बदली

Sunday, 11 July 2021

इजाजत" ...एक उत्तम कलाकृती

 "इजाजत" ...एक उत्तम कलाकृती


          आज किती दिवसानंतर नव्हे वर्षांनंतर "इजाजत" पाहिला.पहिल्यांदा पाहिला तेव्हा कथेची मांडणी आणि विचार समजण्याचं वयच नव्हतं.दुसऱ्या वेळी नॅशनल टीव्ही वर कॉलेज च्या वेळी पाहिला ."कथे" न मनात गारुड तेव्हाच केलं.मग पुन्हा पुन्हा किती वेळा पाहिला नेमकं आठवत नाही...प्रत्येक वेळी मानवी भाव भावना नव्याने उलगडत गेल्यात.... "इजाजत" एक चित्रपट नसून जीवनातील नात्यांचा सोज्वळ उलगडा करून दाखवणारं अप्रतिम हळवं काव्य आहे.

            चित्रपट पहात असतांना मनात असंख्य वेळा कालवाकालव होते. मानवाचे जीवन असेच असते काहीतरी मिळवलं असं वाटत असतांनाच काहीतरी सुटत जातं... आणि मग काय कमावलं नि काय गमावलं याचं मनात द्वंद्व चालतं. तसा काहीसा प्रत्यय इजाजत देतो.

               नसिरुद्दीन, रेखा,अनुराधा यांचा अभिनय या बाबत किती लिहायचं...त्यांचा अभिनय नसून जिवंत घटना ते जगताहेत आणि आपल्याला ही त्याचा एक भाग करून  घेताहेत असं वाटतं....मनात खोल पर्यंत पोहोचणारी किंवा मनात रुतून बसणारी उत्तुंग अभिनय कौशल्याने सजलेली सोज्वळ पुष्पांची अगदी नाजूक माळ म्हणजे 'इजाजत'... जसजसा चित्रपट पुढे सरकतो तसतसा नात्यांचा नव्याने शोध लागतो. खऱ्या नात्यांचा अर्थ सांगणारी "इजाजत" एक गाथा आहे.

            इजाजत ची कथा सुबोध घोष यांची आणि निर्देशन गुलज़ार यांनी केलं आहे.संगीतकार आहेत आर. डी. बर्मन गीतकार अर्थात गुलजार आणि आवाज आशा भोसलेंचा आहे.एकापेक्षा एक सुरेल गाणी आहेत..आशाजींच्या आवाजातील "मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है .. सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं और मेरे एक खत में लिपटी रात पड़ी है वो रात भुला दो, मेरा वो सामान लौटा दो ...." आणि "कतरा कतरा मिलती हैं ,कतरा कतरा जीने दो, ज़िन्दगी हैं..ज़िन्दगी हैं..बहने दो..बहने दो..प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो रहने दो"

ही गीते तर काळजाला उलथापालथ करणारे...

               कथा सुरू होते एका सुनसान निर्मनुष्य रेल्वेस्थानकाच्या प्रतिक्षागृहात.बाहेर काळाकुट्ट अंधार आणि त्यात रात्रभर कोसळणारा धुवांधार पाऊस.अशात ते दोघे एकत्र आले...बाहेर निसर्गाचा प्रकोपकारी अवतार आणि प्रतिक्षालयात त्यांचा भावभावनांचा कल्लोळ... ते दोघे काही दिवस एकत्र घालवुन नंतर नियतीच्या हातातील बाहुले होऊन जगाच्या गोल गोल वर्तुळातून फिरून जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हाची ती अवस्था... दोघांच्याही मनात अनेक भावना दाटून आल्यात मागच्या जखमा ताज्या झाल्यात आणि काही जुन्या खपल्याही निघाल्यात ती नेमकी भावना  जिवंत केली आहे.

             रात्रभर कोसळणारा पाऊस...त्याही पावसात बाहेर जाऊन जेवण आणणारा तो...सवयीप्रमाणे कपडे,रुमाल आहे तसेच फेकण्याची सवय..चहा आणि त्यातील बदल सिगारेट पेटवताना माचीस विसरणे...प्रेम...अधिकार आणि आस्था ...तो बोलत असतांना नकळत चष्मा वर करण्याच्या बहाण्याने त्याला न्याहाळणे...यांचं मिश्रण अप्रतिम...

              चित्रपटातील घटनेचा उलगडा फ्लॅशबॅक पद्धतीने उत्तम उलगडला आहे...तिला जाणून घ्यायचं आहे की ती घरात नसतांना नेमकं "त्या" रात्री काय काय घडलंय... आपल्याशी प्रतारणा का केली? सत्य जाणून घ्यायचं आहे....  त्यालाही सत्य सांगायचं आहे.परंतु तिचंही मन जपायचं आहे... त्याच्या जीवनातील एक एक घटना तिला सांगतो ती त्याचं ते दुःख ऐकून आतून कोलमडून पडतेय...



             बघता बघता सकाळ होते मनातील साचलेलं सर्व मळभ मोकळं होत..आता तो सांगणार झालं गेलं विसरून जाऊ आता परत एकत्र येऊ...तितक्यात नियती परत आपला खेळ दाखवते....तिचा "तो"(सध्याचा पती) परत दरवाजाजवळ तिला काळजी पोटी घ्यायला आलेला असतो. तो ते ओळखतो गळ्यातले शब्द विरतात...डोळ्यातील अश्रू डोळ्यात थिजून जातात...ती जायला निघते आणि परत येते...पहिल्या वेळी घरातून  सांगून न जाणारी "ती" आता मात्र त्याची जाण्यासाठी इजाजत घेते... तो ही दोलायमान झालेला असतांनाही तिला...सुखी रहा.. खुश रहा... खूप चांगला पती भेटलाय तुला..झालं तर मला माफ कर अस  सांगतो आणि ती चरणस्पर्श करते...डोळ्यात अश्रू असतात तेवढ्यात तिचा पती पहातो....आणि विचारतो कोण आहे नातेवाईक की ओळखीतला..... आणि तोच विचारतो...."महेंद्र".ती मानेने होकार देते......आणि आपल्याही हृदयात कालवाकालव होते डोळे पाणावतात.... एक अप्रतिम कलाकृती  .



                                                            संजय ग. मराठे

                                                             9421973888

                                                             (वेल्हाणे, धुळे)

                                                              उल्हासनगर 4

7 comments:

  1. सर्व कलाकार अभिनयाची जणू शाळा. त्या मुळे हा चित्रपट बघताना, आपणच आहोत तिथे, असेच वाटते. खूपच छान वर्णन केले आहे सर, तुमचे पण लिखाण अप्रतिम. असेच लिहित रहा, आम्ही तुमच्या लेखनाच्या प्रेमात पडलोय.

    ReplyDelete
  2. छानच लिहिताय सर...

    ReplyDelete
  3. सर, खूप छान लेखन केले आहे.तुम्हिसुध्दा एक उत्तम कलाकृती निर्माण करू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.

    ReplyDelete
  4. ब्लागवर छान माहिती आहे 🙏👍

    ReplyDelete
  5. सर छान लेख लिहिला आहे 👌👌

    ReplyDelete
  6. संजू...खुप छान लेखन केले.

    ReplyDelete

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...