिभावाने वाचायचा ग्रंथ होता आणि ‘माओच्छिष्ठम् जगत् सर्वम्’ अशी परिस्थिती होती, तिथे इतिहासातून माओचे नाव पुसून टाकायचा चंग बांधलेला दिसतो आहे. अरब राष्ट्रांकडे पहावे तर अंधश्रद्धा, रूढी, धर्म-दुराभिमान ही मध्ययुगीन भुते थैमान घालताना दिसताहेत. खोमिनीच्या राज्यात बायका पुन्हा एकदा घरातल्या अंधारात कोठड्यात गेल्या. ही भुते उतरवण्याऐवजी त्यांचे सामर्थ्य वाढीला लावण्यात येत असलेले दिसत आहे.


 आपल्या देशात पुरोगामी विचारांचा झेंडा मिरवणाऱ्या साम्यवाद्यांनी तर बुद्धिप्रामाण्य वाढीला लावण्यासाठी किंवा एकूणच समाजप्रबोधनासाठी कुठलेही धाडसी पाऊल टाकलेले नाही. कम्युनिस्ट युनियनचे सभासद असलेले मुंबईतले गिरणी-कामगार एकीकडून क्रांतीचा जयजयकार करतात आणि दुसरीकडून देवीला कोंबडा मारून नवस फेडतात. आपल्या देशात एकाच काळात आदिमानव-युगापासून apple-युगापर्यत सारे काही एकदम नांदत असते. त्या वेळी तुम्ही कशालाही भारतीय संस्कृती म्हणू शकता! फक्त ही वास्तवापासून अधिक दूर असेल तितकी अधिक भारतीय. जयप्रकाशजींचे नवनिर्माण-आंदोलन प्रचंड जोराने करणाऱ्या गुजरातेत राखीव जागाविरोधी आंदोलनही तितक्याच तीव्रतेने होऊन हजारो दलिनांना उध्द्वस्त करण्यात येते. मराठवाड्याची अस्मिता विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याच्या बाबतीत इतकी जागी होती, की शेकडो दलितांना आपल्या झोपड्या भस्मसात होताना पाहाव्या लागतात. कसले प्रबोधन, कसले फुले आणि कसले काय?


 एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.


 आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतापेक्षा अॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो.


 विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही. सत्याचे दर्शन घडवणाऱ्या वैज्ञानिकांचा, देवाचे नाव घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे लोकांनी सगळ्यात अधिक छळ केला आहे. धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू नसतील. मग ते बायकांना नवऱ्याच्या चितेवर जिवंत जाळतील, नरबळी देऊन आपले राजमहाल आणि देवळे टिकाऊ करतील, कुणाला अस्पृश्य म्हणतील, कुणाला वाळीत टाकतील, काय वाटेल ते करतील. धर्म आणि पंथाच्या दुरभिमानातून माणसाचे रक्त सगळ्यात अधिक सांडलेले आहे; आणि या साऱ्या खटाटोपातून शेवटी नवे हुकूमशहाच उदयाला आलेले दिसतात.


 पण आपला इतिहास हा मुख्यतः राजे लोकांनी मुलूख बळकावण्यासाठी केलेल्या लढायांचा, जयापराजयाचा इतिहास आहे; आणि प्रत्येक विजयी राजाच्या भाट-चारणांची ही प्राचीन परंपरा आजही कशी टिकून आहे, ते आपण पाहतोच आहो. विजयी राजाच्या भाट-चारणांनी त्यातील सत्यावर स्तुतिस्तोत्रांच्या इतक्या झुली पांघरल्या आहेत, की भूतकाळातल्या त्या तसल्या व्यक्तींना झाकणारी शब्दांची आरास म्हणजे इतिहास हीच आपली समजूत आहे.


 संजय गांधीला बुध्द आणि ख्रिस्ताच्या पंक्तीला नेऊन बसवणारे नेते (?) निघाले. अशा ह्या देशात बुध्दीला आणि निश्चित पुराव्याला साक्ष ठेवून काही लिहिणे आणि बोलणे हा गुन्हा ठरतो.

 त्यातून आपल्या देशात नाममहात्म्याला फार मोठे स्थान आहे. नामस्मरणाने तरून जाता येते ही श्रद्धा. कुठे जाता येते आणि तरणे म्हणजे काय याचा विचार नाही. अंधश्रद्ध समाजात कुठलीही घटना पारखून घेण्याची शक्तीच उरत नाही. भाषेचा वापर मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी भरमसाट रीतीने केला जातो. उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कुणालाही दुःख नाही. ‘सहनाववतु सहनौ भुनक्तु’ ही आमच्या वेदातील प्रार्थना, त्यातल्या मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे आणि ‘सहनाववतु’ म्हणताना “दूर हो. विटाळ होईल.” म्हणून माणसाला दूर लोटायचे. पुन्हा वेद श्रेष्ठ ते श्रेष्ठ, ते धडाधड पाठ म्हणणारे त्याहूनही श्रेष्ठ. त्यांना शासनाच्या वतीने शाली पांघरणारे आणखी श्रेष्ठ. सकाळी रेडियो लावला की देव दीनांचा वाली असल्याचे कुणी ना कुणी तालासुरात सांगत असते; आणि गॅलरीत आल्यावर समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसत असतात. त्या देवावर आणि सत्तेवर असलेल्या माणसांवर विशेषणांची खैरात चालू असते. दुर्दैवाने वास्तवाला विशेषणे मंजूर नसतात.


 कल्पनारम्यतेला मात्र ती पोषक ठरतात. अस्पृश्य मानल्या गेलेल्यांना ‘हरिजन’ म्हटले, की जादूचा मंत्र म्हटल्यासारखी अस्पृश्यता नष्ट होईल असे मानणे किंवा स्त्रियांना देवता म्हटल्यानंतर त्यांची गुलामी नष्ट होईल असे धरून चालणे, हे ह्या असल्या वास्तवापासून दूर असलेल्या कल्पनारम्यतेचे लक्षण आहे. पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाहीविरोधी सत्यशोधकांच्या नावावर टिच्चून सार्वजनिक सत्य(?)नारायणाची पोथी वाचली जाते. लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे. माझ्या वयाची साठ वर्ष मी ओलांडली पण गेल्या काही वर्षांत मी ही जी काही हिंदी सिनेमा नट-नटींसारखी देवदेवता आणि बुवा-माताजी मंडळींची चलती पाहतोय, तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती. देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे. कधी कुठल्या शंकराचार्यांचे नावदेखील ऐकले नव्हते. त्यांची दीड दीड हजार रुपये भरून पाद्यपूजा करायला भक्तांचा क्यू लागतो. आमच्या सेक्युलर भारताच्या पंतप्रधानबाई त्यांच्या दर्शनाला जातात. चर्चेस्, मशिदी यांचे उत्पन्न भरमसाट वाढते आहे. यातून आपण विशिष्ट जातीचे किंवा पंथाचे अनुयायी या अहंकाराखेरीज पदरात काहीही पडत नाही. ह्या साऱ्या सामाजिक वास्तवाकडे पाहिले, की प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटायला लागतो. खुर्ची जाईल या भयाने ग्रस्त असलेले नेते, श्रीमंती जाईल या भयाने अस्वस्थ असलेले धनिक आणि असहायतेने निदान देव तरी आपल्या मदतीला येतो की काय हे पाहू या म्हणणारे दरिद्री लोक असाच देखावा दिसतो अाहे. वैचारिक आधुनिकतेचा समाजाला स्पर्शही झालेला दिसत नाही. शेवटी हेच खरे आहे असे वाटायला लागते. ‘Justice is Simply the interest of the Stronger’.


 मनाच्या निराश मूडमध्ये हे लिहिले आहे असे तुम्हाला वाटेल. व्यक्तिगत जीवनात दुःख बाळगत राहावे असे माझ्या बाबतीत काहीही नाही. उद्या मला जेवायला मिळणार आहे किंवा नाही आणि आज रात्री झोपायला जागा सापडणार की नाही, ह्या चिंता घेऊन ज्या देशात लाखो लोक जगताहेत, तिथे माझ्यासारख्याने वैयक्तिक दुःख हा शब्दही उच्चारू नये, ह्या जाणिवेने मी कसलेही वैयक्तिक दुःख माझ्याभोवती रेंगाळू देत नाही. साहित्य, संगीत, नाट्य असल्या कलांत रमण्यात आणि थोडेफार इतरांना रमवण्यात आयुष्य गेले. उर्दू शायराच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त लाभली. ‘उपरा’, ‘बलुतं’, ‘आठवणीचे पक्षी’ ह्या पुस्तकांसारखे काही वाचले, की आपले जगणे सामाजिक दृष्ट्या असंबद्ध वाटायला लागते. कुणी मोठेपणा द्यायला लागले की ओशाळल्यासारखे वाटते.


(’एक शुन्य मी’ या पुस्तकातुन)


मला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.

 मला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.



आपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली?

अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ.



तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं? आकर्षण कुठली होती?


युगानुयुगे माणसाला तारुण्यात जी आकर्षणं वाटत आली आहेत, तीच होती. पण आकर्षण सांगण्यापूर्वी तो काळ कसा होता, ते सांगायला हवं. तारुण्यातला स्वप्नरंजनाचा काळ. प्राप्त परिस्थितीविरुद्ध बंडखोरीनं उसळून येण्याचा काळ. भोवतालचं वातावरण विलक्षण विसंवादी. क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीत कुटुंबात भांडणं मतभेद, डोक्‍यात राख घालणं असले प्रकार. आपण जिवंत असताना पोराने मिश्‍या काढल्या म्हणून त्याला घराबाहेर घालवून देण्याचा कर्मठ मूर्खपणा होता. कॉलेजमध्येच, काय पण हायस्कूलमध्येसुद्धा मुलामुलींनी एकमेकांशी बोलणं हा गुन्हा होता. साक्षात भाऊ आणि बहीण एका शाळेत शिकत असतील, तिथे परस्परांशी ओळख सुद्धा दाखवायची नाही. असा दंडक आपली मुलं विचारांचे इंद्रिय बंद करून परंपरेच्या चौकटीतून आसपास जाऊ नयेत याची खबरदारी म्हणजे मुलांना वळणं ही पालकांच्या मनाची पक्की धारणा. हा धाक किती भयंकर होता याची आजच्या तरुणपिढीला कल्पना येणार नाही.


कुटुंबात बाप म्हणजे "हुकूमशहा' त्याला जाब विचारायची कुणाची टाप नसे. मुलींची अवस्था तर कमालीची केविलवाणी होती. आमच्या लहानपणी बायका नऊवारी लुगडी नेसायच्या. वयात आलेल्या मुली परकर-पोलक्‍यातून नऊवारीत शिरायच्या. त्या काळी नऊवारीऐवजी पाचवारी साडी नेसायचा काही बंडखोर महिलांनी प्रयत्न केला, तर या गोल साडीने संसाराचे वाटोळे केले, अशा प्रकारच्या आरोळ्या उठल्या होत्या. मुलींना आईवडिलांची आणि त्यांच्या पिढीच्या आप्तेष्टांची बोलणी खावी लागत होती. त्या अवस्थेपासून जीन्सपर्यंतच्या तरुणी पाहिल्या, की त्यावेळचा "सकच्छ की विकच्छ' हा वर्तमानपत्रे, मासिके, चर्चा ह्यांतून गाजलेला वाद मला आठवतो.


परंपरा, घराण्याची इभ्रत वगैरे कल्पना किती क्षुद्र गोष्टींवर आधारलेल्या होत्या याची कल्पना आजच्या तरुण पिढीला येणार नाही. आजही "खानदान की इज्जत'चा जोर पूर्णपणे ओसरलेला नाही. तरुणपिढीचं भांडण मुख्यतः वडील पिढीच्या असल्या मतांविरुद्ध होतं. ते कुटुंबाच्या परिघातले होते. अशा काळात आपल्या देशात एक अभूतपूर्व घटना घडली, ती म्हणजे महात्मा गांधींचा उदय. महाराष्ट्रापुरतं बोलायचे म्हणजे सुशिक्षित मराठी माणसाला लोकमान्य टिळकांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' ही प्रतिज्ञा दिली होती. लोकमान्यांचं निधन झालं आणि महात्माजींचा उदय झाला. स्वराज्याची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोचायला लागली.


समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असं वाटणाऱ्या तरुणांना गांधीजींनी निरनिराळ्या प्रकारच्या विधायक कार्यात ओढून घेतलं. तरुण पिढीपुढे एक निराळं आकर्षण उभं राहिलं. मुलामुलींनी एकत्र येणं, गप्पा मारणं, एकत्र खेळणं, आपल्या मित्रमैत्रिणींच्या घोळक्‍यात एखादं भावगीत म्हणणं हे अब्रण्यम्‌ होतं. देशात स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाल्याबरोबर हजारो तरुणी पुढे आल्या आणि त्यांनीही स्वातंत्र्याच्या चळवळीत स्वतःला झोकून दिलं. इंग्रज सरकारच्या पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला. स्वराज्याला पर्याय नाही अशा भावनेने तरुणपिढी राष्ट्रीय चळवळीत भाग घेऊन लागली. रोजच्या चर्चेत सिनेमा नटनटींच्या ऐवजी गांधी, नेहरू, सरदार पटेल ही नावं ऐकू यायला लागली. बेचाळीसची चळवळ तर अनेक दृष्टींनी युवकांची चळवळ ठरली. गांधी, नेहरू, पटेलांची थोरवी मान्य करूनही अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, अरुणा असफअली, युसुफ मेहेरअली ही जवळजवळ समवयस्क वाटावी अशी मंडळी अधिक जवळची वाटायला लागली.


तरुण मनला भूल पाडावी असं त्यांची देखणेपण होतं. तासन्‌तास ऐकत राहावं आणि पाहत राहावं असं त्याचं व्यक्तिमत्त्व होतं. मनात आणलं असतं तर सरकारी नोकरीत उच्च स्थानावर बसून ऐषआरामात राहाता आलं असतं. सुबक संसार करता आला असता. आय.सी.एस. होणं ही परतंत्र भारतातल्या सुशिक्षितांची एकमेव महत्त्वाकांक्षा होती. आय.सी.एस.मध्ये निवड होऊनही त्या नोकरीला स्वातंत्र्याच्या चळवळीत पडण्यासाठी लाथ मारणाऱ्या सुभाषचंद्र बोसांनी तरुणांपुढे त्यागाचा नवा आदर्श उभा केला होता. सर्व राष्ट्रप्रेमी जनतेत असंतोष खदखदत होता. तरुणपिढी युद्धाला सज्ज झाली होती. रणशिंग केव्हा फुंकलं जाणार याची जणू काय वाट पाहात होती. अशा वेळी महात्मा गांधींनी इंग्रजांना भारत सोडून चालते व्हा' असं हजारो लोकांच्या सभेत बजावून सांगितलं आणि तरुणांना "करा किंवा मरा' हा महान मंत्र दिला. त्या मंत्राने तरुणच काय; पण मध्यमवयीन वृद्ध सगळेच भारले गेले आणि लहानांच्या वानरसेनेपासून ते वृद्धांच्या पेन्शनरसेनेपर्यंत सारा भारतीय समाज आपल्या कुवतीप्रमाणे चळवळीत भाग घेऊ लागला.


"कॉलेज स्टुडंट' नावाचा बूट-सूट वापरून साहेबी ऐट मिरवणारा तत्कालीन पिढीतला लोकप्रिय नमुना आता सिनेमातला "हिरो होण्याऐवजी गांधीजींच्या चळवळीतला सत्याग्रही होण्यात धन्यता मानू लागला. केशभूषा आणि वेषभूषा यांचं स्थान गौण ठरलं. पोलिसांच्या लाठीमाराने कपाळावर झालेल्या जखमेला बांधलेल्या बॅण्डेजला तरुण-तरुणींच्या मनात विलायती हॅटपेक्षा शतपट अधिक महत्त्व आलं.


