परिवर्तनाचा ध्यास घेतलेला कवी-संजय मराठे.
प्रस्तावना
"साहित्यकृती ही समाजजीवनाचा आरसा असतो."गद्य,पद्य, चित्रपट,नाटक किंवा कोणतेही साहित्य असो; त्यामध्ये मानवी जीवनातील सुक्ष्म भावनांचे प्रकटीकरण असते.त्या भावनांची नाळ समाजाशी जेवढी जोडली असेल तेवढे ते साहित्य अधिक प्रासादिक,प्रसन्न,जीवंत व प्रत्ययकारी वाटते व आनंद देत असते.
मंम्मट नावाच्या संस्कृत कवीने साहित्याचे प्रयोजन सांगताना त्यात सहा प्रयोजन सांगितले आहेत. यश,अर्थलाभ,व्यवहारवाद,आनंद,पत्नींच्या प्रेमळ बोलाप्रमाणे मिळणारा उपदेश, सद्यस्थितीचे वर्णन .अशी साहित्यनिर्मिती त्रिकालाबाधीत असते ; व तेच साहित्य अक्षर साहित्य ठरते.
साहित्य परंपरा
ज्या थोर साहित्यिकांनी मानवी जीवन हाच साहित्याचा विषय केला त्या थोर व्यक्तींच्या साहित्याचे वाचन ,गायन,नाट्यविष्कार पाहत आपली पिढी वाढली आणि घडली.मराठी सारस्वतात वि. स. खांडेकर,प्र. के.अत्रे,पु. ल.देशपांडे, राम गणेश गडकरी,कुसुमाग्रज,केशवसुत,बहिणाबाई,बालकवी,ना.धो.महानोर यांच्यासारखी खुप खुप नावांची भर यामध्ये टाकता येईल.
महाराष्ट्रामध्ये संत-पंत-तंत काव्यापासून कालपर्यंत निर्माण झालेल्या साहित्यामध्ये अत्यंत सुंदर,अभिरुची संपन्न व मानवी भाव -भावनांचा अविष्कार करणारे साहित्य येऊन गेले.अगदी कवि कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे झाल्यास -
'प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहचलेलं'
खान्देश साहित्य
खान्देशातील साहित्य परंपराही खूप सुंदर आहे.कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ,रानकवी ना.धो.महानोर,बहिणाबाई चौधरी,कवितारतीचे पुरुषोत्तम पाटील,कोसलाकार भालचंद्र नेमाडे,नाटककार प्रा. अनिल सोनारांपासून ही साहित्याची सेवा सुरू झाली.आणि खान्देशाच्या ह्या समृद्ध प्रदेशामध्ये अनेक प्रतिभावान नवलेखक निर्माण झालेत.आपल्या नवोन्मेषशालिनी प्रज्ञेच्या जोरावर विविध ठिकाणी आपल्या साहित्याला वाट करून देताना दिसतात.
मराठी काव्याला पहाटे पडलेलं गोड व मधुर स्वप्न म्हणजे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे होय.वयाच्या 12 व्या वर्षी अमळनेरच्या बालकवींच्या कविता ना. वा. टिळकांनी ऐकल्या व त्यांना बालकवी पदवी दिली.
*'श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे*
*'क्षणात येती शर शर शिरवे क्षणात फिरुणी ऊन पडे'*
या ओळी ऐकुन श्रावण अधिक सुंदर वाटायला लागतो, किंवा बहिणाबाई चौधरीच्या जीवनगाण्यांना कसे बरे विसरता येईल !
*'अरे संसार संसार जसा तवा चुलीवर*
*'आधी हाताले चटके मग मिळते भाकर'*
जीवनाशी थेट निगडित व्यवहारवाद बहिणाबाई आपल्याला सांगतात.
महाराष्ट्रातील थोर कवी दि.पु.चित्रे 'देवा ह्याही देशात पाऊस पाड' ही कविता किंवा केशवसुतांची नवा शिपाई,मूर्तीभंजन या कविता आणि यशवंत मनोहरांची 'कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही' ही कविता.
अशा अनेक सामाजिक कविता कायमच्या मनात घर करून गेल्या.खान्देशात अनेक ठिकाणी नवकवी यामुळे घडले.
