बदली

Wednesday, 30 September 2020

आदर्श शिक्षक पुरस्कार -मनोगत

 श्री संजय मराठे सरांचे आदर्श शिक्षक पुरस्कार सत्काराला उत्तर देतांना मनोगत...



      सन्माननीय व्यासपीठ,व्यासपीठावरील सर्व मान्यवर,उपस्थित बंधू -भगिनींनो सर्वाना नमस्कार.आणि गुरूंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....!!!


         सर्वप्रथम मला हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन मला सन्मानित केले त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार मानतो.ज्या लोकसमूहात आपण काम करतो,ज्यांना या कामाची ,प्रणालीची पूर्ण माहिती आहे,त्याचे महत्व माहिती आहे त्यांच्याकडून पुरस्कार मिळणं जास्त महत्वाचं आहे.आपल्या  माणसांकडून पुरस्कार मिळणे,पाठीवर कौतुकाची,प्रेमाची,शाबासकीची थाप पडणे खूप आनंदाची असते तो आनंद आपण मला दिलात आपले शतशः आभार !

         सन 1997 साली ठाणे जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातून वसा-ब्राह्मणपाडा या छोट्याशा पाड्यावरून नोकरीची सुरुवात झाली.अतिशय निरागस अशी ती वारली-कातकरी बालके पाहून ताराबाई मोडक आणि अनुताई वाघांची *"कोसबाडची टेकडी*"आठवली.गोदाताई परुळेकरांचे *"जेव्हा माणूस जागा होतो*"हे पुस्तक खूप वर्षांपूर्वी वाचले होते.त्यातील वर्णन व ते वास्तव लक्षात आले. ती शाळा त्या तालुक्यात  त्या वेळी आदर्श शाळा बनवली.

              कुटुंबातून खूप मूल्यवर्धित वातावरण लाभले होते.धुळे जिल्ह्यात वेल्हाणे हे माझे जन्मगाव.घरातील संस्कार अत्युच्य दर्जाचे होते.म्हणून जेथे काम कराल तेथे झोकून द्या. हा मंत्र रक्तात होता.एम ए मराठी पर्यंत शिक्षण झालेले असल्या कारणाने एस एम जोशींचा " *वेडे व्हा* "हा मंत्र मुखोद्गगत होता.दादा धर्माधिकारींचे तारुण्याचे तीन तकार -तपस्विता,तेजस्विता,तत्परता हृदयात भरलेले होते.

           समोर बसलेल्या बालकांना भारताचे आदर्श नागरीक बनविण्याची जबाबदारी असपल्यावर आहे याचे भान होते.त्यातून भिवंडी तालुक्यात अस्नोली येथे बदली झाली .ती ही शाळा आपण कोकण विभागातून गुणवत्ता विकासात प्रथम क्रमांकावर आणली.तिलाही पुरस्कार मिळाला.जागतिक बँकेचं पथक,इंडोनेशिया येथील पथक येऊन शाळेत 36 विध्यार्थ्याचे 146 उपक्रम त्यांनी पाहिले ते ही आपल्याला सन्मानित करून स्मृतिचिन्ह देऊन गेले.

                ज्या महापुरुषांच्या विचारांचे संस्कार आपल्या भारतीयांच्या मनावर होतात ते जीवनात सदैव प्रेरणा निर्माण करतात .संतांचे वाड्:मय जीवनाचे सार आणि तत्वज्ञान सांगते.विचारवंतांचे,तत्ववेत्यांचे, साहित्यिकांचे वाड्:मय जीवन समृद्ध करते आणि आपण कसे जगावे याचे भान येते.कवी दत्ता हलसगीकर म्हणतात-


*आभाळा एवढी ज्यांची उंची*

*त्यांनी थोडेसे खाली यावे.*

*मातीत ज्यांचे जन्म मळले*

*त्यांना उचलून वरती घावे.*


किंवा कविवर्य  विदा करंदीकर म्हणतात-


*देणाऱ्याने देत जावे*

*घेणाऱ्याने घेत जावे*,

*घेता घेता एक दिवस*

*देणाऱ्याचे हात घावे* !