फ्रेंच लिनन्‌ आणि डबल घोडा सिल्क शर्टिंगऐवजी अंगावर जाडीभरडी खादी आली. कट्ट्यावर जमणारे तरुण स्टडी सर्कल्समध्ये गांधीवाद, मार्क्‍सवाद म्हणजे काय ते जाणून घ्यायला एकत्र जमू लागले. परंपरावादी कुटुंबप्रमुखाची भीती नाहीशी होत चालली. अर्थात निसर्ग आपलं काम चालू ठेवतच होता. स्टडी सर्कल्समध्ये एकत्र जमणाऱ्या तरुणतरुणींचे परस्परांबद्दलचं आकर्षण कमी झालं नव्हतं. सिनेमा, प्रेम, कविता यांचं आकर्षण टिकून होतं. पण स्वतंत्र्यांच्या चळवळीत तरुण मनं अधिक झपाटली गेली होती.


जे तरुण प्रत्यक्ष भूमिगत चळवळीत भाग घेऊ शकत नव्हते. ते आपल्या कडून झेपेल तितका हातभार लावत होते. चळवळीतल्या काळातला हा नवा नायक ना. सी. फडक्‍यांनासुद्धा आपल्या कादंबरीत आणावा असं वाटलं आणि "प्रवासी'तला देशभक्त नायकक त्यांनी स्वतःच्या साहित्यात आणला.


आई-वडील रागवायचे का? मारायचे का?


आईवडिलांकडून मार खाल्ल्याचं मला स्मरत नाही. वडील तर मुलांना मारण्याच्या अतिशय विरुद्ध होते. आपला एखादा वडील स्नेही असावं, तसं आम्ही भावंडांचं नातं होतं. आम्हाला लहानपणी कधी भारी कपडे मिळाले नाहीत. मॅट्रिक पास होऊन कॉलोजात जाईपर्यंत हाफ प्यांट आणि त्यात खोचलेला हाफ शर्ट हीच माझी आणि माझ्या शाळासोबत्यांची "ड्रेपरी' असे शाळेत गणवेष नव्हता. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः अशा जातीचं मद्रास मिलचं एक टिकाऊ कापड बाजारात यायचं. त्या "अ' फाट कापडाच्या अर्ध्या तुमानी दोन-दोन वर्ष टिकायच्या पोशाखाबिशाखाच्या बाबतीत जरी आमचे लाड पुरवले नाहीत, तरी माझी वाचनाची आवड लक्षात घेऊन त्यांनी मला वेळेवेळी पुस्तकं आणून दिली. त्यांची फिरतीची नोकरी होती. प्रवास संपवून घरी येताना आम्हा भावंडांसाठी खाऊ आणि पुस्तक घेऊन येत.


अशाच एका प्रवासावरून परतताना त्यांचा मुक्काम पुण्यात होता. तिथून त्यांनी मेहेंदळ्यांच्या दुकानातून बाजाची पेटी आणली होती. बावीस रुपयांची ती पेटी होती. मुलांच्या संगीताच्या, लेखन, वाचनातल्या आवडीला प्रोत्साहन देणारे वडील मला लाभले. त्यांच्या हातून मार मिळण्याची शक्‍यताच नव्हती. शिवाय वर्गातही माझा नंबर असायचा. त्यामुळे माझ्यामागे अभ्यासाचा लकडा लावण्याची त्यांना जरुरीही भासली नाही.


शाळा-कॉलेजात अनेक मित्र लाभले. कोणाकोणाची म्हणून नावं सांगू? मैत्रिणीही होत्या. सुस्वभावी होत्या. काही सुंदरही होत्या. कथा, कादंबरी, कविता अशा विषयांवर आमच्या चर्चाही चालायच्या. पण हे सगळं परस्परांतलं सभ्य अंतर राखून. आज परिस्थिती अगदी निराळी आहे. कित्येकदा वैशालीतल्या अड्ड्यात मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक दिसते आणि मुलं फारशी तोंड उघडून बोलताना दिसत नाहीत. तोंड उघडलंच तर ते मसाला डोसा खाण्यासाठी. आमच्यावेळी कॉलेजात तर मुलामुलींनी एकत्र येता कामा नये असा अलिखित नियम होता. असल्या गोष्टींवर प्राचार्यांची कडक नजर असे. खूप वर्षांपूर्वी जिल्ह्याच्या मुख्य शहरात असलेल्या कॉलेजात गेलो होतो. कॉलेजला विस्तीर्ण मैदान होतं.


कडेला आंब्याचा एक डेरेदार वृक्ष होता. खोलीतून, ह्या मैदानाचा देखावा फार सुरेख दिसे. पण प्रिन्सिपलसाहेबांची खोली म्हणजे त्यांचा टेहेळणी बुरूज होता. त्या आंब्याच्या झाडाखाली कुणी एखादा विद्यार्थी आपल्या वर्गातल्या मुलीशी गप्पा मारत असलेला दिसला की प्रिन्सिपलसाहेब पहाऱ्यावरच्या गुरख्याला पाठवून त्या मुलामुलीला पांगवून टाकीत. हे प्राचार्य संस्कृत शिकवीत म्हणतात. कालिदासाने ह्यांची मुलामुलींसमोर, विशेषतः मुलींसमोर शिकवताना ठायीठायी काय गोची केली असेल ते देवी शारदाच जाणे.


पहिल्यांदा लिखाण केव्हा केलं? काय स्वरुपाचं होतं? त्याचं कौतुक वगैरे झालं का?


माझ्या घरातच ग्रंथप्रेमाचं वातावरण होतं. माझे आजोबा लेखक होते. आर्यांच्या सणांचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास, अभंग गीतांजली ही त्यांची महत्त्वाची पुस्तकं. त्यांच्या भेटीला बरीच साहित्यिक मंजळी यायची. त्या मैफलीत मला मज्जाव नव्हता. त्यामुळे वाचनाबरोबर लेखनाचीही आवड होती. पण वक्तृत्वाची आवड सगळ्यात जास्त. कित्येक वक्तृत्व स्पर्धांत भाग घेऊन मी बक्षिसं मिळवलेली होती. भाषण विनोदी करण्याकडे जास्त ओढा असायचा. विशेषतः आपल्या वेळी सुचवलेल्या विषयावरच्या भाषणात. त्यामुळे लेखनाची सुरवातही विनोदी लेखनाने झाली. पस्तीस-छत्तीस मध्ये म्हणजे मी मॅट्रिकच्या वर्गात असताना "खुणेची शिट्टी' ही माझी गोष्ट "मनोहर' मासिकाच्या एका अंकात छापून आली. मागे एकदा ती पुन्हा वाचायला मिळाली. या मासिकांचे संपादक शं. वा. किर्लोस्कर यांनी ती विनोदी (?) गोष्ट केवळ भूतदयेपोटी स्वीकारून छापली असावी असं मला वाटतं.


एखाद्याचं नाव दैनिकांत किंवा मासिकांत छापून येण्याला त्या काळी खूप महत्त्व होतं. त्यामुळे माझं कौतुक वगैरे झालं. पण त्या आधी मी एक कारवारच्या प्रवासाचं वर्णन करणारा लेख किर्लोस्कर मासिकासाठी पाठवला होता. माझ्या आयुष्यात "साभार परत' आलेला तो पहिला आणि शेवटचा लेख. कौतुकाचं म्हणाल तर माझं खरं कौतुक व्हायचं पेटीवादनाचं. शाळेतल्या आणि स्काऊटच्या नाटकात किंवा मेळ्यात केलेल्या कामाचं. त्यामुळे लेखन हे आपलं क्षेत्र नसून, गाणंबजावणं, अभिनय या क्षेत्रातच आपण राहायला पाहिजे अशीच माझी धारणा होती.


चित्रपट पाहणं, खेळ खेळणं, कैऱ्या-चिंचा तोडणे, प्रेम करणं असे प्रसंग घडले का?


चित्रपटाचं तर मला वेडच होतं. दादरच्या कोहिनूर सिनेमाचे मी आणि माझे काही मित्र हे तीन आणे तिकिटांचे प्रमुख आश्रयदाते होतो. परळच्या भारतमाता सिनेमात सिनेमा सुरू होण्याआधी रंगीबेरंगी दिव्यांची स्टेजजवळ चमचम सुरू व्हायची. आणि अँग्लोइंडिया पोरींचा "ड्यान्स' सुरू व्हायचा. "ड्यान्स' या शब्दातल्या "न्स'चा उच्चार वन्स मधल्या "न्स' चा उच्चाराशी जुळणारा होता.


तो एकदा संपला, की थेटरात अंधार व्हायचा आणि "खामोष,' "अब टॉकी शुरू होती है' अशी अक्षरं यायची. बडबड करणारे पब्लिक खामोश व्हायचे आणि पुढले दोन एक तास कसे गेले ते कळायचंदेखील नाही. आमच्या पार्ल्यात सिनेमाचं थेटर नव्हतं. पण मूकपट तयार होत पार्ल्याच्या रेल्वे स्टेशनाशेजारी मोर बंगला नावाचा राजवाड्यासारखा प्रचंड बंगला होता. भोवताली बागेत संगमरवरी पुतळे, भला मोठा पोहण्याचा तलाव, उंच घनदाट वृक्ष अशी तत्कालीन स्टंटपटाला लागणारी बॅंक ग्राऊंड तयार होती. गडबड न करता उभं राहिलं तर शूटिंग पाहायची परवानगी मिळे. धीरूभाई देसाई तसे चांगले होते.


मिस गुलाब, मा. नवीनचंद्र, मा. आशिक हुसेन अशी नावं आजही मला आठवतात. बहुतेक मूकपटात फायटिंग घोडदौड ही अभिनयाची मुख्य अंग असायची. अधूनमधून एखादा गंमत करून जायचा. पुढे फियरलेस नादिया वगैरेचे बोलपट सुरू झाले. आणि विष्णू सिनेटोन बंद पडला. खेळांच्या बाबतीत माझी भूमिका मुख्यतः प्रेक्षकाची राहिली. मैदानी आणि बैठ्या या दोन्ही प्रकारात रमलो नाही. तासन्‌ तास गेले ते गाण्याच्या मैफिलीत किंवा पुस्तकांच्या संगतीत. तसा क्रिकेट वगैरे थोडेफार खेळलो. क्रिकेट पाहायचो मात्र खूप! सी. के. नायडू, विजय मर्चंट, लाला अमरनाथ, मुश्‍ताक अली, अमरसिंग, खंडू रांगणेकर, निसार, अमर इलाही अशा नामवंत खेळाडूंचा खेळ पाहिला. अजूनही क्रिकेट पाहण्याची आवड टिकून आहे. पण प्रत्यक्ष स्टेडियममध्ये न जाता घरी टीव्हीवर पाहतो (एक गोष्ट मात्र निश्‍चित - क्रिकेट अधिक आकर्षक व्हायचा तो बॉबी तल्यारखानच्या "आखों देखा हाल'मुळे) क्रिकेटचा असा समालोचक पुन्हा होणे नाही. शनिवार, रविवार, आमच्या पार्ल्यातल्या पोरांचे अत्यंत आवडते उद्योग होते.


जावरू, लॉरेन्स असल्या नावाच्या लोकांच्या वाड्या होत्या. चिंचा-कैऱ्यांची तिथं मुबलक झाडं, सिमेंट कॉंक्रिटच्या पार्ल्याने आंबे, चिंचा, बोरं, आवळे नेस्तनाबूत केले. वाडीवरच्या पहारेकऱ्याला चुकवून चिंचा-कैऱ्या पाडण्यात एकप्रकारचा थ्रिल होता. चोरून आणलेल्या कैरीची आणि बटली आंब्याच्या कच्च्या फोडीची चव बाजारातल्या आंब्याला नसे. हाय चोरून मिळवलेल्या कैऱ्या-चिंचांप्रमाणेच "प्रेम' हे देखील चोरून करण्याचं प्रकरणच होचं. परण ज्या मध्यमवर्गीय वातावरणात आम्ही वाढत होतो तिथं प्रेम करणं जाऊ द्या, प्रेम हा शब्द मोठ्याने म्हणायची चोरी होती.


चित्रपटातल्या आवडत्या नायक-नायिका कोण? त्यांच्या लक्षात राहिलेल्या मुख्य भूमिका कोणत्या?


- पहिल्यापासूनच नाटक, गाणं वाचन या गोष्टी अतोनात आवडायच्या. त्यामुळे चित्रपट पाहाणं हे आपलं कर्तव्य आहे. आपली खरी दुनिया तिचं अशीच भावना होती. प्रभात, न्यू थिएटर्स, हंस, कोल्हापूर सिनेटोन, नवयुग या चित्रपट निर्माण करणाऱ्या संस्था ही सांस्कृतिक तीर्थक्षेत्रे होती. माझ्या आधीच्या पिढीचं महाराष्ट्रात तरी नाटक मंडळीचं बिऱ्हाड हे असंच ठिकाण होतं. तीस पस्तीस सालानंतर नाटक मंडळ्या बुडल्या. प्रेक्षक चित्रपटांकडे ओढले गेले. प्रभात आणि न्यू थिएटर्सचे जवळ जवळ सगळे चित्रपट मी पाहिले आहेत. मराठी चित्रपटात मास्टर विनायक आणि हिंदीत मोतीलाल हे माझे आवडते नट होते. विनायकरावांचा "ब्रह्मचारी' आणि मोतीलालचा "मिस्टर संपत' हे माझे आवडते चित्रपट.


मराठीत शांता आपटे आणि हिंदीत देविकाराणी, ललिता पवार या आवडत्या नट्या. पण पश्‍चिमेकडील आवडायच्या त्या ग्रेटा गार्बो, क्‍लॉलेट कॉलबर्ट, मर्ल ओवेरॉन, नॉर्मा शिअरर, डॉरथी, लामूर मराठी हिंदी वगैरे चित्रपट काही आवडत. पण मनाचा कब्जा घेतला होता तो हॉलिवूडच्या चित्रपटांनी. "गुडबाय मिस्टर चिप्स' तर मी पुण्यातल्या अपोलो सिनेमा थेटरात ओळीने तीनदा पाहिला होता. म्हणजे तीनचा खेळ, संध्याकाळी सहाचा आणि नऊचा सलग बसलो होतो. त्या नटनट्यांनी मनावर असंख्य ठसे उमटवले. त्यांच्याबद्दल लिहायचं म्हणजे स्वतंत्र ग्रंथ लिहावा लागेल.


तारुण्यात सर्वात प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती कोण? त्यांच्या काही आठवणी?


- जीवनाच्या अनेक क्षेत्रात मी वावरलो. प्रत्येक क्षेत्रातले दिग्गज पाहायला मिळाले. त्यामुळे प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींची यादी खूप मोठी होईल. स्थूलमानाने सांगायचं झालं तर, साहित्यात राम गणेश गडकऱ्यांचा, नाट्यसंगीताच्या क्षेत्रात बालगंधर्वांचा, अभिजात संगीताच्या क्षेत्रात मल्लिकार्जून मन्सूरांचा, राजकीय क्षेत्रात साने गुरुजींचा प्रभाव माझ्यावर पडला.


दुसऱ्याच्या दुःखाने व्याकुळ झाल्यामुळे सहानुभूतीने झरणारा अश्रू हे निसर्गाने माणसाला दिलेले सर्वात मोठे देणे आहे हे साने गुरुजींनी स्वतःच्या आचरणाने सिद्ध करुन दाखवले. साने गुरुजींप्रमाणे मनावर तितकाच प्रभाव पाडणारी दुसरी व्यक्ती म्हणजे एस.एम. जोशी, "मी पण ज्यांचे पक्व फळापरि सहजपणाने गळले हो' हे ज्यांच्याबद्दल अंतःकरणपूर्वक म्हणावं अशी ही देवदुर्लभ माणसं.


प्रेमविवाह या कल्पनेबद्दल काय वाटतं?