कवीची पार्श्वभूमी
धुळ्याला श्री.शिवाजी विध्याप्रसारक महाविध्यालयात(SSVPS) शिकत असतांना वाङमय मंडळाच्या शोकेसमध्ये अनेक नवकवी आपल्या कविता चिकटवत असत.त्यामध्ये एके दिवशी कवी संजय मराठे यांच्या कविता वाचायला मिळाल्या.
आणि चटकन जाणवले की , या कविता समाजाशी नातं सांगणाऱ्या कविता आहेत.त्यानंतर मग अनेक वेळा त्यांच्या कविता शोकेसमधून, मासिकांमधुन,नियतकालिकांमधून वाचायला मिळाल्या.त्यामध्ये प्रस्थापित भ्रष्टाचारी व्यवस्थेविषयी असलेली चीड पुन्हा -पुन्हा निदर्शनास आली.
कवी संजय मराठे हे धुळे जिल्ह्यातील वेल्हाणे(देवाचे) या गावाचे असून त्याचे एम.ए. पर्यंतचे शिक्षण धुळ्याला झाले.भंडारा या ठिकाणी त्यांनी डी. एड. केले व 25 वर्षांपासून शिक्षक म्हणून ठाणे जिल्हा परिषद मध्ये ते अध्यापनाचे काम करीत आहेत.
शेतकरी कुटुंबात जन्म झालेला असल्याने; ग्रामीण भाग जवळून पाहता आला.नोकरी निमित्ताने व शिक्षण करतेवेळी घरापासून लांब रहावे लागले.या कालावधीत आदिवासी भागात तलासरी सारख्या दुर्गम भागात काम करताना विविध स्तरावरचे अनुभव आले.समाजातील सर्व प्रकारचे सामाजिक स्तर बघता व अभ्यासता आले.त्यातून त्यांची कविता प्रवास करत तावून सुलाखून बाहेर आली.
कवितांचे रसग्रहण
बारा गावचे पाणी पिऊन तयार झालेला व सामाजिक भान असलेल्या या कवींच्या काही कवितांचे रसग्रहण आपणापुढे ठेवणार आहे.ढीगभर गरिबांचे मूठभर श्रीमंत शोषण करतात .भ्रष्टाचाराच्या मार्गाने पांढरे चोर समाजाला ठकवत आहेत. पिढ्यानपिढ्या हा पिचलेला ,गंजलेला समाज खाच खळग्याच्या वाटेने खडतर जीवन जगतो आहे .पुढाऱ्यानी लोकशाहीला घरची बटीक बनवली आहे; व आम्हीच कसे जनतेचे कैवारी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत.याबद्दलची प्रचंड चीड संजय मराठेंच्या कविता मधून दिसते.कवी त्यांच्या *'समाज'* या कवितेत म्हणतात-
"जीवन उध्वस्त करणारं
व्याकुळ समाज गोत्र
स्वतःच उत्तरकार्य करतांना दिसतंय
जीवन 'कोलीत' म्हणून घेणारा माणूस
आज केवळ 'सरपण' म्हणून जळत आहे.
आम्ही समाजवादी आज अंगावर
'छाटी' घालून मदमस्त हिंडतो आहे छेलेबाजपणे..."
त्यांच्या कविता आधुनिक नवकाव्यात मोडणाऱ्या आहेत.म्हणून त्या मुक्त छंदात लिहलेल्या आढळतात.त्यांना वृत्त,छंदाचे बंधने नाहीत काव्याला सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी कवी सुंदर प्रतिमा वापरतात.वरील कवितेत कोलीत,सरपण,छाटी या प्रतिमामधून कवितेत अलंकारीकता निर्माण होतांना दिसते.
ज्या ज्या समाज पुरुषांनी आपण देशाचं काहीतरी देणं लागतो असा विचार करून समाजऋण फेडण्याचा प्रयत्न केला त्यांना समाजाने काय दिले ? याबद्दल कवी आपल्या *"तेजवा"* या कवितेत लिहितात -
"महामानवा -
इथं सर्वत्र अंधार आहे.
