बदली

Thursday, 25 February 2021

जीवन का मतलब तो..

 जीवन का मतलब तो..

लेखक : प्रा.सत्यजीत जाधव

अप्रतिम लेख... वाचायला तर हवाच !

________________

" हजार दुःखे मनास माझ्या..

        हजार जखमा उरात माझ्या.. 

        वसंत असता सभोवताली..

        ऋतू निराळाच आत माझ्या.."


दोन दिवसापूर्वी मिडीया (You tube) वर वारंवार बघण्यात आलेला सुप्रसिद्ध गीतकार संतोषजी आनंद आणि आवडती गायिका नेहा कक्कर यांचा भावनांनी ओतप्रोत असलेला व्हिडीओ  बघण्यात आला.. संवेदनशीलतेच तिक्ष्ण नाक असणाऱ्या तुमच्या माझ्या सारख्या लोकांना हा सदर क्षण बरच काही सांगून गेला .... 

' मनासारखे सारे काही जीवनात या घडते का ....? ' 

अशी काहीशी अगतिक सगळ्यांची अवस्था तो व्हिडीओ पाहून झाली.... असंख्य लोककलाकारांचे अगदी पोटापाण्याचेसुद्धा प्रश्न डोळ्यासमोर फेर धरुन नाचायला लागले ..

मनानं समजूतदार असणारी ही संतोषजी आनंद यांच्यासारखी माणसं , त्यांची अगतिकता व्यक्त करत नाहीत , फक्त आणि फक्त सोसत राहतात ...आयुष्यभर किती सोसलं या माणसानं ..स्तब्ध झालो .

हिंदी चित्रपट सृष्टीच्या मायाजाळात घरातून बाहेर दिसणारी हि दिग्गज माणसं वेगळी ...आणि घरातलं चार भिंतीमधलं त्यांचं एकाकीपण वेगळं ... हे प्रकर्षानं जाणवलं ....


      " इक प्यार का नगमा हैं ..

        मौजों कि रवानी हैं.. 

        जिंदगी और कुछ भी नहीं...

        तेरी मेरी कहाँनी हैं ...!!


अशा शब्दांनी भरगच्च भरलेल्या या गाण्यात जेव्हा ध्रुवपदानंतर ...

ला.. ला..  ला... ला... ला... ला....  हे जेव्हा गाणं माहित असणारा माणूस गुणगुणतो , तेव्हा त्याच्या मनाचा गाभारा हा त्याच्या जुन्या आठवणींच्या प्रतिध्वनींनी बहरल्याशिवाय अन् भरल्याशिवाय राहत नाही .

एकटेपणात प्रत्येक जण भूतकाळात डोकावून आल्याशिवाय राहत नसतो, त्याला कोणीच अपवाद असू शकत नाही .. ' कधी थांबते ना कोठे त्याला म्हणावं जीवन....'  या जीवनाच्या प्रवासात काही गोष्टी मिळवलेल्या हरवायच्या आहेत तर काही अनावधानानं  हरवलेल्या पुन्हा एकदा मिळवायच्या आहेत.

सगळेच दिवस आयुष्यात एकसारखे नसतात ... संतोषजींची पत्नी ,  मुलगा संकल्प,  सून नंदिनी आणि त्यांच्या मुलाबाळांच्या आत्महत्येच्या पश्चात,  संतोषजी अपघातातून वाचलेल्या नातीसाठी का होईना जगले ... पण कुटुंबावर कोसळलेल्या डोंगरावढ्या मोठ्या दुःखानंतरचं त्यांचं जगणं... जगणं म्हणता येईल का..??? असा संमिश्र प्रश्न मनात माझ्या डोकावत राहतो .


       " जगत मी आलो असा की

          मी जसा जगलोच नाही..                

          एकदा तुटलो असा की,

          मग पुन्हा जुळलोच नाही ..                                      

          संपल्यावर खेळ माझा

          आंधळ्या कोशिंबिरीचा..              