- प्रेम ही कल्पना मला खूप आवडणारी आहे. निरनिराळ्या संदर्भात ते प्रकट होतं. पण स्त्री-पुरुष प्रेम हा प्रकार निराळा आहे. इथं दोन जिवांच्या विसर्जीत होण्याची कल्पना आहे. हे प्रेम का निर्माण झालं? परस्परांविषयी इतकी ओढ का वाटायला लागली, स्त्रीपुरष सौंदर्य हे या प्रेमाला आवश्‍यक अशी अट आहे का? लैलाला, मजनूच्या डोळ्यांनी पहा म्हणजे ती किती सुंदर आहे ते तुम्हाला कळेल असं म्हटलं आहे. प्रेमाचं रसायन मनात कसं तयार होतं हे कोडं अजून उलगडायचंच आहे. मात्र लग्न ही माणसाने निर्माण केलेली समाजधारणेसाठी लागणारी गोष्ट आहे. प्रेम कुठलेही शिष्टमान्य नियम पाळायला बांधलेलं नाही. पण लग्न ही नियमांनी बांधलेली व्यवस्था आहे. तिचे कायदेकानून आहेत. हिंदूधर्मात "नाचिचरामि नातिचरामी-नातिचरामि' अशी शपध घेऊन वधूचा स्विकार केलेला आहे. मुसलमानी धऱ्मात तर लग्न हा इतर कुठल्याही करारासारखा करार आहे. इतर करारासारखीच तो मोडण्याची तिथे व्यवस्था आहे. इतर धर्मात लग्नाचे असे छोटेमोठे नियम आहेत.


आत्मविसर्जन या भावनेने एकमेकांवर प्रेम करणाऱ्या तरुण तरुणींनी लग्नाचं बंधन स्विकारताना या व्यवहारात आपणा दोघांच्याही भूमिकेत बदल झाला आहे हे ओळखमे महत्वाचे आहे. आपल्या देशात आपला प्रियकर हा मालक होतो. स्वामी सेवक संबंधात रुढीने लादलेल्या नियमांना धरुन वागण्याची सक्ती असते. संवेदनशील स्त्रियांना ती जाणवल्याशिवाय राहत नाही. प्रेमात पडलेल्या अवस्थेत जी धुंदी असते तिची जागा लग्नानंतर तडजोडीने घेतलेली असते.


गेली अनेक वर्षे तुम्ही तरुणांचे आवडते लेखक आहात याचं कारण काय असावं?


- माझ्या तरुण वाचक श्रोत्यांनी तर मला खूपच प्रेम दिलं आहे. पण सर्व वयोगटातल्या वाचकांच मला उदंड प्रेम लाभलं आहे. गेली पन्नासएक वर्षे मी लेखन करतो आहे. मुख्यतः विनोदी, मुक्तपणाने हसायला लावणार विनोद मुक्तपणाने हसणं हे तारुण्याचं व्यवच्छेद लक्षण आहे. किंबहूना एखादा वृद्ध माणूस मनमोकळेपणाने हसतो त्यावेळी तेवढ्या वेळेपुरतं का होईना त्याला तरुण झाल्यासारखं वाटतं. माझ्या लेखनातून संवाद साधला गेला असावा. त्यासाठी मी मुद्दाम काही अभ्यास वगैरे करून लिहायला बसत नाही. तसं पाहिलं तर गेल्या पन्नास वर्षात समाजात किती कमालीचं परिवर्तन झालं आहे.


मला मात्र या परिवर्तनात बाह्य फरक असला तरी मूळचा मनुष्यस्वभाव हा युगानुयुगे सारखाच राहिला आहे असं वाटतं. नऊवारी साडी, नथ, निरनिराले दागिने घातलेली आणि लांब केसाची आकर्षक रचना केलेली पन्नास साठ वर्षापूर्वीची तरुणी काय किंवा तंद जीन्स घातलेली, केसांचा पुरुषी बॉयकट केलेली अत्याधुनिक युवती काय, आपण सुंदर दिसावं ही त्यामागची भावना समानच आहे. स्वतःला भूषवणारी आहे. सफाईच्या दुटांगी काचा मारलेले धोतर नेसणं ही एकेकाळची फॅशन होती. धोतरं गेली, तुमानी आल्या. आपण फाकडू दिसायला पाहिजे हीच भावना त्या काळातल्या धोतरव्यांच्या मनात होती. आणि आजच्या "मॉड' पोशाखातल्या तरुणींच्याही मनात आहे. नटणं हा स्थायीभाव आहे आणि युगानयुगे तो टिकून आहे. या बाह्याकारी गोष्टींना मी महत्व देऊन त्यावरुन नीती अनितीची गणितं मांडत बसलो नाही. त्यामुळे माझ्या वाचकांच वय काहीही असलं तरी त्यांच्यात आणि माझ्यात फार मोठी दरी असल्याचं मला कधीही वाटलं नाही.


जगताना मला जे जे भावलं, कधी मी कथा केली, नाटकं केली, प्रवासाच्या हकीकती सांगितल्या, कागदावरुन सांगितल्या, ध्वनिफितीवरुन सांगितल्या आणि असंख्य वाचकांना त्या ऐकाव्याशा वाटल्या. त्यांना त्या तशा का वाटल्या याचं उत्तर माझ्यापाशी नाही. पण माझ्या अपेक्षेपेक्षा शतपट प्रमाणात मला रसिकांचं प्रेम मिळालं. कदाचित या माणसाने आम्हाला हसवलं आणि हसवण्यासाठी भाषेचा अभद्र वापर केला नाही, त्यामुळे आपल्या हसण्याला आनंद डागळला नाही. अशीही भावना असावी.


सध्याच्या युवकाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तरुण पिढी बेशिस्त आहे का?


- मला युवक पिढीची चिंता वाटत नाही. पण साहसाची आवड, काहीसा बेशिस्तपणा, ही सारी तारुण्याची लक्षणं आहेत. त्यांनी थोडाफार दंगा केला तर त्याला आपण "यौवनमय अपराध्वते' असं म्हणू शकतो. ज्या वृद्धांनी तरुण पिढीपुढे आदर्श म्हणून उभं राहावं, त्यांच्या सत्तालोभाच्या आणि सत्ता मिळण्यासाठी लागणाऱ्या द्रव्यलोभाच्या हकीकती ऐकून धक्काच बसतो. जिथं विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने ज्ञानोपासनेसाठी जमतात अशी विश्‍वविद्यालय ही भ्रष्टाचाराने सडत चाललेली दिसतात. पैसे टिकवून जिथं पदव्या मिळवता येतात, पैसे मोजून जिथे परिक्षेतल्या पेपरातले गुण भरमसाठ प्रमाणात वाढवले जातात अशा वातावरणात जगावं लागलेल्या तरुणांची मला चिंता वाटते. म्हणून मी निराश आहे असे नाही.


समाजहिताच्या कार्यासाठी स्वतःला झोकून देणारे तरुण आणि तरुणी आजही भेटतात. सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी धडपडणाऱ्या या तरुणांची जिद्द पाहिली की मनाला समाधान वाटतं. वाटतं की हे ही दिवस जातील. पारतंत्र्याचे दिवं मला आठवतात. सगळीकडे अंधार होता. देश लुळापांगळा होऊन पडला होता. इंग्रजी सत्तेपुढे लाचार होऊन पडला होता. आणि यावच्चंद्र दिवाकरौ ही स्थिती बदलणार नाही असं मानतं होता. त्या अवस्थेतून बाहेर पडून इंग्रज राज्यकर्त्याला चालता हो असं समर्थपणे सांगणारा प्रचंड समाज उभा राहिला. स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून निघणाऱ्यामध्ये महत्वाचा वाट तत्कालीन तरुण पिढीने उचलला होता. "सूत कातून आणि चरखे फिरवून, उपास आणि सत्याग्रह करुन काय स्वराज्य मिळतं का?' असले कुत्सित उद्‌गार काढणाऱ्यांनी जेव्हा शनिवारवाड्यावरचा युनियन जॅक खाली येऊन तिरंगा वर चढताना पाहिला असेल तेव्हा त्यांना काय वाटलं असेल ते त्यांनाच ठाऊक.


तत्कालीन तरुणांनीच हा चमत्कार गांधींच्या "करा किंवा मरा' या निर्वाणीच्या संदेशातून घेतला होता. आजच्या तरुण पिढीतून मेधा पाटकरांसारखी तेजस्विनी निर्माण झालेली आपण पाहतो. मग देशाच्या भल्यासाठी "युवाशक्ती' अधिक जोमदार करणारं नेतृत्व लाभणारच नाही, असं वाटून हताश होऊन कशाला जगायचं?


दूरदर्शन, एम.टी.व्ही. सारख्या आक्रमणामुळे तरुणांची वाचनीयता, नैतिकता कमी होत आहे का?


- सध्याच्या तरुणतरुणींची वाचनाची आवड कमी होत आहे, असं मला वाटत नाही. मी कॉलेजात असताना म्हणजे सुमारे पंचावन्न वर्षांपूर्वी ही मुलं अभ्यासाला नेमलेल्या पुस्तकांखेरीज इतर फारसं वाचन करीत असतील असं मला वाटत नाही. त्याकाळी टी.व्ही. संगीताच्या ध्वनिमुद्रित फिती असल्या काही गोष्टी नव्हत्या म्हणून विद्यार्थी लायब्ररीत गर्दी करीत होते असं नाही. खेळ, गायन, चित्रकला यासारखीच वाचनाची आवड असावी लागते. ती नीटपणाने वाढीला लागायला एखाद्या ग्रंथप्रेमी मित्राचा किंवा शिक्षकांचा सहवास लागतो. तसा आजही मिळू शकतो.


सध्याच्या युवा पिढीबद्दल तुम्हाला सर्वाधिक खटकणारी व आवडणारी गोष्ट?


- युवा पिढी अशी घाऊक कल्पना मनात बाळगून तिच्यावर बरेवाईट शेरे मारणं मला योग्य वाटत नाही. तारुण्य हा समान घटक धरला तरी प्रत्येक एकाच साच्यातला गणपती नव्हे. तरीही मनाचा मोकळेपणा, साहसाची हौस, तरुणतरुणींना परस्परांविषयी वाटणारं आकर्षण, फार शिस्त लावू पाहणाऱ्या मंडळीविषयी थोडीफार भीती, थोडापार तिटकारा ही प्रतिक्रिया सनातन आहे. कॉलेजात असताना पुण्यातल्या "गुडलक'मध्ये आमचा अड्डा जमत असे. आताची पिढी वैशालीत जमते. प्राध्यापकांपासून ते बोलघेवड्या देशभक्तांपर्यंत आणि लेखकांपासून ते एखाद्या शामळू सिनेमा नटापर्यंत टिंगळटवाळी चालायची, नकाळत व्हायची, चांगल्या आणि फालतू विनोदांची, पाचकळ शाब्दिक कोट्यांची फैर झडायची. त्यामुळे कट्टा संस्कृती पाहिली की एक सुदृढ परंपरा आजतागायत चालू असल्याचा मला आनंद वाटतो. तत्कालीन पेन्शनरांना उनाड वाटणाऱ्या त्यामधल्या कित्येक तरुणांनी बेचाळीसच्या चळवळीत स्वतःला झोकून दिलं होतं.


तुरुंगवास सहन केले होते आणि तुरुंगातही देशाचे कसे होईल याची चिंता करीत न बसता तिथेही कट्टा जमवला होता. आजही मला तरुणतरुणींची कट्टाथट्टा रंगत आलेली दिसली, की ती मंडळी माझ्या स्वकीयांसारखीच वाटतात. आपण उच्चस्थानावर उभं राहून त्यांच्या त्या वागण्याची तपासणी करीत राहावं असं न वाटता त्या कट्टेबाजांच्या मैफिलीत हळूच जाऊन बसावं असंच वाटतं. त्यामुळे त्याचं ते मोकळेपणानं वागणं मला कधी खटकत नाही. पोशाखांच्या तऱ्हांची मला मजा वाटते. रस्त्यावरच्या भयंकर गर्दीत आपली स्कुटर चरुराईने घुसवणाऱ्या मुलींचं मला कौतुक वाटतं. मात्र अकारण उद्धटपणाने किंवा दुसऱ्या कुणाला ताप होईल असं वागणे हे मात्र मला खटकतं.


पुन्हा तरुण व्हायला मिळालं तर?


- खूप आवडेल. डोंगरदऱ्यातून मनसोक्त, गिरिभ्रमण करीन. मैदानी खेळात भाग घेईन. भरपूर पोहीन, चित्र काढीन, अशा अनेक गोष्टी राहून गेल्या आहेत. त्या पूर्ण करायला मनाला शरीराची साथ मिळायला हवी. त्याबरोबरच त्या नवीन तरुण मनाला साजेल अशा जिद्दीने सामान्य माणसाच्या हिताचा प्रकल्प हाती घेऊन तो पुरा करण्यामागे लागेन.


तरुणांना काय संदेश द्याल?


- संदेश वगैरे द्यायला मला आवडत नाही. तरीही आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्‍यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा. पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील. पण कलेशी जडलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.


सकाळ

८ नोव्हेंबर २०१९

‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड !

 ‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड !


‘बलुतं’ प्रकाशित झालं २४ डिसेंबर १९७८ रोजी आणि प्रसिद्ध विनोदी लेखक पु. ल. देशपांडे यांनी दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये १८ मार्च १९७९ रोजी त्याविषयी सविस्तर लेख लिहिला. त्याचं हे पुनर्मुद्रण...




‘दगडू मारुती पवार’ ह्याच्या वाट्याला आलेले हे दु:खाचे बलुते भारतीय समाजव्यवस्थेने त्याच्या जन्मकाळीच त्याच्या पदरात बांधले. दया पवार नावाच्या-आज लोकांपुढे कवी, साहित्यिक, विचारवंत म्हणून प्रसिद्धीस आलेल्या माणसातच हा दगडू मारुती पवार वसलेला आहे. एकाच देहात नांदणारी ही जुळी व्यक्तिमत्त्वे आहेत. सुखाच्या क्षणीही दयाला सुखासीन होऊ न देता, सतत टोकरीत राहणारा हा दगडू. तो ह्या आत्मकथेचा लिहविता धनी. दयाला अस्वस्थ करणारा आतला नुसता आवाज नव्हे तर आतला आक्रोश. सत्य सांगून भार हलका करू इच्छिणारा. (तो भार हलका होत नाही ही आणखी एक शोकांतिका.) दया पवार त्या दगडूची लेखणी झाला. आणि अतिशयोक्ती न करता बोलायचे म्हणजे त्यातून एका असामान्य आत्मकथेचा जन्म झाला.


ह्या पुस्तकाला अनेक ठिकाणी फाटलेल्या आणि ठिगळा- ठिगळांनी जोडलेल्या गोधडीचे वेष्टनचित्र आहे. अन्न, वस्त्र, निवारा या बाबतीतच नव्हे तर क्षणोक्षणी भावनांच्यासुद्धा चिंध्याचिंध्या होत जाणारे आयुष्यच जिथे ठिगळाठिगळांनी जोडत जावे लागते अशा जीवनाची ही सत्यकथा आहे. असली ही जीवनपोथी उत्तम भोजनोत्तर किंवा उत्तम भोजनाची खात्री असल्यामुळे श्रवणसौख्यात भर घालणाऱ्या देव-देवतांच्या लीलामृतांच्या धार्मिक पोथ्यांना असतात तसल्या रेशमी सोवळ्यात कशी बांधली जाणार? तिला गोधडी-बांधणीतच गुंडाळणे शक्य आहे. वेष्टनावरची ती गोधडीच पहिला धक्का देऊन जाते. स्वत:ला स्पृश्य किंवा सवर्ण समजणारा समाज अस्पृश्यतेचा शिक्का उठवलेल्या सोन्यासारख्या मानवी जीवनाच्या किती प्रकारांनी चिंध्या करत असतो याचे ह्या वेष्टनापासूनच सूचक दर्शन घडायला लागते, पण हे दर्शन घडवणारा दगडू कुठेही स्वत:बद्दल अनुकंपा निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत नाही, हे ह्या कहाणीचे सर्वांत मोठे यश आहे, हे सुरुवातीलाच नमूद करून ठेवायला हवे. दगडू पवार शिष्ट समाजाच्या करुणेची भीक मागायला उभा राहिलेला नाही. उलट, ही कथा वाचून संपल्यावर आपण देश, धर्म, संस्कृती, समाज, सुधारणा, प्रबोधन वगैरे शब्द किती क्षुद्र मर्यादेच्या रिंगणात वापरत असतो याचाच पुन्हा एकदा अधिक तीव्रतेने प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही आणि आपले जगणे आपल्यालाच ओशाळवाणे वाटायला लागते.