कुठं निघालास -हया निष्प्रभांच्या दुनियेत ?
हया अंधारमय जगात -
निरंजन लावण्यासाठी ?
खुश्शाल लावं.
पण, एक सांगतो...
... ज्योत लावतांना सांभाळ.
श्रेष्ठ पुरुषा - हा हृदयतेजवा ह्या अंधाना-
नाही रे सहन होणार !"
जगातुन सत्याचा प्रकाश पसरवणाऱ्या येशूला वधस्तंभावर लटकवण्यात आले.सॊक्रेटिसला विषाचा प्याला देण्यात आला.अब्राहम लिंकनला गुलामगिरी नष्ट करण्याबद्दल गोळ्या खाव्या लागल्या तर अहिंसेचा संदेश देऊन मायभूमीला स्वातंत्र मिळवून देण्याबद्दल गांधीजींना गोळ्या झेलाव्या लागल्या. येथपासून तर दाभोळकर ,पानसरे पर्यंत..लक्ष द्यायला राजनेत्याना वेळ नाही .म्हणून कवी या कवितेच्या उत्तरार्धात हे सांगायला विसरत नाही-
" तू 'भावूक' तुझी आकांक्षा पूर्ण करू पहातोय.
पहा ! - लाव दिवा ...
उजळू दे यांचं आयुष्य .
मात्र तू तेव्हा दूर हो .
कारण यांचं जीवनसूत्र विक्षिप्त आहे.
प्रकाश देशील तू...
आणि हे...
तुझाच उच्छेद करून प्रकाशमय होतील...
हे विसरू नकोस".
हजारो देशवासीयांच्या मनात असलेला क्रोध कवींच्या लेखणीतून प्रकट झालेला दिसतो.समाज मनाचा नेमका ठाव घेतलेला या कवितेत दिसतो.
अशा या सद्यस्थितीतील अंधारमय वातावरणातही हिम्मत सोडून चालणार नाही.आपले आदर्श स्थान आपण स्वता निवडून नवनिर्माणाचा प्रयत्न केलाच पाहिजे .असे कवी आपल्या *"नवयुग"* कवितेत सांगतात -
"आयुष्य प्रवाहाच्या 'घळा' वर
आता घाला घातला पाहिजे..."
"लोकोपवादी लक्तरे झिडकारून
लौकिकाचारी परिमळाचा
निदिध्यास घेतला पाहिजे.
दिगंतरी वाजवून नौबत -
नि:स्पृह मनाचं -
आज 'नवयुग' स्थापन केलं पाहिजे.
'जेथे न पोहचे रवी तेथे पोहचे कवी'अशी एक म्हण आपल्याकडे आहे.म्हणून कवी आशावादी आहे.समाजात ज्या वेळी सर्वत्र अंधकार पसरतो. तेव्हा आपणच आपले मार्गदर्शक व्हावे.कारण तुकाराम महाराजांचे संतवचन आहे-
"तुझं आहे तुजपाशी |
परी तू जागा चुकलासी |"
म्हणून कवी *"आपले आपणच !"* या कवितेत सांगतात-
"आपले आपणच ऋणमुक्त ऋतुऋतुतून.
कुटील कुचाळकीची
गुंढाळलेली लक्तरे झिडकारून
क्षितिज एक शोधावं
आपलं आपणच प्रेरक मानवतेच !"
अशा कवितांमधून कवीची सर्जनशील विचारशक्ती दिसून येते.माणूस वैश्विक पातळीवर विश्वात्मक विचार करतो.देश पातळीवर नागरीक म्हणून विचार करतो पण माणुसकीच्या पातळीवर एक चांगला माणूस म्हणून विचार करतो.
प्रतिभेचे देणं जन्मजात असावं लागतं, म्हणून बहिणाबाई चौधरी म्हणतात-
" माझी माय सरस्वती, मले शिकविते बोली
लेक बहिणाच्या मनी ,कसं गुपीत पेरती"
ही नवोन्मेषशालीनी प्रज्ञा हजारातून एखाद्यालाच लाभते व तोच व्यापक विचारातून लेखन करू शकतो.