           हा वसा या पेशातही सदैव लक्षात राहिला.आमच्या उत्तर महाराष्ट्रात बालकवी ठोंबरे,बहिणाबाई  चौधरी,ना. धो. महानोर,पुरुषोत्तम पाटील,भालचंद्र नेमाडे,नाटककार प्रा.अनिल सोनार अशा महान साहित्यिकांची परंपरा राहिली म्हणून नोकरी करता करता कविता लिहिण्याचेही वेड मनात निर्माण झाले.आज रोजी माझ्या अनेक कविता लिहून प्रकाशित झाल्या आहेत.आणि पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

              आता अंबरनाथ तालुक्यातील *"शिळ*" ही शाळा मिळाली. हर्बरच्या पंचपदी पासून आजच्या ज्ञानरचनावादी आधुनिक डिजिटल वर्गाच्या शिक्षण प्रणालीपर्यंत झालेले लक्षणीय बदल आत्मसात करत ही नोकरी प्रामाणिकपणे केली.जीवनात आजतागायत अनेक पुरस्कार मिळालेत.मनापासून काम केल्याचे चीज झाल्यासारखे वाटले.आणि आपण दिलेला हा पुरस्कार अजून बळ वाढवून जाईल.म्हणून आपले मनःपूर्वक आभार.....भविष्यात आपल्या हातून होणारे काम ज्ञानदेवांच्या *"पसायदाना*"सारखे किव्हा गुरुदेव टागोरांच्या *"हे विश्वाची माझे घर*"या विरलस वृत्तीने व्हावे हीच परमेश्वराला प्रार्थना.हे ज्ञान निसर्ग रोज  आपल्याला मुक्त हस्ताने देत असतो.कविवर्य ना.धो.महानोर म्हणतात-


*या नभाने या भुईला दान दयावे*

*आणि या मातीतून चैतन्य गावे*

*कोणती पुण्य अशी येती फळाला*

*जोंधळ्याला चांदणे लगडून जावे*


किव्हा कवी लक्ष्मीकांत तांबोळी लिहतात-


*अनंता एवढे द्यावे,फुलांचे रंग ना जावे*

*उडाया पाखरांसाठी,जरा आभाळ ठेवावे*

*घराला उंबरा राहो,पेटती राहू दे चूल*

*कुण्याही माय पदराशी, खेळते राहू दे मुल*


               एवढीच भावना व्यक्त करतो .सज्जनहो हा मिळालेला पुरस्कार माझ्या गेल्यावर्षी या जगाचा निरोप घेऊन आनंताकडे गेलेल्या दिवंगत मातेला व तिच्या स्मृतींना समर्पित करतो कारण-


*आई माझा गुरू आई कल्पतरू*

*सुखाचा सागरू आई माझी*,

*प्रीतीचे माहेर ,शांतीचे आगर*

*मांगल्याचे सार आई माझी*....


हे गुरुजींचे वचन नेहमी स्मरणीय आहेच.

                  पुनःच्छ आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार...


                  शेवटी एकच सांगतो आधुनिक स्पर्धेच्या काळाला सामोरा जाणारा सशक्त ,बुद्धिमान,तेजस्वी असा विध्यार्थी घडवू या.म्हणजे आपल्यालाही काम केल्याचे समाधान मिळते आणि जीवनात काहीही कमी पडत नाही.....


                                 धन्यवाद

                      जय हिंद जय महाराष्ट्र


                              संजय ग मराठे

                              उल्हासनगर -4

                             9421973888

2 comments:

  1. खूपच छान. आणि अभिमानाने सांगावेसे वाटते सर तुम्ही आमचे परम मित्र आहात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. खरोखर सर आपले काम खूपच छान आहे, आम्हाला गर्व आहे आपल्या खानदेशाचा ठसा ठाणे जिल्ह्यात उमटवला

    ReplyDelete

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...