दगडू कधी खेड्यात तर कधी मुंबईत असा लहानाचा मोठा होत गेला. खेड्यातला तो महारवाडा आणि मुंबईतला दगडू जगत होता तो विभाग स्वत:ला सुसंस्कृत, सुशिक्षित, सुप्रतिष्ठित, सभ्य वगैरे समजणाऱ्यांना त्याच्या अस्तित्वाची दखल घेण्याच्याही लायकीचा वाटत नाही. पूर्वी दादर टी.टी. ते काळा घोडा असा सहा नंबरच्या ट्रामचा रस्ता होता. एकदा त्या ट्रामने गिरणगाव ओलांडले की, चर्नी रोड नाका येईपर्यंत वाटेत लागणारे फोरास रोड, नागपाडा वगैरे भाग, देवळाच्या दारातल्या महारोग्यांची पंगत ज्या कातडे ओढलेल्या डोळ्यांनी ओलांडायची असते, अशा रीतीने ट्राममधल्या सभ्य पाशिंजरांनी त्या बाजूला न पाहता आणि त्या दैन्य-दारिद्रयाचा मनावर संस्कार करून न घेता ओलांडायची असे. तिथली माणसे ही माणसेच नव्हेत असे मानणे म्हणजे सुसंस्कृतपणा ही शिकवण असे. एकदा चर्नी रोडची पारशी अग्यारी लागली की मग भारतीय संस्कृती सुरू. हा मधला पट्टा जिवंत माणसांचा उकिरडा असल्यासारखा आपले सारे अभागीपण दाखवत असायचा. त्या वस्तीतल्या ‘कावाखान्या’पाशी दगडू वाढला. आजूबाजूचा चोरबाजार, कामाठीपुरा, गोलपिठा ह्या विभागांतच ‘छोटी छोटी बेटं’ करून महार मंडळी राहत. (त्यांतच देशस्थ महारांचे निराळे, कोकणस्थ महारांचे निराळे.) दगडूच्या ‘आयुष्याची कितीतरी उमेदीची वर्षे ह्या खचरात गेली.’ पण त्या खाचरातही दगडूचे वडील राजाच्या ऐटीने राहायचे. दगडूच्या स्वाभिमानी आजीने आपल्या दोन लेकरासंकट गावातल्या हलकट संभावितांच्या जाचापासून मुक्ती मिळवण्यासाठी ‘ममई’ गाठली होती. मुले वाढवून मोठी करून उद्योगाला लावली होती. दगडूचे वडील मुंबईच्या गोदीत चाकरी करत होते. ‘पांढरंशुभ्र मसराईचं उंची धोतर, वुलन कोट, गंधर्व छाप काळी टोपी, दातावर सोन्याची मेख’ असा त्यांचा थाट होता. त्यांना गाण्याचे अंग होते. कुटुंबात वाद्ये वाजवणारे काका, मामा होते. (त्यांत वाजंत्र्यांच्या ताफ्यात तरबेजपणानं कांडे वाजवणारा सखामामा होता. सवर्णांच्या लग्नात त्यांना उष्ट्या पत्रावळीवर जेवायला लावणाऱ्या उद्दाम तालेवारांना त्या कांड्यातून तो शिव्याही वाजवत होता. वरपांगी ‘धिक्कट धिम् तिक्कड तिम्’ ऐकू आले तरी सखामामा आणि त्याचा हा असल्या अपमानास्पद वागणुकीने डिवचला गेलेला भाचा त्यांना त्या धिक्कड् दिममध्ये दडलेल्या शिव्या ऐकू येत होत्या.) पुढे दगडूचे रसिक वडील दारूच्या नादाला लागले. बाटलीबरोबर बाई आली. गोदीतून तांबे-पितळ चोरून आणू लागले. दगडूला चोरीचा माल विकायचे शिक्षण मिळू लागले. त्याच काळात दगडू शाळेत ‘बरे सत्य बोला’ शिकत होता. ‘वास्तवाच्या जगापेक्षा शाळेचे जग खूपच नकली वाटायचे. जसे तसबिरीत नयनमनोहर चित्र टांगावं तसं.’


हे आत्मकथन वाचताना घडणाऱ्या त्या वास्तवाच्या दर्शनाने दगडूसारख्यांना आपण ‘तसबिरी’तली माणसे का वाटत असतो याची जाणीव पांढरपेशांना झाल्याशिवाय राहणार नाही. हा केवळ आर्थिक दारिद्रयाचा प्रश्न नाही. नुसत्या दारिद्रयामुळे सोसाव्या लागणाऱ्या ओढाताणीचा अनुभव मध्यमवर्गीयांनाही असतो. पण भयानक दारिद्रयाच्या जोडीला हिंदू समाजव्यवस्थेने अस्पृश्यांवर जन्मकाळापासून ते प्रेतदहन किंवा दफनापर्यंत जनावरांपेक्षाही भयंकर असे हे हीनत्व लादलेले आहे आणि त्यामुळे क्षणोक्षणी ज्या भयाखाली त्यांना थरथरत्या अवस्थेत जगावे लागते त्याचा हा आत्मकथेतून येणारा प्रत्यय वाचकाला हादरून टाकणारा आहे. आणि ह्या कथेचे मोठेपण असे की, वाचकाने असे हादरावे म्हणून जाणूनबुजून कसलाही प्रयत्न इथे केलेला नाही. चमकदार भाषाशैली वापरून परिणाम साधायचा इथे यत्किंचितही अट्टाहास नाही. मराठी भाषेचे एक अत्यंत सुबोध, सरळ रूप पाहण्यासाठीसुद्धा ‘बलुतं’ वाचावे. वास्तवाच्या दर्शनाला अलंकाराची गरज नसते. घाव बसल्यावर रक्त भळभळ वाहत जावे तशी ह्या पुस्तकातली वाक्ये वाहत चाललेली आहेत. मनावर झालेले वयाच्या वेगवेगळ्या काळातले घाव परिणामकारक करायला दगडूला कुठल्याही कृत्रिम नाटकीपणाचा आश्रय घ्यावा लागलेला नाही.


पांढरपेशांच्या जगाने झिडकारलेली, नाकारलेली कितीतरी माणसे इथे भेटतात. देवाधर्माच्या नावाखाली यल्लामा देवाला दरिद्री आईबाप पोटची पोरे वाहतात. मुलींची पुढे वेश्यांच्या बाजारात विक्री होते. आजही यल्लामाच्या जत्रेत हजारो मुलींची त्या देवीच्या साक्षीने विक्री होते. दगडूच्या जमनामावशीच्या नशिबी हा भोग आलेला होता. फोरास रोडवर पिंजऱ्यात वेश्या करून डांबलेली जमनामावशी ह्या भाच्यासाठी खाऊ आणून वाट पाहत असते. घोडागाडीतून फिरवते. त्याला छान कपडे घेऊन देते. या भाच्यावर मारा करून आपली अतृप्त वात्सल्याची भूक ती भागवत असते. वेश्यावस्तीच्या त्या नरकवासातल्या कोठडीच्या भिंतीवर यल्लामाचा देव्हारा असतो आणि बाबासाहेब आंबेडकरांची तसबीर. हे सारे काल्पनिक वाटावे इतके आम्हाला दूरचे आहे. त्या जमनामावशीची गोष्ट इथेच संपत नाही. काही वर्षे लोटतात. आता मोठा झालेला दगडू सांगतो- “अगदी अलिकडची गोष्ट. मी दादरच्या पुलाखालून चाललो होतो. माझ्या सोबत काही बडी लेखक मंडळी. तिथे भिकाऱ्यांच्या घोळक्यात दीनवाणी मुद्रेची, लक्तर फाटलेली, झिंज्या सोडलेल्या अशा अवस्थेत मी जमनाला ओळखतो. जमनाच ती. तिनेही एवढ्या वर्षानंतर मला ओळखलेले असते. ती एकटक माझ्याकडे बघत असते. तिच्याशी सांधा संवादही मी करू शकलो नव्हतो. वाटलं, टेरिलिनच्या कपड्यांत आपण किती पांढरपेशे झालोय.” दगडूचे जीवन आता वरपांगी यशस्वीही म्हणण्यासारखे. पण त्या यशाच्या वस्त्रांना आतून काट्यांचे अस्तर जोडल्यासारखे सतत टोचण्या देणारे.


शिक्षणाशिवाय दलित समाजाला मुक्ती नाही हे ओळखून बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी शिक्षणसंस्था उभारल्या. अन्यायाविरुद्ध दंड थोपटून उभे राहिल्याशिवाय ह्या गुलामगिरीतून सुटका नाही याची जाणीव झालेला शिक्षित दलित समाज नव्या निर्धाराने त्या दिशेने झुंजही घेऊ लागला. पण त्यातच एक नवा पांढरपेशा दलित तयार झाला. त्याचे खेड्यातल्या अशिक्षित आणि सर्वार्थाने दलितावस्थेत राहणाऱ्या आपल्याच बांधवाशी नाते तुटत गेले. ह्या नव्या वास्तवाचे चित्रणही ‘बलुत्या’त पाहायला मिळते. ही एक निराळीच, ना अरत्र ना परत्र अशी अवस्था. “आपल्याला जीवनात काय हवे? आपले काय बरं हरवलंय? ही नुसती धावपळ काय आहे?” अशांसारख्या मूलभूत प्रश्नांचे मोहोळ आता उठते. दगडूला त्या प्रश्नांच्या गांधीलमाशा डंख मारू लागतात. जीवन निराळ्याच दृष्टीने असह्य करतात. रोज नव्या भ्रमनिरासांचा अनुभव येतो. स्वत:ला डावे म्हणवणाऱ्यांतला उजवेपणा आणि ज्यांना प्रतिगामी उजवे मानले त्यांच्यातला डावेपणा अनुभवाला येतो आणि गोंधळ वाढतच जातो. कुठल्याही एका तत्त्वज्ञानाची रेडीमेड झापडे न बांधता जगू पाहणाऱ्यांची ही नेहमीचीच कुचंबणा आहे. असंतुष्ट सॉक्रेटिसाचेच जिणे त्यांच्या वाट्याला येते. ‘देव आहे ऐसी वदवावी वाणी, नाही मनी ओळखावे’ ही प्रचीती तुकोबांनाही आली होती. दीनांचा वाली म्हणून ज्या देवाचे गोडवे आपण गातो, तो तसा वालीबिली नसल्याचे पदोपदी अनुभवाला येऊ लागल्याने तुकारामबुवांनाही पायाखालची वाळू सरकल्यासारखे वाटणे स्वाभाविक होते. ‘राजकारणाच्या लढाईत बाजारबुणगीही चालतात’ असे म्हणून बाजारबुणग्यांना जवळ करून प्रामाणिक लढवय्यांशी जिवघेणा खेळ खेळणारे मान्यवर पुढारी दगडूला भेटतात आणि गोंधळ वाढत जातो. ‘तळाच्या माणसाशी आपण एकनिष्ठ राहावं’ असे दगडूला प्रामाणिकपणाने वाटत असते, पण असा नुसता डांगोरा पिटून त्या तळातल्या माणसांना ‘भांडवला’सारखे वापरून स्वत:ची पोळी पिकवणारे नेतेही त्याला दिसत असतात. मासिक हजार-बाराशे रुपयाची प्राध्यापकी आणि उच्चवर्णीयांच्या वस्तीतला आपला फ्लॅट सजवून परिसंवाद ‘संपन्न’ करणारे पांढरपेशे पुरोगामी, क्रांतिकारक इत्यादी विद्वान आणि विदुषी इतरांना ‘प्रस्थापित’ म्हणून हिणवण्यात धन्यता मानताना आढळतातच की! तेच ढोंग दलित नेते म्हणवणाऱ्यांत झिरपलेले दिसते.




शिकलेल्या दगडूला पहिली नोकरी लागते ती व्हेटर्नरी कॉलेजात. ‘क्लार्क-कम्-लॅबोरेटरी अ‍ॅसिस्टंट’ असा दणकेबाज हुद्दा, पण ती नोकरी मिळण्याचे कारण निराळेच. साऱ्या महाराष्ट्रातून येणाऱ्या रोगी जनावरांच्या शेणाचे नमुने बरण्यांत भरून काचेच्या रॉडने घुसळणे, मेलेल्या जनावरांची कातडी सोलून ती नासू नयेत म्हणून त्यांच्या नसानसांतून अल्कोहोल भरणे हे काम करायला कुणीही उच्चवर्णीय माणूस तयार नसायचा. दगडू म्हणतो, “साले आपण एवढे शिकलो तरी शेवटी आपल्या वाट्याला बापजाद्यांचा धंदा का बरं यावा?... समाजातल्या व्यवस्थेविरुद्ध खरी चीड निर्माण झाली ती या वेळी. आज माझ्या मनात जो विद्रोही कल्लोळ आहे त्याची बीजे ह्या अनुभवात सापडतील. वाटायचं, मुडदेफरासांनी उकरलेल्या मातीसारखी उलथापालथ व्हावी.”

ह्याच काळात दगडू रुपारेल कॉलेजात शिकायला जात होता. तिथे कालिदासाचे मेघदूत शिकावे लागे. मेघदूतातल्या शृंगारिक ओळींनी महिरून जाणाऱ्या पांढरपेशा घरातल्या यक्षिणीही वर्गात असत आणि त्या काळी दगडूचे लग्न होऊनही बायकोशी एकान्त करायला अशक्य असा पत्र्याचा आडोसा. तसल्या त्या आडोशात माणसांची गर्दी. काकूच्या पलंगाखालच्या अडगळीत दगडूची शृंगारशय्या. कल्पनेत कालिदासाचे मेघदूत आणि वास्तवात शेणाचा नरक. त्यातही पुन्हा सासू-सुनेच्या भांडणाचे घरात “विषारी चुबू काटे पसरलेले. सकाळी झाडावं तर संध्याकाळी पुन्हा उगवणारे.”


अशा दोन्ही बाजूंनी फाटलेल्या अवस्थेत जगणारा दगडू वैयक्तिक दु:खे जोजवीत न बसता दलितांच्या चळवळीत पडतो. तिथेही जन्माला आल्याबरोबर पार्टीचे कार्ड चिकटलेले. “सोशल फोर्सच एवढा होता की, तुम्हाला वेगळी पार्टी इच्छा असूनही निवडता येत नव्हती. ज्यांनी निवडली ते बहिष्कृत झाले. त्यांच्या प्रेतयात्रेला जात हजर राहिली नाही. (इथेही पुन्हा जात आहेच!) विंचूरचे रणखांबे, बाबासाहेबांचे चरित्र लिहिणारे खैरमोडे, कॉ. मोरे ही ठळक उदाहरणे.” दलित पुढारी म्हणवणाऱ्यांनादेखील आपल्या फाटक्यातुटक्या कपड्यांतल्या अनुयायांनी मोर्चा मिरवणुकीत आपल्या बरोबरीने चालावे हे मान्य नसायचे राहून आणखी भयंकर भ्रमनिरास दुसरा कुठला व्हायला हवा?


जन्मापासून छळणारा अस्पृश्यतेचा शिक्का तो आपल्या सामाजिक जीवनातून नष्ट व्हावा म्हणून चालवलेल्या चळवळीत आपमतलबी नेत्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाला आलेल्या प्रसंगामुळे वाढत जाणारी निराशा, निर्मितिशील, पण अशा परिस्थितीत शापासारखे ठरणारे मन, ज्या आईने आपल्यासाठी एवढे डोंगराएवढे कष्ट उपसले तिला “उभ्या हयातीत मी काय सुख दिलं?” ही टोचणी. बायकोने एकाएकी घर सोडून एका म्हाताऱ्याशी लग्न करून संसाराचा पट उधळलेला. संगमनेरच्या बाजारात अंगावर विटके लुगडे, डोक्यावर गवताचा भारा आणि पाठीला धोतरात बांधलेले तान्हे लेकरू हे तिचे अनपेक्षितपणे घडलेले दर्शन. स्वत:च्या एकलकोंड्या प्रवासात तीव्र आठवण व्हावी असा एकच, पण दगडूपासून तोडून नेलेला दुवा म्हणजे लाडकी लेक बकुळा. तिलाही तिच्या आईने ‘खाचरा’त ठेवलेले. फाटत फाटत जाणाऱ्या जीवनाला कुठे कुठे आणि किती ठिगळे जोडायची?


‘मडकं असतं तर बोलताना तोंड फुटलं असतं’ अशा तीव्र आवेगाने ही कथा सांगून संपवताना दगडू म्हणतो- “मी आयुष्यभर घाबरतच आलोय. त्याला कारणं जशी वैयक्तिक आहेत तशी ज्या अभावग्रस्त समाजात मी जन्माला आलोय त्यातही सापडतील.”