          लोक मज दिसले अचानक

          मी कुठे दिसलोच नाही ..!!! "

अशी ही काहीशी भावविवश अवस्था संतोषजी अनुभवतायत, पण या सगळ्यातूनही सावरत  तुम्हारे राँह में.. काँटे हों... गुल हों.. या हों पत्थर...  अपना काम है दामन भर लियाँ जाये ..! असं म्हणत त्यांनी वाटचाल सुरू ठेवलीये .

 

शब्द सिद्ध.. शब्द हस्त.. शब्द प्रभू संतोषजी यांना त्यांच्या उमेदीच्या काळात लिखाणाच्या बळावर सगळं काही मिळालं... हसत्या...खेळत्या.. .माणसांनी भरलेल्या घरातून अचानक सगळी माणसं रेल्वेखाली आत्महत्येनं  मृत्युमुखी पावल्यानं एकटेपणाच दुःख त्यांच्या वाट्याला आलं.. 'भीड़ जमानें में है बढ रहीं.....  पण आतल्या एकटेपणाचं  काय ????

तीन-चार वेळा पायांच ऑपरेशन झालं.. आवाज थरथर कापायला लागला.. हात पाय सुद्धा प्रचंड थरथरायला लागले..  जगण्यासाठी लागणारा पैसा कमी झाला किंबहुना संपला .... पण लिखाणांत प्राण ओतून लिहिण्याचं बळ काही कमी झालं नाही , आणि त्या अनुभवलेल्या आयुष्यातूनच हे असं काहीस सुपिक जन्माला आलं..


       " आँखो में समंदर हैं.. 

         आशाओं का पानी हैं

         जिंदगी और कुछ भी नहीं

         तेरी मेरी कहाँनी हैं ...!! "


 दिल की दुनियाँ बसायेंगे हम ...

 गमकी दुनियाँ का डर छोडकर..

 जीने मरने की किसको पडी...

 प्यार करले घडी़ दो घडी़ ....

हे सुद्धा समजुतदारपणानं आलं,  तुमच्या माझ्यासाठी .


ज्या सरळ मनाच्या प्रेमळ माणसांना भावनेचा पान्हा फुटतो , त्यांच्या अंतरीचा ओलावा सर्वांठायी  झिरपत राहतो ...पाझरत राहतो. सुप्रसिद्ध गायिका ' नेहा कक्कर' ने देऊ केलेले पाच लाख रुपये सुद्धा  या स्वाभिमानी कलाकाराने नाकारले पण नेहाने संवेदनशीलतेनं ,  सामाजिकतेच भान ठेवून त्यांना ते स्वीकारायला भाग पाडले..

 #Indian idol च्या या कार्यक्रम सत्रात  " किसी नें तो याद किया .." असं म्हटल्यावर तर काळीज पिळवटून गेलं ... गहिवरून आलं भडभडून आलं ... भुकेलेलं पोट ,  रिकामा खिसा,  तुटलेल हृदय आपल्याला आयुष्याचे सर्वोत्कृष्ट धडे देतं.. हे सगळं या सच्चा कलाकारानं अनुभवलं..

 

       " तुझेच गाणे अजून असती, 

         थरारणार्‍या स्वरात माझ्या.. 

         हजार जखमा उरात माझ्या..

         हजार जखमा उरात माझ्या...

         हजार जखमा उरात माझ्या .."


शब्दप्रभू सुप्रसिद्ध गीतकार आदरणिय 'संतोषजी आनंद ' यांना सुदृढ आयुष्य लाभो.... उत्तरोत्तर लिखाणासाठी दहा हत्तींच बळ मिळो... त्यांना तुमच्या माझ्यासारख्या असंख्य चाहत्या कडून भरघोस प्रेम मिळो हीच मनःपूर्वक ईच्छा ठेवून ... थांबतो .


तुम्हा सर्वांचा ,

सदैव स्नेहांकीत 


प्रा.सत्यजीत जाधव

8275455815

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...