बदली

Tuesday, 29 September 2020

आठवणी - माध्यमिक विद्यालय वेल्हाणे


थोडसं...

आठवणी - माध्यमिक विद्यालय वेल्हाणे


आजची पोष्ट ही नुसती पोष्ट नाही तर ती आहे आमच्या हृदयात त्रिकाल साठवलेली आठवणींची माळ.आमच्या आयुष्यातील एक असं वळण की तेथून मागे पाहिलं तर असंख्य वेल्हाळवाटा... आणि पुढे पाहिलं तर आयुष्यातील मोहक जीवन सौंदर्य.
तेव्हाचं वेल्हाणे आजाच्या एवढं पुढारलेलं आणि एवढं सर्व गोष्टींची परिपूर्ण नव्हतं. मुळात गावात हायस्कुल काढायची तर त्या साठी वर्गांसाठी जागा,शिकवण्यासाठी शिक्षक आणि हा सर्व डोलारा चालवण्यासाठी आर्थिक बाजू ह्या आणि अश्या खूप गोष्टी महत्वाच्या असाव्या लागतात... गावात दरवर्षी हायस्कुल काढायची जोरात चर्चा व्हायची आणि त्याच जोरात ती चर्चा निवळूनही जायायची.
....खूप प्रयत्नाने 8 वीचा वर्ग सुरू करायचे ठरले.मग मराठी शाळेतील 7 वी पास झालेल्या विद्यार्थ्याना आपल्याच गावातील 8 वी च्या वर्गात ऍडमिशन घ्यायचं असं ठरलं.त्या वेळी आपली हायस्कुल ही बोरविहिरची एक तुकडी वर्ग म्हणून मंजुरी मिळाली. शिक्षक वर्ग कोण असावेत शोधाशोध सुरू झाली...आदरणीय श्री.ईश्वर पवार सर,आदरणीय श्री.सुभाष बोरसे सर,आदरणीय श्री.शिवाजी माळी सर यांची तात्पुरती नियुक्ती झाली.
सर्वात मोठा प्रश्न पुढे होता "विद्यार्थी"... आणि मुलं यायला तयार नव्हते...सर्व बाबी नवीन आणि किती दिवस चालेल याची शाश्वती कमी ...मग जे विद्यार्थी बोरविहिर येथे जाऊ लागले त्यांना सांगण्यात आले की आम्ही तुम्हाला इथं ऍडमिशन देणार नाही... आम्ही तुमच्या गावात 8 वी चा वर्ग सुरू केला आहे तेथेच शिका...या मुळे काही विद्यार्थी शिरूड येथे जाऊ लागले...यात माझी ही वेगळी अशी स्थिती नव्हती....पण नाविलाज म्हणून मी 4-5 दिवस आठवी चा विद्यार्थी म्हणून एकटा बसलो, समोर श्री. सुभाष बोरसे ,श्री.ईश्वर पवार,श्री.शिवाजी माळी असायचे शिक्षक म्हणून.सर्व पालक वर्गाला विश्वासात घेऊन वरील आदरणीय व्यक्तींनी थोरामोठयांच्या आशीर्वादाने विद्यार्थी वळवले....आणि आठवीच्या वर्गाचा श्रीगणेशा झाला....
तद्नंतर काही बेंच बोरविहिर येथून मागविण्यात आले...तो पर्यंत आपली भारतीय बैठक होतीच की जी आम्ही मराठी शाळेत सात वर्षे सर्हाईत पणे बसत होतो.....मूळ प्रश्नांची सुरुवात पुढे सुरू झाली....काही महिनेच लोटले गेले तर आर्थिक बाब उभी राहिली...स्टेशनरी ,खडू, शिक्षकांचे मानधन या बाबी पुढे येऊ लागल्या....खूप चर्चेअंती प्रत्येक विद्यार्थ्यानी 20 रु महिना द्यावा असे ठरविण्यात आले...गाडी थोडी रुळावर येत होती... अडचणींवर मात करत दिवस जात होते, अध्यापनाचे शास्त्र वरील मान्यवर प्रत्यक्ष अमलात आणत होते विद्यार्थी ही अध्यापनात रस घेत होते.