शेवटी दयाने असा हा आपल्यातला दगडू पाहिला म्हणजे काय पाहिले हे त्याच्या कवितेतूनच सांगितले आहे :


दु:खानं गदगदताना


हे झाड मी पाहिलेलं...


...धमनी-धमनीत फुटू पाहणाऱ्या


यातना


महारोग्यांच्या बोटांसारखी


झडलेली पानं


हे खोड कसलं?


फांदी-फांदीला जखडलेली


कुबडी.


मरण येत नाही


म्हणून मरणकळा सोसणारं...


दु:खाने गदगदलेले झाड आता ‘बलुतं’ नावाचे पुस्तक होऊन आले आहे. पूर्वी धार्मिक ग्रंथाच्या वाचनाने ‘निपुत्रिकाला पुत्र होतील, निर्धनाला धन लाभेल...’ असे शेवटी फलित असायचे. तसे ह्या ग्रंथाचे फलित सांगायचे तर असेच म्हणावे लागेल : “ह्या ग्रंथाच्या वाचनाने आपल्या निबर डोळ्यांना चिकटलेले आंधळ्या रूढीजन्य श्रद्धांचे सत्यदर्शनाला पारखे करणारे मोतीबिंदू गळून पडतील आणि हे भयानक वास्तव पाहता पाहता डोळ्यांत दाटणाऱ्या अश्रूंत नवी किरणे उतरल्याचा साक्षात्कार होईल. माणुसकीच्या अधिक जवळ जाऊन जगायची ओढ लागेल. साऱ्या चांगल्या साहित्याचा हेतू नाहीतरी दुसरा काय असतो? माणसामाणसांत नवे जिव्हाळे जोडून समाजाला कृत्रिम आणि जाचक बंधनातून मुक्त करण्याचाच ना?”


(पु.ल. देशपांडे यांच्या ‘दाद’ या मौज प्रकाशन गृहानं प्रकाशित केलेल्या पुस्तकातून साभार.)

मुळ स्रोत-- https://www.aksharnama.com/client/article_detail/2532

अक्षरनामा

पुलंचा आठव..

 पुलंचा आठव..


एखाद्या रागात वर्ज्य मानलेला सूर दुसऱ्या रागात संवादी असू शकतो, हे सच्चा संगीतप्रेमी समजू शकतो. पु. ल. देशपांडे हे तसे होते..



आपापले वैविध्य जपूनही धर्मजातपातविरहित राहणाऱ्या मोकळेपणाच्या संस्कृतीची गोष्ट ‘बटाटय़ाच्या चाळी’तून सांगणारे पु.ल. हे या महाराष्ट्रीय संस्कृतीतील खरेपणाच्या मूल्यास मानणारे होते. त्यामुळेच सर्व राजकीय विचारधारांच्या टोप्या त्यांनी उडवल्या, तरी दुस्वास कोणाचा केला नाही. पुलंचे हे गुण पुलंसोबतच संपले, असे म्हणावे लागते..


बळवंतराव टिळकांचा कित्ता घेण्यापेक्षा त्यांचा अडकित्ता घेणे हे सर्वकालीन सोयीचे होते. म्हणून समाजाने तेच केले. यात विशेष काही नाही. कारण सर्वसामान्यांना नेहमीच सुलभतेचा सोस असतो. हे अटळ आहे. लोकमान्यांनंतर महाराष्ट्रात इतकी लोकप्रियता लाभलेली व्यक्ती म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. टिळक ते पु.ल. यांदरम्यानच्या टप्प्यात आचार्य अत्रे नावाचे एक अजस्र व्यक्तिमत्त्व या राज्यात होऊन गेले. अत्र्यांवर मराठी माणसाने प्रेम केलेच. पण त्यांना विरोध करणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय होती. त्यात अत्र्यांची शत्रू निर्माण करण्याची खुमखुमी. पुलंच्या बाबत असे काही घडले नाही. याचा अर्थ शत्रुत्व नको म्हणून पु.ल. नेहमी व्यवस्थेशी जुळवून घेण्याचे मराठी कलावंतांचे अंगभूत चातुर्य कुरवाळत बसले असे नाही. जेथे घ्यायला हवी तेथे त्यांनी आवश्यक ती भूमिका घेतली. पण त्या भूमिकेची आवश्यकता संपल्यावर देशपांडे पुन्हा आपल्या ‘पु.ल.’पणात परत गेले. टिळकांप्रमाणे महाराष्ट्राने पुलंवर भरघोस प्रेम केले खरे. पण अंगीकार मात्र कित्त्यापेक्षा अडकित्त्याचाच केला. समग्र ‘पु.ल.’पणातील त्यांच्या नावचे खरेखोटे विनोद तेवढे पुढे पुढे जात राहिले. अफवा ज्याप्रमाणे माध्यमाखेरीजही पसरू शकतात, तसेच हे. अशा वेळी महाराष्ट्रधर्म आणि ‘पु.ल.’पणा यांचा आढावा घेणे गरजेचे ठरते. तो घेताना पु.ल. नेमके कशासाठी आठवायचे, या प्रश्नास भिडावे लागेल.


याचे कारण आजच्या सर्वार्थाने फ्लॅट संस्कृतीतील उच्चभ्रू मध्यमवर्गीय आपल्या सांस्कृतिक जिवंतपणाचा पुरावा म्हणून पु.ल. तोंडी लावत असतो आणि ‘बटाटय़ाच्या चाळी’चे गोडवे गातो. ही ‘बटाटय़ाची चाळ’ हे वाङ्मयीनदृष्टय़ा स्मरणरंजन आहे. पण सामाजिकदृष्टय़ा पाहू गेल्यास ते निर्मम, धर्मजातपातविरहित मोकळेपणाच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. त्या मोकळेपणाच्या वातावरणात पापलेटे आणणाऱ्या कामतमामांच्या हातात जोडीला कोचरेकर मास्तर आहेत. त्रिलोकेकरणीने खास प्रवासासाठी करून दिलेला गोडीबटाटीचा रस्सा मांडीवर सांडला तरी सहन करणारे शेजारी आहेत. ते वाचताना विनोदाने हसू फुटते हे नैसर्गिक. पण त्यामुळे त्यातील खरा आशय दुर्लक्षित राहतो किंवा तो मुद्दामहून दुर्लक्षित ठेवला जातो, असेही म्हणता येईल. ज्या मुंबईत ही बटाटय़ाची चाळ दिमाखात उभी होती, त्याच मुंबईत आज मांसमच्छी खाणाऱ्यांना घरे नाकारणाऱ्या इमारती उभ्या राहतात, याइतका पुलंचा पराभव दुसरा नसेल. तो त्यांना प्रिय मुंबईने केला हे विशेष. या अशा ‘फक्त शाकाहारी’ इमारती उभारणाऱ्यांना मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी वगरे लढणाऱ्या पक्षांचेच संरक्षण आहे, ही बाब पुलंचा पराभव मराठी माणसांनीच केला हे सिद्ध करण्यास पुरेशी ठरते. ‘मी माझा’ या संकुचित वातावरणात ‘बटाटय़ाची चाळ’ ‘एन्जॉय’ करणारे (आनंद घेणारे नव्हेत) दुसरे काय दर्शवतात?


तीच बाब ‘होल केऑसमधून कॉसमॉस निर्माण’ होत असतानाची बाष्कळ बडबड करणाऱ्या ‘असा मी असामी’तील ‘स्पिरिच्युअल’ बाबांबाबत आजही लागू पडते. या बोगस बाबाची यथेच्छ टवाळी पु.ल. करतात. त्यांचा अप्पा भिंगार्डे या बाबाच्या प्रवचनात ‘‘पारशिणीच्या उघडय़ा पाठीकडे’’ पाहात ‘‘ईऽ ठय़ांऽऽश’’ अशा केवळ पुलंच लिहू शकतील अशा आवाजात शिंकतो. अशा दरबारी बाबांकडे जाण्याची गरज वाटणाऱ्या श्रीमंत वर्गाचे प्रतीक म्हणजे ती पारशीण आणि या सगळ्याविषयी अंगभूत तुच्छता दाखवणारा अप्पा भिंगार्डे हा खरा मराठी. या मराठीस काहीएक प्रबोधनाची परंपरा आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळा, रामदास आदी हे संत होते. पण बाबा वा बापू नव्हते. आजच्या मराठी माणसास या दोहोंतील फरक कळेनासा झाला आहे. त्यामुळे या मराठी माणसाची अवस्था पिठात पाणी घालून दूध म्हणून प्यायची सवय झालेल्या अश्वत्थाम्यासारखी झाली आहे. जेव्हा त्यास खरे दूध मिळाले तेव्हा त्याने थू थू म्हणत ते थुंकून टाकले. आजचा सर्वसामान्य मराठी हा असा खऱ्या मूल्यांना झिडकारतो. असे होते याचे कारण तेच. पुलंचा कित्ता न घेता अडकित्ताच घेतला, हे.


पुलंच्या नंतर महाराष्ट्रास विसर पडलेला तिसरा मुद्दा म्हणजे विनोद आणि विद्वत्ता एकत्र नांदू शकते, हे वास्तव. पुलंच्या ठायी ती होती. त्यामुळेच राजकीय विचारधारा असोत वा रवींद्रनाथांचे वाङ्मय वा शेक्सपीअर आदींच्या अभिजात कलाकृती. पुलंनी त्या केवळ नुसत्याच वाचलेल्या नव्हत्या, तर आत्मसात केल्या होत्या. यामुळे त्यांच्यातील लेखकाने विद्वत्तेस पर्याय म्हणून कधी विनोदाचा आसरा घेतला नाही. पुलोत्तर काळात नेमके हेच दिसून येते. या काळात विनोदाचे निर्बुद्धीकरण सामूहिकरीत्या झाले. खाली पडणे नैसर्गिक असते. त्यासाठी गुरुत्वीय बल काम करतेच. त्याविरोधात, म्हणजे गुरुत्वीय बल खाली खेचत असताना त्याविरोधात काम करणे हे खरे आव्हान. ते पुलंनी आयुष्यभर पेलले. त्यामुळे त्यांच्या विनोदास गुरुत्वीय बल खाली ओढू शकले नाही. त्यास विद्वत्तेचा वरून आधार होता. त्यानंतरच्या काळात विनोदाचा दर्जा किती खालावला, हे सांगण्यास उदाहरणांची कमतरता नाही. उलट ती मुबलक आहेत. परिणामी विनोदकार गांभीर्याने घेण्याच्या लायकीचे नसतात, असा समज दृढ झाला. असे होणे या विनोदकारांचा दर्जा पाहता खरे असले, तरी पुलंना घडवणाऱ्या महाराष्ट्राचा तो अपमान आहे, हे आपण विसरलो आहोत. हे अधिक दु:खदायी.


चौथा मुद्दा विरोधक म्हणजे शत्रू असे मानण्याचा. ज्ञानेश्वर ‘दुरिताचे (दुरितांचे नव्हे) तिमिर जावो’ अशी इच्छा बाळगतात. कारण हे ‘तिमिर’ वगळले तर उर्वरित व्यक्ती ही नकोशी वाटायचे कारण नाही. पुलंचा जीवनविषयक दृष्टिकोन हा असा होता. त्यांनी गांधीवाद्यांच्या साधेपणाच्या अतिरेकाची चेष्टा केली, समाजवाद्यांच्या भोंगळपणाची यथेच्छ टिंगल केली, काँग्रेसी बनेलपणाच्या आणि संघीयांच्या साजूक सात्त्विकतेच्या टोप्या उडवल्या. पण वैयक्तिक आयुष्यात यातील कोणाचाही दुस्वास पुलंनी कधी केला नाही. आपल्या विचाराचा नाही, म्हणजे त्याचे सर्वच निंदनीय असे मानणारे महाराष्ट्राचे संकुचित वर्तमान पुलंच्या भूतकाळात या राज्याने कधीही अनुभवले नाही. यातील सर्वच विचारसरणींतील त्रुटी पुलंनी आपल्या शैलीने दाखवल्या. पण एस. एम. जोशी ते स. ह. देशपांडे अशा अनेकांच्या गौरवांकित कार्याशी पु.ल. आपुलकीने समरस झाले होते. हा मोकळेपणा पुढच्या काळात महाराष्ट्राने गमावला. म्हणजे पुलंना पुन्हा एकदा आपण विसरलो.


हे असे सांस्कृतिक- सामाजिक मोकळेपण त्यांच्या संगीतप्रेमामुळे आले असेल का? असेलही तसे. कारण रागात एखादा वर्ज्य स्वर असला म्हणून त्या स्वराच्या नावाने बोटे मोडायची नसतात, ही संगीताची शिकवण. तो एखाद्या रागाशी विसंवाद असणारा एखादा सूर दुसऱ्या रागात संवादी असू शकतो हे सच्चा संगीतप्रेमी समजू शकतो. पु.ल. तसे होते. पण त्यांचे हे संगीतप्रेमही आपण मागे सोडले आणि गोंधळास जवळ केले.


हा गोंधळ म्हणजे लग्नघरातला हवाहवासा गोंधळ नव्हे. ‘नारायणा’ची जागा कंत्राटदारांनी घेतल्यावर तो गोंधळही ठरावीक- उदाहरणार्थ ‘जूते’ लपविण्यासारख्या प्रसंगीच तेवढा होतो. म्हणजे काळ बदलला, हे खरेच. आपण असे नव्हतो, असे रडगाणे गाण्यात आता अर्थ नाही हेही खरे. पण आपण कसे होतो समजण्यासाठी पुलंचा आठव आवश्यक असतो. आज ते असते तर शंभर वर्षांचे झाले असते. या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांचा हा आठव.


लोकसत्ता

८ नोव्हेंबर २०१९

शिक्षकांनीच घडवलं...

 शिक्षकांनीच घडवलं...


मी शाळेत होतो, तेव्हा वर्गात २५-२६ मुलं असायची. ही ५०-५५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. वर्ग इतका लहान असल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक ओळखत असत. या मुलाच्या घरची परिस्थिती कशी आहे? तो कुठे राहतो? त्याचे मित्र कोण? वगैरे... शाळांना राष्ट्रीय शाळा म्हणत. सरकारी शाळांच्या मानाने इथे शिक्षकांना पगारही कमी मिळायचा. ध्येयवादी शिक्षक अशा राष्ट्रीय शाळांत येत असत. मुलांच्या मनात देशाविषयी प्रेम निर्माण व्हावं, चैन, पोषाखीपणा, ऐषआराम ही वृत्ती मुलांमध्ये नसावी, यासाठी शाळेमध्ये स्वदेशी वस्तूंचं प्रदर्शन भरवलेलं जायचं. थोर देशभक्तांची चरित्रं सांगितली जायची. उत्तम व्याख्यानं व्हायची. मुलांचं शारीरिक- मानसिक बळ वाढावं, यासाठी निरनिराळे कार्यक्रम चालू असायचे. असल्या वातावरणात अमुक एकाच शिक्षकाने मला घडवलं किंवा परिणाम केला, असं म्हणणं बरोबर होणार नाही. तरीसुद्धा काही शिक्षक विशेष आठवतात.



माझ्या लहानपणी ज्यांनी मला साहित्य, संगीत, नाटक पाहून उत्तेजन दिलं, तू चांगला लेखक होशील, नाटकांत चांगलं काम करू शकशील, असा नुसता आशीर्वादच दिला नाही, तर आत्मविश्वासही निर्माण केला, अशा माझ्या शिक्षकांमध्ये तारकुंडे मास्तरांची मला खूप आठवण येते. तारकुंडे मास्तर आम्हाला फिजिक्स- केमिस्ट्री शिकवायचे. पण मैदानात आमच्याबरोबर क्रिकेट खेळत. स्नेहसंमेलनात नाटकं बसवत. मी १५ वर्षांचा होतो, तेव्हा 'बेबंदशाही'ची स्त्रीपात्रविरहित रंगावृत्ती मी तयार केली होती. तारकुंडे मास्तरनी माझं कौतुकच केलं नाही, तर त्यांनी स्वतः ते नाटक आम्हा विद्यार्थ्यांकडून बसवून घेतलं. मी त्या नाटकात संभाजीचं काम केलं होतं.नाटकातलं भाषण म्हणून झाल्यावर कडकडून टाळ्या पडणारा तो पहिला अनुभव मी त्या वेळेला घेतला आहे.