एक "माणूस" म्हणून जगता-जगता कवी एक उत्तम शिक्षकही आहे.पिढी घडवण्याचे-ज्ञानदानाचे पवित्र कार्य आहोदिन त्याच्या हातुन घडते.समाजाचे उत्तरदायित्व त्यांच्यावर आहे.म्हणून सभोवताली कितीही गडद अंधारमय वातावरण असले तरी त्याला बदल -परिवर्तन घडवायचे आहे .त्यासाठी ते रणशिंग फुंकून क्राती करू या व बदल घडवूया असे आपल्या *"रणशिंग"* कवितेत सांगतात.
"आता मात्र उठायचं आहे,
पुनर्जन्म घ्यावयाचा आहे,
अंगावर घेतलेले प्रहार आता
पारखून परतून लावायचे आहे.
इथला अंधार खिन्न गडद आहे,
आता हा पराभव असाह्य आहे,
दुर्दैवाच्या जखमा पुसून
एकदा रणशिंग फुंकायचे आहे.
या कवितेमध्ये एक प्रकारची बंडखोर वृत्ती ,विद्रोही आवाज दिसून येतो .ही कविता केशवसुतांपासून तर नारायण सुर्वे पर्यंतच्या महान कवींच्या कवितेशी नातं सांगणारी कविता आहे.
साहित्य लिहिणारा माणूस हा वैश्विक विचार करणारा असावा त्याच्यात जात ,धर्म,पंथ,भाषा,देश यांच्याही पलीकडे जाऊन तो विचार करतो.म्हणून गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी "वसुदेव कुटुंबकम" चा विचार मांडला.ज्ञानेश्वरांनी पसायदानात विश्वाच्या कल्याणासाठी "पसायदान" मागितले.तर कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्य देवतेची विनंती ,प्रेम कुणावर करावं ?,समिधा,कांतीचा जयजयकार,कोलंबसाचे गर्वगीत या कवितेत विश्वाचा ,देशाच्या कल्याणाचा विचार मांडला.कवीही आपल्या *"ध्येयवेडे"* या कवितेत म्हणतात-
" पंख फुटलेल्या पाखरांनो
उठा !
आपल्या अस्तित्वाचा शोध घ्या.
जीवन तेजोमय आहे-
सर्वत्र ते उजळू दया.
आपण ध्येयशील आहोत,
हे विसरता कामा नये...
...एकीची हाक द्या सर्वत्र बांधवांना-
काळरात्री पेटवून मशाली
उजळू देशप्रेमाची भावना.
माझ्या ध्येयवेड्यांनो झटा-
झटा ह्या देशाच्या महानतेसाठी
आपण ध्येयवेडे शूरवीर आहात.
असा हा परिवर्तनाचा ध्यास घेतलेला कवी आहे.शेवटी आपल्या संविधानाची जी उद्दिष्टे आहेत स्वातंत्र्य, समता,बंधुता,लोकशाही,धर्मनिरपेक्षता,समाजवाद,राष्टीय एकात्मता ह्या सर्व गोष्टी नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य लोकांना मिळावीत संविधानाचा बेगडी अर्थ न निघता खरा-खरा अर्थ निघावा.राष्ट्रपुरुषांना अपेक्षित समाजवाद लागू व्हावा हे कवीचे स्वप्न आहे.म्हणून हा परिवर्तनाचा ध्यास घेतलेला कवी आहे.असंच मी म्हणेन.त्यांच्या हातून वाड:मयाची चांगली सेवा घडावी अशा शुभेच्छा या निमित्ताने देतो व लेखाला पूर्णविराम देतो.
⚫श्री.महेंद्र प्रताप सनेर⚫
ताजपुरी,शिरपूर.
(माध्यमिक शिक्षक -खाजोळे)
छान सर अशाच नवीन कविता तयार करत रहा
ReplyDeleteसर, आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. पुढेही असेच लिहित रहा आणि झोपी गेलेल्यांना जागी करा, हीच प्रार्थना.....खूपच सुंदर वर्णन केले आहे आमच्या संजय मराठे सरांचे, खूप आभार.
ReplyDeleteखुप छान विचार मांडले
ReplyDelete