....आणि आदरणीय श्री सुभाष बोरसे यांची धुळे जि. प. येथून प्रा शिक्षक या पदासाठी नेमणूक झाली...श्री पवार सर आणि श्री माळी सर यांनी जिवाच्या प्रयत्नाने वर्ष लोटले..आदरणीय श्री शिवाजी माळी सरांना नाशिक येथे शिक्षक म्हणून स्थिर नोकरी मिळाली...मग परत बिनपगारी शिक्षकांची शोधाशोध....(आमच्या वेळी असलेले सर्व आदरणीय शिक्षक छोटे वेल्हाने येथील श्री राजेंद्र पाटील सर,सिम खडकी येथील श्री खैरनार सर,बोरकुंड येथील श्री जगन माळी सर), असे कितीतरी शिक्षक वर्ग काही दिवसासाठी-महीन्यासाठी आले आणि त्यांना हक्काची नोकरी मिळाली तिकडे गेले...
आठविचा वर्ग पास तर झालो आम्ही... पण 9 वि साठी खूप अडचणी... कारण आता 2 वर्ग... शिक्षक जास्त लागणार....म्हणून कधी बोरविहिर येथून आदरणीय श्री.के. पी. बोरसे, श्री. वाय.डी. सर,श्री. सूर्यवंशी सर ,श्री.ए. पी. खैरनार,श्री.डी. पी. खैरनार,श्री.सी.एफ.वाघ आणि इतर शिक्षक वर्ग आठवड्याच्या पाळीपाळीने अध्यापनासाठी येत गेले...
आणि आम्ही 10 वि ला गेलो...वरील सर्व गोष्टी आलटून पालटून चालू होत्याच...आता गावात 3 वर्ग चालू झाले तिसरा वर्ग कुठे बसवावा हा प्रश्न होता...कारण दोन वर्ग धर्मशाळेत बसत होते...मग नवीनच ग्रामपंचायत ऑफिस बांधलेलं होत तिथं एक वर्ग सुरू केला...आमचा मात्र वर्ग बदलला नाही..8 वी,9वी आणि 10वी आम्ही एकाच वर्गात काढली..आदरणीय श्री ईश्वर पवार यांनी मात्र बिगर पगाराची नोकरी धरून ठेवली होती....नुसती धरून नव्हे तर मुलांच्या मनामध्ये देखील ते घट्ट बसले होते... आता इयता 10 वि साठी झटून विध्यार्थी आणि श्री.ईश्वर पवार अभ्यासाला लागले होते...रात्रीचा क्लास सुरू झाला....योग्य मार्गदर्शन वेळ प्रसंगी साम,दाम,दंड देऊन अभ्यास घेतला जाऊ लागला....(नाईट क्लास च्या खूप आठवणी आहेत ते इथं नको)पवार सर रात्री 11: 30 ला बेशरमची काठी(जरीनागीन) घेऊन यायचे ..झोपलेल्या विध्यार्थ्याना प्रसाद मिळायचा..सकाळी परत 4 :30ते 5 वाजता उठवायचे -सर्वांना धावायला घेऊन जायचे -त्या नंतर अभ्यास 6:30 पर्यंत मग घरी असा दिनक्रम ठरलेला....
सर्व विद्यार्थ्यानी खूप कष्ट घेऊन 100% रिझल्ट लागला.त्या वेळी प्रोत्साहन म्हणून प्रथम क्रमांक येणाऱ्या मुलांना बक्षीस मिळत असे.सत्कार होत असे...आणि तो क्षण माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षण होता.... खूप भरून पावलो होतो...आज ही ते हायस्कुलचे दिवस एखादया चित्रपटाप्रमाणे पुढे पुढे सरकतात....
(अनावधानाने एखादे नाव राहील असेल शिक्षकांचा क्रम खाली वर असू शकतो...क्षमस्व)

संजय गरबड मराठे
9421973888

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...