तारकुंडे मास्तरांना मुलांच्यावर कधी रागवावंच लागलं नाही. तसे ते चांगले उंचेपुरे होते. धिप्पाड म्हणावी, अशी देहयष्टी होती. पण बोलण्यात इतका जिव्हाळा होता की, फिजिक्ससारखा विषयही कवितेसारखा वाटायचा. तारकुंडेंच्या सारखेच आमचे फडके मास्तर. ते गणिताचे शिक्षक. पण उत्तम क्रीडापटू. गोरेपान, सडसडीत शरीर, खादीचा पायजमा, शर्ट, कोट अशा वेशातले. डोक्यावर टोपी न घालणारे माझ्या लहानपणी दोघेच शिक्षक होते. फडके आणि व्ही. डी. चितळे. वास्तविक मी गणितात खूप कच्चा. पण फडके मास्तर त्याबाबतीत मला कधीही न रागावता माझ्या पेटीवादनाचं कौतुक करायचे. माझं संगीताचं प्रेम या गणिताच्या फडके मास्तरांनी आणि ड्रॉइंग मास्तरांनी- कोंडकर मास्तरांनी- वाढीला लावलं. गणिताप्रमाणेच मला चित्रकलेतही अजिबात गती नसायची. एकदा या कोंडकर मास्तरांनी मला ड्रॉइंगच्या तासाला फ्री-हँड ड्रॉइंग काढायला सांगितलं. मी हताश होऊन समोरच्या कोऱ्या कागदाकडे बघत बसलो होतो. त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक? ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, 'काय रे? तुझा कागद कोराच?' मी अगदी रडायच्या घाईला आलो होतो. मी रडू आवरत म्हणालो, 'मला चित्र काढायला येत नाही, सर!' 'अरे, तू चित्र काढायला सुरुवातच केली नाहीस, तर येतच नाही हे कसं? रेघा तर ओढायला लाग. आलं तर आलं. नाही आलं तर नाही आलं. परवा पेटी काय छान वाजवलीस. ती काय आपोआप आली? अरे, आपल्या बोटात काय लपलेलं असतं, ते आपल्यालासुद्धा ठाऊक नसतं.' मी लगेच रेघोट्या ओढायला सुरुवात केली. कोंडकर मास्तरांचा नि माझा एक खासगी करार होता. मी इतर विषयांत पहिल्या श्रेणीतले मार्क मिळवले, तर ते मला ड्रॉइंगमध्ये पास करणार होते... आणि गंमत अशी की, मीही त्यांना उगीच पास करायला लागू नये म्हणून प्रयत्नपूर्वक ड्रॉइंगकडे लक्ष द्यायला लागलो. माझी बोटेही साथ द्यायला लागली.


आणखी एका शिक्षकांची मला नेहमी आठवण येते. ती म्हणजे व्ही. डी. चितळे मास्तरांची. पुढे फार मोठे साम्यवादी नेते म्हणून त्यांचं नाव झालं. ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धा दूरदर्शनवरून पाहताना मला त्यांची खूप आठवण झाली. त्यांनी आम्हाला त्या काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या ध्यानचंद आणि इतर खेळाडूंचा खेळ दाखवला होता. ते आम्हाला इतिहास शिकवीत. पण स्वतः मात्र उत्तम खेळाडू होते. खूप देखणे होते. लालबुंद चेहरा. उत्तम आरोग्याचा आदर्श नमुना असावा, असे दिसायचे. सदैव हसतमुख. उत्कृष्ट वक्तृत्व. ते बोलायला लागले की, आम्ही मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं ऐकत असू. माझी वक्तृत्वाची आवड चितळे मास्तरांनी जोपासली. त्यांनी मला दिलेला एक गुरूमंत्र आठवतो. ते म्हणाले होते, 'समोर गर्दी कितीही असो, त्यातल्या एकाशी बोलतोय, असं समजून बोलत जा. म्हणजे त्या गर्दीतल्या प्रत्येकाला तू त्याच्याशी बोलतोस असं वाटेल. फोटोतली सरस्वती कशी आपल्याकडेच पाहते असं वाटतं ना? तसं!' या शिक्षकांनी केलेल्या चांगल्या संस्कारांनी घडून मी किती चांगला झालो, हे मला सांगता येणार नाही. पण त्यांच्याविषयी मात्र माझ्या मनात खूप मोठी कृतज्ञता आहे. त्यांची आठवण झाली की, मी पुन्हा शाळकरी वयाचा होतो.


पु.ल. देशपांडे

महाराष्ट्र टाईम्स

५/९/२०१३

कशासाठी? पोटासाठी... खंड्याळ्याच्या घाटासाठी

 कशासाठी? पोटासाठी... खंड्याळ्याच्या घाटासाठी

...............

‘कशासाठी? पोटासाठी... खंड्याळ्याच्या घाटासाठी’ हे काही नुसतंच एक बालगीत नाही. पुण्या-मुंबईच्या प्रवासात आगगाडीच्या ठेक्यावर ज्या कुणाला ते प्रथम सुचलं, त्यानं या वरपांगी केवळ बाळगोपाळांसाठी रचलेल्या ओळीमागं जगण्याचं एक फार मोठं सूत्र दडवलं आहे.


पावसाळ्याचे दिवस होते. पुण्या-मुंबईचा आगगाडीनं प्रवास करत होतो. अचानक मला खडकामागं दडलेला झरा दिसावा तसं त्या गाण्यामागलं सूत्र सापडलं. पुणं-मुंबई प्रवासातच कशाला? साऱ्या जीवनातच ‘कशासाठी?’ याचं पहिलं उत्तर ‘पोटासाठी’ हेच आहे; पण एवढंच नाही. ‘पोटासाठी’ या उत्तराला शंभरातले फक्त पास होण्यापुरते मार्क आहेत. त्यापुढलं ‘खडाळ्याच्या घाटासाठी’ हे फार महत्त्वाचं आहे.


आमची गाडी ‘कशासाठी पोटासाठी’ करत चालली होती. डब्यातली मंडळी इकडल्या-तिकडल्या गप्पांत रंगली होती. बोगद्यातून गाडी बाहेर आली आणि गप्पा थांबल्या. सगळ्यांचे डोळे खिडक्यांबाहेर लागले. श्रावणाचे दिवस होत आणि बाहेर हिरव्याचा सोहळा साजरा होत होता. आतापर्यंत जी मंडळी दैनंदिन कटकटीच्या गोष्टी बोलत होती, ज्यांच्या चेहऱ्यावर मुख्यत: वैतागच दिसत होता, त्यांचेदेखील चेहरे बदलले. जो तो एक-दुसऱ्याला सह्याद्रीवर चढलेली ती झऱ्यांची आणि धबधब्यांची लेणी दाखवायला लागला. रिव्हर्सिंग स्टेशनजवळचा तो अलौकिक चित्रपट, ती नागफणी, त्या दऱ्या, एखादी टणाटण उड्या मारत जाणारी माकडांची टोळी, तीन दिवसांचं चरित्र होऊन फुललेला तेरडा, ते हिरवं तळकोकण... साऱ्या डब्याचा नूरच बदलला. कोणीतरी सांगत होतं, पुण्या-मुंबईसारख्या आगगाडीचा प्रवास जगात कुठं नसेल. काय सुंदर आहे!


‘कशासाठी? पोटासाठी!’चा उत्तरार्ध खंडाळ्याच्या घाटानं पुरा केला. डब्यातली मंडळी काही प्रथमच त्या गाडीनं मुंबईला निघालेले नव्हती. गिरणी-कारखान्यांतून किंवा कचेऱ्यांमधून सोय पाहणारांना ‘पोटासाठी’च आमची आगगाडी ओढून नेत होती आणि नेता नेता सांगत होती, की नुसतं पोटासाठी नव्हे, तर खंडाळ्याच्या घाटासाठीसुद्धा. इथल्या गर्द वृक्षराजीसाठी... रानफुलांसाठी... झऱ्यांसाठी... धबधब्यांसाठी. पाळण्यातल्या पोराच्या अंगावरून हलकेच दुलई ओढावी तसं हिवाळ्यात डोंगरमाथ्यावरून धुकं ओढलं जातं हे पाहण्यासाठी!


एखादी मुन्सिपालटी जेव्हा नाटकाचं थेटर बांधते त्या वेळी कशासाठीचं उत्तर फक्त ‘पोटासाठी’ एवढंच ज्यांना मान्य आहे, त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. रोज दाराशी कचऱ्याची पेटी साफ करणारा माणूस रात्रीच्या गाण्याच्या बैठकीत बाजाची पेटी वाजवताना दिसला, तर जसा धक्का बसेल तसा धक्का बसतो. कारण ते हात फक्त झाडू धरण्यासाठीच निर्माण झाले आहेत, ती बोटं आपल्या पोरांची बेफिकिरीनं रस्त्यात केलेली विष्ठा गोळा करण्यासाठी उपयोगात आणायच्या योग्यतेची आहेत, हे ह्या असल्या प्रवृत्तीच्या लोकांनी स्वत:च ठरवलेलं असतं.


‘म्युनिसिपालिटी’ ही संस्था बिचारी जन्मकाळीच काही अनिष्ट ग्रह घेऊन उपजली. संपूर्ण स्वराज्याची हक्कानं मागणी करणाऱ्या भारतीयांच्या पदरात इंग्रजांनी स्थानिक स्वराज्य टाकलं. पंक्तीला मानानं बसण्याचा हक्क असलेल्यांची उष्टी पत्रावळ टाकून बोळवण केली अशी लोकांची भावना झाली. ‘आम्हाला तुमचे हे स्थानिक स्वराज्य नको,’ ही राष्ट्रीय प्रवृत्तीच्या माणसांची पाहिली प्रतिक्रिया होती. हे नको असलेलं पोर घरात कुणीतरी आणून टाकलं होतं. त्यामुळं म्युन्सिपालटीत जाणारे मेंबर एक तर अराष्ट्रीय इंग्रजधार्जिणे किंवा कोणी तरी गल्लीगणेश हाच ग्रह मनात रुजला. लोकशाहीचा श्रीगणेशा गिरवण्याची पाटी आपल्या हाती लागली आहे असे न मानता, केवळ रस्त्यातला केर काढण्याचा आणि मयताचे पास लिहिण्याचा अधिकार देऊन इंग्रजानं आपल्याला फसवलं, असं भारतीयांना वाटलं. त्यातून महाराष्ट्रात तर माधवराव जोशांच्या ‘म्युनिसिपालिटी’ नाटकानं म्युनिसिपालिटीची प्रतिमाच अशी खुळ्यांचा दरबार असल्यासारखी रंगवली, की पुन्हा तो खरवडून स्वच्छ सुंदर करणं जवळजवळ अशक्य करून टाकलं. दुर्दैवानं आसपास घडतही तसंच होतं. माधवरावांच्या विनोदी प्रतिमेला पंचपक्वान्नांचं खाद्य पुरवण्याची जणू अहमहमिका लागली होती. ‘म्युन्शिपालटीची मेंबरं’ ही जशी काही जीवनातल्या नाटकात विनोदी पात्रं म्हणूनच अवतरली आहेत, ही कल्पना रूढ झाली.


बरं, लोकांच्या पुढं तरी म्युनिसिपालिटी म्हटल्यावर चित्रं काय उभी राहत होती... कचऱ्यांचे ढिगारे आणि सटीसामाशी ते हलवायला येणाऱ्या गाड्या.... रस्त्यात ओशाळवाणं होऊन वेडंवाकडं उभं राहिलेल्या दिव्याचं ते करुण मिणमिणणं... म्युन्सिपाल्टीच्या शाळांचे ते कोंडवाडे.. ते भयाण मोफत दवाखाने... आणि अखेरचा तो अटळ पास... ही असलीच विद्रूप चित्रं! सार्वजनिक निवडणुकांचा तो पहिलावहिला अनुभव. मतासाठी चालणाऱ्या उमेदवारांच्या त्या दिव्य लीला लोक प्रथमच पाहत होते. कारभारातला ‘आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी’ हा गलथानपणा अनुभवायला मिळत होता. असल्या या विसंवादी वातावरणात वाढणारं हे पोर पुढं काही पराक्रम करून दाखवू शकेल ही मुळी कुणाची अपेक्षाच नव्हती. विड्यांची थोटकं टाकायच्या डबड्याला ‘मुन्शिपालटी’ म्हटलेलं आजही आढळतं. असल्या ह्या अवलक्षणी बाळाकडून जीवनात कसल्याही पराक्रमाची अपेक्षा करायचीच कशी?


स्वातंत्र्यानंतर मात्र परिस्थितीत बदल घडायला लागले. मुख्य फरक पडला म्हणजे ‘म्युनिसिपालिटीची’ नगरपालिका झाली. हा केवळ नावापुरताच फरक आहे असे मी मानत नाही. हिंदी भाषेत ‘नागर-निगम’ म्हणतात. मला त्यापेक्षा ‘नगरपालिका’ हा शब्द अधिक योग्य वाटतो. इंग्रजांच्या राज्यात ज्या ज्या काही सुधारणा घडायच्या त्या साहेबाच्या मेहेरबानीनंच घडायच्या. या सुधारणांना नोकराला दिलेल्या ‘पोस्ता’चं स्वरूप असे. स्वातंत्र्यानंतर भारतीय जनमानसात घडलेला महत्त्वाचा बदल म्हणजे चांगल्या रीतीनं जगण्याच्या हक्काची जाणीव. आता सार्वजनिक बाग ही महाराणीच्या वाढदिवसाची गरिबांना भेट म्हणून नव्हे, तर एक सार्वजनिक गरज म्हणून फुलवलीच पाहिजे - असल्या सुंदर बगिच्यांतून फिरणं आणि जीवनाचा आनंद उपभोगणं हा आमचा हक्क आहे - ही भावना उत्पन्न झाली. ‘गोरगरीब’ हा शब्द केवळ आर्थिक संदर्भात राहिला. गुरासारखा गरीब या मानसिक संदर्भात नव्हे. लोकशाहीनं गोरगरिबांतल्या गरीब माणसाला श्रीमंताइतकाच शासनाला प्रश्न विचारण्याचा आणि शासनाच्या कारभारात भाग घेण्याचाही हक्क दिला. माणसं मनानं ‘स्वतंत्र’ होणं हा राजकीय स्वातंत्र्याचा उद्देश हळूहळू उमगायला लागला. ‘म्युन्सिपालिटीचा कारभार ना? हा असाच चालायचा,’ ही उपेक्षेची किंवा असहायपणाची जाणीव जाऊन म्युन्सिपालिटीचा कारभार कसा चालला पाहिजे, याचा आता विचार होऊ लागला. आचाराची पहिली पायरी विचार ही आहे.


आता म्युन्सिपालिटीकडे पालकत्वाची भूमिका आली. कराच्या रूपात वसूल केलेल्या रकमेच्या विनियोगातून केवळ सार्वजनिक आरोग्यच नव्हे, तर मानसिक आरोग्यही सुधारलं पाहिजे या कर्तव्याची जाणीव हे पालकत्व करण्यासाठी निवडलेल्या नगरपित्यांना झाली. (ज्यांना अजूनही झाली नसेल त्यांनी ती करून द्यायला हवी.) गेल्या दहा-पंधरा वर्षांत आपल्या पुणे शहरातच केवढा विलक्षण फरक पडला! - रोज पडतो आहे. ‘आम्हाला अधिक सुंदर वातावरणात जगण्याचा हक्क आहे,’ असा जणू काय एक मूक आक्रोश चालावा, अशा रीतीनं पुण्याच्या पुराण्या नगररचनेत बदल घडून येताहेत.


आज एखादा पुणेरी रिप व्हॅन विंकल जागा झाला, तर पुण्यातले रुंदावलेले रस्ते, तळ्यातल्या गणपतीपुढचा बगीचा, संभाजी उद्यान, शाहू उद्यान, पेशवे उद्यान, रुंद केलेला लकडी पूल, कोपऱ्या-कोपऱ्यांवर उभे केलेले देखणे पुतळे हे सारं पाहून तो बावचळून जाईल. हे सारे बदल घडून आले याचं कारण प्रथम वैचारिक बदल झाला. म्युन्सिपालिटीकडे आता पालकत्वाची भूमिका आली. एके काळचा ‘मेंबर’ हा आता नगरपिता झाला.


