शाळा

Monday, 17 January 2022

नवी दृष्टी.....

 नवी दृष्टी.....


       आपण दुःखी का होतो? याची प्रत्येकाची अनेक कारणे असू शकतात.मुळात दुःखाचं कारण हा मनावरील ताण आहे.मन तुमचं आनंदी असेल तर तुमच्या समोर  कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही आनंदाने सामोरे जाल; पण मन जर आनंदी नसेल तर तुम्हाला दुसऱ्याचा साधा आवाजही सहन होणार नाही.ही मानवी मनाची गत आहे.त्यासाठी आपण आपल्या मनावरील ताण कमी केला पाहिजे.जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर अंतर्मनातील ताण आधी कमी केला पाहिजे.आपल्याला कोणत्या गोष्टींचा ताण येतो त्या गोष्टी सवयीने बदलून टाकायला हव्यात.लोकांमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर ते आपल्या हातात नाही.लोकांचं वागणं आपण बदलू शकत नाही.त्यामुळे आपल्या हातात काय आहे त्या गोष्टीचा उपयोग करून आपण आपलं स्वास्थ्य टिकवू शकतो त्यासाठी काहीतरी उपाय करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे.जगामध्ये असे किती लोक आहेत की जे आपल्यापेक्षा सर्वच बाबतीत कमी आहेत तरी ते आनंदी आहेत.आपण नेहमी आपल्या पेक्षा अधिक असलेल्या लोकांचे विचार करून तुलना करतो आणि दुःखी होतो.मुळात तुलना हेच दुःखाचं कारण आहे.जे आहे त्याचा आनंद न घेता जे नाही त्याचा विचार करण्यात आपण सारं आयुष्य घालवतो.



                खरं तर संकटे, अडचणी, नैराश्य, दु:ख, सुख..आनंद, या गोष्टींमुळेच जगणं समृद्ध होत असतं. जगण्याला चव या गोष्टींमुळेच येते. कधी कधी दु:खाची मालिका जरा जास्त काळ स्थिरावते,  पण तेही कधी तरी संपतेच. सुख जसे कायमस्वरूपी नसते तसेच दु:खही कायम राहत नाही. उलट सुखापेक्षा दुःखात जीवन अधिक डोळस आणि परिपक्व बनते.अशा वेळी दुःखाला आपण आपला गुरु किंवा मार्गदर्शक मानलं पाहिजे.मग पहा पुढचं आयुष्य किती सहजपणे आणि समृद्ध जगता येतं...

          मित्रांनो आपण कधी आपल्या अंतर्मनाची साद ऐकतो का?कितीदा आपलं मन आपल्याला सांगतं, पण आपण आपल्या व्यापामुळे किंवा जगण्यासाठी आवश्यक जुळवाजुळव करण्याच्या व्यापामुळे अवती भवतीचं वास्तव आपल्याला पहाता येत नाही.कित्येक वेळा रस्त्यावर चालतांना आपल्याकडे आशाळभूत नजरेने पहात असलेले चेहरे,रेल्वे स्टेशनवरील चिमुकले चेहरे आणि त्यांचे याचनेसाठी पसरलेले हात,सिग्नलवरील टाळी,करपलेला आणि वेळेआधी वार्धक्य आलेला चेहरा,वाडीवस्तीत अर्धमेलं जीवन जगणारी माणसं ....या माणसांची अगतिकता लक्षात येऊनही आपण मात्र आपल्या ऐच्छिक ठिकाणी पोहचण्यासाठी असलेल्या धावपळीमुळे या सर्वांकडे आपण दुर्लक्ष करतो... आणि अंतर्मनाची साद ऐकायचं आपण विसरून जातो.खरंच ही धावपळ एवढी महत्वाची आहे का?  ... आपण आपलं जगणं सुकर होण्याच्या नादात आणि भौतिक सुखापायी आपल्या आवडी निवडी,आपले सगे सोयरे,जिवाभावाचे मित्र,आपल्यातील सुप्त कला,निसर्गाच्या अलौकिक घडामोडी,एवढंच काय तर जगण्याचे चैतन्य यालाही तिलांजली देत असतो.

           कधीतरी या धावपळीच्या बाहेर डोकावता आलं पाहिजे.सकाळची उन्हं अंगावर  घेता आली पाहिजे,झाडाखाली उभं राहून अंगावर ऊन सावलीचा खेळ खेळता आला पाहिजे.रानगवताच्या गालिच्यावर अनवाणी चालता आलं पाहिजे,वाऱ्याची शीळ ऐकत मनसोक्त हुंदडता आलं पाहिजे ,माळरानावर पक्षांचा किलबिलाट आणि त्याची कलाकुसर ही उघड्या डोळ्यांनी पाहता आली पाहिजे.जीवन समृद्ध करणारं जे जे काही या चराचरात आहे ते अंगिकारले पाहिजे.

आयुष्य जगायला शिकलं पाहिजे.आलेला दिवस ढकलल्याने जीवन पुढे जाईल पण जीवन जगण्याचा खरा आनंद मात्र मिळणार नाही.जीवनातला आनंद मिळवण्यासाठी आपल्याला  मनाच्या हाकेकडे लक्ष द्यावं लागेल.केवळ भौतिक सुविधा आणि साधनांसाठी धडपड न करता स्वतःच्या आवडी निवडीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.चला तर मग जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहू या आणि नवीन उभारी घेऊ या.......


                        संजय गरबड मराठे

                         उल्हासनगर ,ठाणे

                          9421973888

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...