हा फरक काही एका रात्रीत झाला नाही. रोम काही एका दिवसात बांधलं नव्हतं. अनेक प्रकारच्या विरोधांतूनच हा बदल होत गेला. समाजात विद्युत्प्रवाहाप्रमाणं करणात्मक आणि अकरणात्मक प्रवाह असतात. निसर्गात कुठलाच बदल संघर्षाशिवाय घडत नाही. आपण जगत असतो म्हणजे क्षणाक्षणाला मरत असतो हे जसं आहे, त्याचप्रमाणं साऱ्या मानवी समाजाचं आहे. ‘जुनें जाउं द्या मरणालागुनि’ म्हणावंच लागतं. लहानग्या, चिमुकल्या बोळांशी काही सुखद आठवणी गुंफलेल्या असतीलही; पण ते बोळ आजूबाजूची घरं पाडून रुंद करावे लागतात. अशा वेळी विरोध सुरू होतो. त्यातून चिरोट्यासारखे समाजाचेदेखील पापुद्रे असतात. काही वरचे, काही खालचे. काहींना साखरेचं साहचर्य अधिक, काही त्या गोडव्यापासून वंचित...! बालपणातले संस्कार निराळे असतात. आर्थिक परिस्थिती भिन्न असते. पूर्वग्रह असतात. स्वार्थ असतो. बुद्धिमत्तेत दर्जे असतात. या नानाविध कारणांनी सार्वजनिक जीवनात ‘सर्वेषाम् अविरोधेन’ चालणं दुरापास्तच असतं. त्यामुळं ज्यांना भविष्याचं दर्शन आधी घडतं, त्यांना सदैव विरोधच होतो. ज्या पुण्यात शाळेत शिकायला जाणाऱ्या मुलींच्या अंगावर चिखलफेक होत असे, त्याच पुण्यात फटफटीच्या मागल्या सीटवर आपल्या वृद्ध वडिलांना बसवून डॉक्टरांच्या दवाखान्याकडे नेणारी सुकन्या आढळते. हा बदल घडवायला फुले-आगरकर-कर्वे यांसारख्या देवमाणसांना काय भयंकर भोग भोगावे लागले आहेत! पुण्यात साधी बस सुरू झाली त्या वेळी ‘पुण्यात कशाला हवी होती बस? इथं सायकलीवर टांग टाकली की तासाभरात नगरप्रदक्षिणा करता येते!’ - म्हणणारे लोक होते. आज बसेस अपुऱ्या पडतात.


एकदा ही पालकत्वाची भावना रुजल्याबरोबर पाल्याच्या सर्वांगीण विकासाची जोपासना नगरपित्यांवर आली.


पूर्वीही म्युनिसिपल शाळा होत्या. परंतु तिथं उत्तम दर्जाचं शिक्षण द्यायचं आहे ही भावना नव्हती. गरिबांच्या पोरांना चार अक्षरं लिहिता आली आणि जुजबी आकडेमोड करता आली की संपलं, ही भावना होती. त्यामुळं इतरत्र पोटापाण्याची सोय होऊ न शकणारे व्हर्नाक्युलर फायनल तिथं शिक्षक म्हणून जात. त्यांचे पगार अपुरे. त्या काळातल्या स्वस्ताईलाही अपुरे असत. जोड-उद्योग म्हणून त्यांतले काही बिचारे लग्नातल्या पंक्तीत वाढप्याचं काम करत. शाळेतले विद्यार्थी दरिद्री, शिक्षक दरिद्री आणि इमारतीही दरिद्री! यापुढं खासगी शाळांपेक्षाही नगरपालिकेच्या शाळा अधिक सुंदर हव्यात हा आग्रह सुरू झाला. ‘मंडई’ हे केवळ भाजीपाला विकत घेण्याचं स्थान न राहता सहज मौज म्हणून फिरून यावं अशी सुंदर जागा झाली. उपयुक्ततेच्या आणि स्वच्छतेच्या जोडीला सौंदर्य हा विचार आला. नागरिकांचा मानसिक विकास हा आता नगरपालिकेच्या कक्षेत आला. थोडक्यात म्हणजे कल्याणकारी राज्याच्या कल्पनेत प्रजेच्या सर्वांगीण विकासाची जी जबाबदारी असते, ती आता नगरपालिका आणि पुण्यासारख्या झपाट्यानं वाढणाऱ्या शहरात महानगरपालिकेकडे आली. गल्लीबोळांनी बुजबुजणाऱ्या गावाचं महानगर झालं. साहजिकच इथल्या नागरिकाचाही महानागरिक झाला. त्याला नगरविकासाची नवी आणि भव्य स्वप्नं पडायला लागली.


एके काळी जिथं फक्त गुन्हेगार वसाहत नावाची निराळी वसाहत असे, तिथं लोकांचं आर्थिक जीवन समृद्ध व्हावं म्हणून औद्योगिक वसाहती झाल्या. कारखान्यांचा कळकट-धुरकटपणा जाऊन कारखान्यांच्या आवारात सुंदर हिरवळी आल्या, बागा आल्या. आणि आधुनिक पद्धतीनं बांधलेल्या घरांच्या वसाहती आल्या. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहं ही कॉलेज चालवणाऱ्यांची जबाबदारी होती. आता महानगरपालिकेनं विद्यार्थ्यांची वसतिगृहं बांधली. मुक्तद्वार वाचनालय आलं. जुन्या बुद्रुक पेठांच्या जागी जिथं मोकळी हवा खेळते अशा नव्या पेठा आल्या. ओसाड पडीक जमिनीचं भाग्य उदयाला आलं. तिथं बागा आल्या. जी पर्वती गावाबाहेर होती तिचाच आस करून पुणे शहर तिच्याभोवती आता चक्राकार वाढू लागलं आहे. अनेक गरजा वाढल्या. क्रीडांगणाची भूक वाढली. भव्य स्टेडियम उभं राहिलं. गलिच्छ वस्त्यांच्या निर्मूलनाचे प्रश्न आले. सुदृढ शरीरावर खरजेचे फोड उठावे तशा या झोपड्या डोळ्यात खुपू लागल्या; पण त्याबरोबरच पालकत्वाच्या भावनेमुळं त्यांची अधिक चांगल्या ठिकाणी सोय करण्याची जबाबदारी आली.


आपल्या महानगराच्या सर्वांगीण विकासात कशाकशाची उणीव आहे, त्याचा खूप जोरानं विचार सुरू झाला. नागरिकांनी वर्तमानपत्रांतून ते विचार व्यक्त करायला सुरुवात केली. परदेशपर्यटन करून आलेल्या लोकांनी तिथल्या महानगरपालिकांनी केलेल्या चांगल्या कार्याची माहिती लोकांना दिली. प्रत्यक्ष पर्यटन केलेल्या लोकांनीच नव्हे, तर माहितीपटांतून, मासिकांतून, ग्रंथांतून, वास्तुशिल्पाच्या नव्या ज्ञानातून, उपयुक्तेतच्या जोडीला सौंदर्यही हवं हा विचार दृढ झाला. अनेक मार्गांनी हा विचार आणि असंतोष प्रकट होऊ लागला. आता आपला असंतोष प्रकट केला तर तो वांझोटा ठरणार नाही, याची खात्री वाटायला लागली होती.


जीवनातल्या सर्वच अंगांनी आता ‘कशासाठी? पोटासाठी’च्या बरोबर जीवनातल्या खंडाळ्याच्या घाटातल्या सौंदर्याचा शोध अधिक जोमानं सुरू होतो आहे. आपण ह्या जगात नुसतेच पोटार्थी म्हणून आलो नाही, तर आनंदयात्री आहोत याची भावना समाजात अधिक रुजवायला पाहिजे, हा विचार समाजाच्या सर्व थरांतून रूढ होतो आहे. ते सौंदर्यमय वातावरण निर्माण होण्यासाठी आवश्यक असणारा आर्थिक विकास कसा घडेल याचीही दक्षता घेतली जाते आहे. सौंदर्याचा शोधदेखील खंडाळ्याच्या घाटातल्या चढणीसारखाच आहे. अनंत अडचणी आहेत. परंतु मला आर्थिक अडचणींपेक्षा मनाची आणि विचारांची दारं बंद करून बसणाऱ्यांच्या विरोधाची अडचण भयंकर वाटते. निव्वळ उपयुक्ततावादी मंडळीपुढं हात टेकावेसे वाटतात. या लोकांच्या मनाची घडणच मला समजू शकत नाही. बोहल्यावरच्या वधूवरांच्या मस्तकांवर मंगलाक्षतांचा वर्षाव होत असताना ह्या असल्या येरूंच्या मनात देशातल्या लोकसंख्येचा प्रश्न आता अधिक बिकट होणार ही भीती नक्की उभी राहत असणार. नव्या जीवनाच्या उंबरठ्यावर पडणाऱ्या सोनपावलांचं सौदर्य त्यांना दिसणार नाही.


‘मुन्शिपालट्यांचा आणि थेटरांचा संबंध काय?’ हा प्रश्न असल्या अगम्य डोक्यांतूनच उभा राहतो. सुदैवानं पुण्याच्या महानगरपालिकेच्या पालकत्वाची भावना असलेल्या नगरपित्यांनी असल्या विरोधाला उत्तम नाट्यगृह उभारूनच उत्तर दिलं आहे.


माझ्या माहितीप्रमाणं पुणे महानगरपालिकेनं हे रंगमंदिर उभारून साऱ्या भारतात एक नवा अग्रमान मिळवला आहे. पुणे महानगरपालिकेच्या बागा होत्या. आज फुललेल्या, कोमेजलेल्या, अर्धस्फुट अशा अनेक मानवी मनाच्या कळ्या, फुलं आणि निर्माल्य झालेल्या मनाचं दर्शन जिथं घडतं अशी ही बागच ‘बालगंधर्व नाट्यमंदिर’ हे नाव घेऊन उभी राहत आहे. संभाजी उद्यानशेजारी हे रसिकांची आणि कलावंतांची मनं फुलवणारं उद्यान उभं राहत आहे आणि केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आरोग्य सुधारण्याची नवी जबाबदारी आता पुणे महानगरपालिकेनं स्वीकारली आहे.


बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी यशवंतराव चव्हाण, पु. ल. देशपांडे आणि अन्य मान्यवर. (फोटो राजहंस परिवाराच्या संग्रहातून साभार)श्रीपाद कृष्णांनी मराठी मनाचं वर्णन ‘आकांक्षांपुढतिं जिथें गगन ठेंगणे’ असं केलं आहे. एव्हान नदीच्या काठी स्ट्रॅटफर्डला शेक्सपिअरचं भव्य स्मारक उभं आहे. आज मुळामुठेच्या तीरी पुण्याला, इंग्रजांना शेक्सपिअर जितक्या प्यारा तितकाच मराठी माणसांना प्यारा असणाऱ्या त्यांच्या लाडक्या बालगंधर्वांचं स्मारक उभं राहतं आहे. वास्तूची भव्यता ती उभारणाऱ्यांच्या मनाची भव्यता दाखवते. आज हे नाट्यमंदिर पाहताना कलावंतांचं मन पुण्याच्या नागरिकांविषयी कृतज्ञतेनं भरून येईल. पुण्याच्या रसिक नागरिकांना अभिमानानं म्हणावंसं वाटेल, की ज्या थोर कलावंतानं आयुष्याची साठ-सत्तर वर्षं आमच्या जीवनात अपार आनंद दिला, ज्याची गोजिरी पार्थिव मूर्ती नष्ट झाली, तरी ज्याचे अपार्थिव स्वर अमर आहेत, त्याचं स्मृतिमंदिर आम्ही प्रथम उभं केलं, आणि ज्यांच्या मनाची दारं मोकळी आहेत आणि ज्यांना भविष्याचं दर्शन घडू शकतं असे लोक म्हणतील की, ‘वा! पुण्याची ही महानगरपालिका नव्या काळाची पाउलं ओळखणारी आहे. पालकाच्या पोटी असणारं प्रेम जाणणारी आहे.’


मनुष्यप्राण्याला भाकरी तर हवीच हवी. ती त्याच्यातल्या प्राण्याची भूक आहे. त्याची दुसरी भूक आहे ती शरीरापलीकडे नांदणाऱ्या आनंदाची. ती भागली तरच त्या प्राण्यातलं मनुष्यत्व प्राणीपणावर मात करून जाऊ शकतं. ही भूक संभाजी उद्यानातलं एखादं गुलाबाचं फूल भागवतं, नेहरू स्टेडियमवर रंगलेला खेळ पाहताना ती भागते. उद्या या बालगंधर्व रंगमंदिरात बालगंधर्वांच्याच सुरांतून स्फूर्ती घेऊन गाणारी पुढल्या पिढीतली एकलव्यासारखी बालगंधर्वांच्या गायकीची उपासना करणारी कलावती तरुणी गाईल. त्या वेळी समोरचा रसिकही ही दुसरी भूक भागल्यामुळं तृप्त होईल. बालगंधर्व रंगमंदिराला काय किंवा संभाजी उद्यानातली बहरलेली फुले पाहून मिळालेला काय, जो दुवा मिळेल, त्या प्राप्तीतला अर्धा वाटा महानगरपालिकेचा असेल.


नगरपिते येतात-जातात. जाणाऱ्या नगरपित्यांनी जाता जाता मागं पाहावं आणि आपण ज्यांचे पालक म्हणून त्या स्थानावर बसलो त्या पाल्यांसाठी आनंदाचा असला कुठला ठेवा ठेवून चाललो आहो त्याचा स्वत:च्याच मनाशी हिशेब करावा. मतदारांना गुंगवणारे अहवाल देता येतात. स्वत:च्या मनाला फसवणारा हिशेब नाही करता येत. नव्यानं नगरपिते होऊ पाहणारांनी ही पालकत्वाची भूमिका नीट मनात बाळगावी. दुर्दैवानं आजही काही अपवाद सोडले तर सार्वजनिक जीवनात सर्व प्रकारची निर्मलता अभावानंच दिसते, आणि म्हणूनच असल्या अनेक अमंगल शक्तींवर मात करून जीवनातल्या सौंदर्याच्या उपासनेची ही असली भव्य आणि सुंदर स्थानं महानगरपालिकेकडून उभी केली जातात त्या वेळी उदंड वाटतं.


या प्रसंगी बालगंधर्वांच्या स्मृतीला वंदन करताना पुढल्या पिढ्यांसाठी मराठी रंगभूमीवरच्या अनभिषिक्त सम्राटाचं भव्य स्मारक उभारणाऱ्या पुण्याच्या महानगरपालिकेला, पर्यायानं पुण्याच्या साऱ्या नागरिकांना अंत:करणपूर्वक धन्यवाद देतो. वेरूळ-अजिंठ्यानंतर केवळ निर्मळ आनंदासाठी उभारण्याच्या भव्य वास्तुशिल्पाची परंपरा परकीयांच्या राजवटीत भंगली होती. ह्या सुंदर आणि भव्य वास्तूच्या रूपानं त्या परंपरेचा जीर्णोद्धार होवो आणि ‘उत्कट भव्य तें घ्यावें’ म्हणणाऱ्या समर्थांच्या वंशातले आम्ही आहोत, हे असल्या वास्तूंकडे अंगुलिनिर्देश करून म्हणण्याचं भाग्य आम्हांला लाभो, ही माझी इच्छा व्यक्त करतो.


(स्मरणिकेतील हा लेख मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘पुरचुंडी’ या पुस्तकात पुनर्मुद्रित करण्यात आला आहे. ‘पुलं’च्या साहित्याचे स्वामित्व हक्क असणाऱ्या ‘आयुका’ची परवानगी घेऊन हा लेख येथे प्रसिद्ध केला आहे.)


मूळ स्रोत - https://www.bytesofindia.com/P/UZWBBI

Powered by PrintFriendly.com

Privacy

हिशेबी माणूस

 हिशेबी माणूस


अरसिकाला कविस्य निवेदन करण्याचा प्रसंग माझ्या कपाळी लिहू नकोस असं कोण्या संस्कृत कवीनें परमेश्र्वराला त्रिवार बजावून ठेवले आहे. पण प्रत्येक गोष्ट जेथल्या तेथें ठेवण्याचे वेड असलेल्या माणसाकडून आपल्या व्यवस्थितपणाची निवेदने ऐकण्यापेक्षा ते काम किती तरी सुसह्य म्हणावे लागेल.


फारा दिवसांपूर्वीची आठवण आहे. एका मित्राबरोबर त्याच्या एका वृद्ध नातलगांच्या घरी गेलो होतो. माझं काहीच काम नव्हतं. माझ्या मित्राला कांही निरोप वगैरे सांगायचा होता. दारांत शिरतांनाच फाटकावर बोर्ड होता – ‘आंत येणाऱ्याने फाटक लावून घेण्यास विसरूं नये.’ मनांत विचार आला आंत येणाऱ्यानें जर विसरूं नये तर बाहेर जाणाऱ्यानें विसरले तर चालेल काय? मी न विसरतां बागेचे फाटक लावून घेतले. आंतल्या बाजूने बोर्ड होता ‘बाहेर जाणाऱ्याने फाटक लावून घेण्यास विसरूं नये.’ ‘मनुष्यस्वभावाचा काय सूक्ष्म अभ्यास आहे.’ मी मनांत म्हणालो, दाराशी आलो. वर्दी देण्याच्या घंटीखालीच एक चिठ्ठी चिकटविलेली होती. ‘घंटी एकदांच वाजवावी.’ माझ्या मित्राने घंटी एकदांच वाजविली. कांही वेळाने दार उघडले गेले आणि एका नोकराने दार उघडले. मी ‘पायपुसण्यावर येथे प्रथम उजवा व नंतर डावा पाय पुसावा’ अशी कुठे पाटी आहे की काय हे पहात पाय पुसले. वास्तविक पाय पुसून जायची मला मुळीच सवय नाही; परंतु मला कुठेही टापटीपीचा वास आला की मी आपला त्या घरांत शिरतांना पायपुसण्याला पाय पुसून टाकतो.


त्या बंगल्यांत शिरतांनाच ह्या बेहद्द व्यवस्थितपणाचा मला चांगला अंदाज आला होता. कारण बागेतल्या प्रत्येक कोपऱ्यांत ‘फुलांना हात लावूं नये’ ही पाटी होती. मालकांच्या नांवाची पितळी पाटी चकचकीत पुसली होती आणि ‘आहेत नाहीत’ पैकी ‘आहेत’ हे ठळक दिसत होते. त्या अक्षरांवरचे ढांपण अर्धवट सरकलेल्या अवस्थेत नव्हते. फाटकापासून बंगल्यांत शिरेपर्यंत तीन ठिकाणी ‘येथे घाण करू नये’च्या पाट्या होत्या. त्यानंतर मी त्या दिवाणखान्यांत शिरतां शिरतां आणखी कांही अंदाज केले. उदाहरणार्थ, दिवाणखान्यातल्या पुस्तकांच्या कपाटावर ‘ही पुस्तके वाचावयास मागू नये’ ही पाटी आहे की नाही हे पाहिले. ती होती. दाराखिडक्यांना डांस शिरूं नयेत म्हणून जाळ्या मारलेल्या होत्या. भिंतीवरच्या फोटोवर ते केव्हां व कुठे काढले गेले ह्यांच्या तारखा होत्या. आणि वर्तमानपत्रावर मालकाचे नांव लिहून ठिकठिकाणी तांबड्या पेन्सिलीने खुणा केल्या होत्या. वास्तविक ह्या गोष्टींचा मला अंदाज असता तर मी त्या दिशेला फिरकलोही नसतो. पण बाहेर मित्र भेटला, त्याला चहा प्यायला चलण्याचा आग्रह केला आणि त्याने जरा ह्या म्हाताऱ्याला एक निरोप सांगून लगेच सटकू असे म्हटले म्हणून त्याच्या बरोबर त्या नीटनेटक्या बंगल्यांत शिरलो – मालक येईपर्यंत त्याच्या चेहऱ्याचा अंदाज करीत बसलो.


बहुधा असली माणसें काटकोळी असतात- गाल खप्पड हे हवेतच. त्याशिवाय स्वभावाच्या खडुसपणाला धार येत नाही. कपाळ हे आठ्यांसाठी घडवलेले इंद्रिय आहे हा तसल्या मंडळींचा ठाम विश्र्वास असतो. हंसणे ही क्रिया ह्या जगांत कां घडावी याची तिथं विवंचना असते. बहुधा जुना शर्ट त्याची कॉलर कापून आणि लांब हाताचे अर्धे हात करून घरांत घालण्यासाठी म्हणून वापरण्याची प्रवृत्ती असते. वयपरत्वे ह्यांत फरक पडतो, परंतु साठीच्या पुढला प्रकार असला आणि विधुरावस्था असली तर पायांत खडावा घालण्याची विशेष प्रवृत्ति असते. मी अशा प्रकारच्या ह्या मनुष्यविशेषाची कुंडली मनाशी मांडीत असतां दारांत काही तरी खुडबुडले आणि एक साठीच्या घरांतले वृद्ध गृहस्थ आंत आले, माझ्या मित्राने तोंडांतून तीनचार शब्द सांडण्याचा एक दुबळा प्रयत्न केला. ‘कुणीही यायला माझी हरकत नाही. पण आधी कळवलेले असावे, मी एकच कप चहा करायला सांगितला आहे-’


‘छे छे... आपण चहाची तकलीफ कशाला घेता? नाही तरी मी चहा घेत नाही’ मी उगीचच प्रकरण सांवरून घेतले.

‘प्रश्र्न तुमच्या चहाचा नाही. ह्याने माझी चार वाजताची अपॉइंटमेण्ट घेतली होती. तसा तो पांच मिनिटे उशीरा आला आणि बरोबर मला न सांगता तुम्हाला घेऊन आला.’


‘आपलं काय बोलणं व्हायचं असेल तर ते होऊं दे. मी बाहेर जातो.’



‘प्रश्र्न तुमच्या बाहेर जाण्याचा नाही आहे.’


प्रश्र्न मी चहा पिण्याचाही नव्हता – बाहेर जाण्याचाही नव्हता – कसलाच नव्हता. प्रश्र्न होता एकच-म्हणजे आपण अत्यन्त हिशेबी आहो-व्यवस्थित आहो, त्या हिशेबीपणापुढे, व्यवस्थितपणापुढे जगांतल्या कुठल्याही गोष्टीची मला पर्वा नाही हे ठसवण्याचा. पुढली पंधरा वीस मिनिटें ही माझ्या आयुष्यांतली एकाद्याचा गळा दाबून तिथल्या तिथे मुडदा पाडून टाकण्याची अनिवार इच्छा दाबून टाकण्याच्या प्रयत्नांची शिकस्त करण्यांत गेली. तो म्हातारा ‘माझं असं आहे’ ‘मी म्हणजे असा’ ‘मीं एकदां असं म्हटलं कीं असं झालंच पाहिजे’ ‘मी-मी-मी-मी’ करीत नुसता छळत होता. ‘मला गैरहिशेबी कारभार अजिबात आवडत नाही.’ ‘तुम्ही मला विचारा कीं एकोणीसशें तेवीस साली मी अकरा वाजतां काय करीत होतो, मी दोन मिनिटाच्या आंत सांगू शकतो...’ तिथे ह्या माणसाची पाठ मला कशी सडकवता येईल याचा विचार होता माझ्या मनांत. मी तो एका केविलवाण्या स्मिताखाली दडपून गप्प बसलो.

‘गप्प बसूं नका... विचारा...’ तो कडाडला. ‘हो हो,’ मी आपलं काही तरी बोलायचं म्हणून बोललो.

‘हो हो नकोय मला. मला प्रश्र्न हवाय.’


मी नाइलाजाने त्याला प्रश्र्न विचारला. म्हातारा एकदम एका कपाटापाशी गेला. त्यांतून त्याने एक डायरी काढली. टेबलावर ओला स्पंज होता. त्याने डायरीची पानें उलटली आणि वाचून दाखवले- ‘हं... अकरा जून एकोणीसशे तेवीस. आदल्या दिवशी म्हणजे दहा तारखेला विट्याहून अष्ट्याला बदली झाल्याचा हुकूम आला होता. सबरजिस्ट्रार होतो आम्ही तेव्हां... अकरा वाजतां बैलगाडीवाल्यापाशी विट्याहून अष्ट्याला सामान नेण्याचे दर ठरवीत होतो. काय?’


मी मनांत म्हणत होतो त्या बैलगाडीला ह्यालाच जोडण्याची परमेश्र्वराने योजना केली असती तर काय बिघडले असतें!


बऱ्याच लोकांची हिशेबीपणाची, म्हणजे पैशाचा हिशेबीपणा, अशी कल्पना असते. पैशाचा हिशेबीपणा हा हिशेबी स्वभावांतला एक अत्यंत गौण तपशील आहे. चिक्कू स्वभावाच्या माणसाची चेष्टा तरी करता येते. ही माणसे आपला हिशेबीपणा लपवण्याची पराकाष्ठा करतात. आमचा एक रुपये-आणे-पै न्याहाळीत बसणारा मित्र आम्हांला आज कित्येक वर्षे हॉटेलांत नेऊन मनसोक्त खायला घालणार आहे. आम्ही जवळ जवळ रोज त्याची ह्या विषयावरून चेष्टा करतो. पण तो ज्या दिवशी आम्हांला ही पार्टी देईल त्याच दिवशी आमचा आनंद नष्ट होणार आहे. आम्हांला त्याचा चिक्कूपणा उघड करण्यांत जो आनंद आहे तो त्याला पैसे खर्च करायला लावण्यांत नाही. आमचा चिक्कू मित्र पैशांत हिशेबी पण गाण्याच्या बैठकीला गेला तर पहाटे सहापर्यंत हलणार नाही. रात्री अपरात्री भटकायला हजर. त्याच्या बंगल्यांत फाटकच नाही.


हिशेबी म्हणून ज्याला मी म्हणतो तो हा नमुना नव्हे. या हिशेबी लोकांचा खाक्याच निराळा. पुस्तक विकत घेतल्यावर त्याला कव्हर घालून, विकत घेतल्याची तारीख लिहून ‘पुस्तके मागूं नयेत’च्या कपाटांत ठेवणारी ही माणसं. आपल्या वाण्याची, दूधवाल्याची, घरवाल्याची बिलं बरोबर एक तारखेला पोहोचतात या अहंकारात असणारी ही माणसं. सकाळी पांच वाजतां उठून रात्री नवाच्या ठोक्याला झोपणारी ही माणसं आणि ज्यांच्या बोलण्यांत सदैव पोवाडेवाल्यांच्या ‘जी जी र जी जी’ सारखी ‘मी मी रे मी मी’ ची झील धरलेली असते. असली ही हिशेबी माणसं- जे घड्याळाचे गुलाम आहे – ज्यांच्या जेवणाशी भुकेचा संबंध नसतो आणि पिण्याशी तहानेचा संबंध नसतो- जे सकाळी दहा ही जेवणाची वेळ समजतात आणि कुठल्याशा आहारशास्त्राच्या चोपड्यांच्या आधाराने जे नाकांतून पाणी पितात – ज्यांच्या बगीच्यातल्या फुलांनी कुटुंबांतल्या लेकीसुनांच्या वेण्या सजत नाहीत – जे गुलाबाचा गुलकंद करतात, दारींचा मोगरा माळ्याला विकतात, ते हे महाभाग. नियमितपणा म्हणजे सर्व काही असे समजतात आणि प्रत्येक गोष्टीची आपल्या डायरीत नोंद करतात. त्यांनी लाथेने बिछाना उलगडून त्याच्यावर अंग टाकण्याची मजा अनुभवली नाही. पहांटे फिरायला जाऊन उषेची स्वप्नं न्याहाळली नाहीत – जे नदीच्या घाटावर पोहायला गेले परंतु पाण्यात घागर बुडवून कसल्यातरी गोड विचारांत भरल्या घागरीचा भार विसरलेल्या जलवाहिनीच्या दर्शनाने क्षणभर घाटावर रेंगाळले नाहीत ते हे लोक. कारण त्यांनी ‘आठ ते आठ पंधरा – नदीवर स्नान’ हा फक्त हिशेब मांडलेला आहे. ही माणसं नियमितपणाने सर्व काही करतात. गाण्याला जातात. बहुधा संध्याकाळी गाणं असलं तर – आणि घरी आल्यावर वहीत मांडून ठेवतात - आज भीमपलास, पूरिया आणि यमन ऐकला. गवयाचे नांव अमुक अमुक. गायनाचे स्थळ अमुक अमुक. झोपण्यापूर्वी तीस मिनिटे वाचनही करतात. आणि साहित्याच्या आनंदात डुंबण्याऐवजी वहीत लिहितात, ‘आजचे वाचन पाने पन्नास’.


असली माणसें आपल्या पत्नीशी प्रेमालाप कसा करीत असतील हे जाणून घेण्याची मला उगीचच उत्कंठा आहे. बहुधा ते बायकोला सांगत असतील, ‘आजची वांग्याची भाजी तूं सहा जूनला केलेल्या भाजीहून अर्धा चमचा मिठानें आळणी झाली होती. कोशिंबीर चांगली होती; त्यांत दह्याचे प्रमाण उत्तम होते. आज संध्याकाळी तुम्ही नेसलं होतं ते नऊ एप्रिलला घेतलेलं पातळ तुम्हांला आतां नेसला आहात त्या पातळाहून अधिक बरं दिसतं’ जाऊ दे. हा संवाद लांबवण्यांत अर्थ नाही. कारण रसिकतेची कमाल मर्यादा गांठणें एकवेळ शक्य आहे परंतु हिशेबीपणाचा ताळा लावणे अत्यंत अवघड!


असल्या माणसांना मी भयंकर भितो. माझी सगळी शक्ती इथं जणूं काय नष्ट होते – कधी वाटतं ह्या माणसांचा सणसणीत अपमान करावा पण जमत नाही. कदाचित् परमेश्वराने हा नमुना करतांना काय हिशेब करून ही मनुष्यरूपधारी यंत्रे घडवली ह्याच्या विचारानेच मी हतबुद्ध होत असेन. असल्या लोकांच्यावर कसला तरी सूड काढायचा विचार येतो.


त्या मित्राबरोबर ज्याच्याकडे गेलो होतो त्या म्हाताऱ्याला मी तसा सोडला नाही. त्याने तर माझा फारच अपमान केला होता. माझे नांव विचारण्यापूर्वी मी किती वाजतां उठतो? हा अत्यंत खाजगी प्रश्र्न विचारला होता. माझ्या बुशकोटांतून डोकावलेली सिगारेटची डबी पाहून ‘धूम्रपान आणि कॅन्सर’ ह्या विषयावर कुठल्या तरी मासिकांत आलेली दोन पानं माझ्याकडून वाचून घेतली होती. आणि दाढी करण्याचे एक पाते मला किती दाढ्यांपर्यंत टिकते हा प्रश्र्न करून त्याचं उत्तर न देता आल्याबद्दल माझीच खरडपट्टी काढली होती. त्याच्यावर सूड़ म्हणून मी जातांना त्याच्या बागेतला नळ सोडला. त्याची ‘आहेत’ ची पाटी ‘नाहीत’ केली आणि बाहेरचे फाटक उघडे टाकून रस्त्यावरची दोन बेवारशी गुरे ‘हैक हैक’ करून त्याच्या बागेत सोडली. ह्यापेक्षा मी त्याच्यावर अधिक सूड काय घेऊ शकणार होतो? तेवढ्यावरच मी खूष होतो. परंतु दोन दिवसाच्या आंतच माझ्या नांवावर एक पत्र आले. त्यांत माझ्या निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसानीबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त करून आपल्या फाटकाचा दरवाजा मला कायमचा बंद असल्याचे कळवले होते. मात्र त्या खाजगी पत्राच्या वरच्या कोपऱ्यांत ‘जावक क्रमांक दोनशे बत्तीस’ हे लिहायला तो हिशेबी थेरडा विसरला नव्हता.


लेखक – श्री. पु. ल. देशपांडे

(आकाशवाणी, पुणे केंद्राच्या सहकार्याने)

(अंक – वसंत - १९६०)

बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर

 ▪️बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर                      महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आणि समाजसुधारणेच्या प्रदीर्घ इतिहासात कर्मवीर ...