विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती
गीतकार :- अरविंद जगताप
हिंदीतले नामवंत कवी दुष्यंतकुमार यांचा एक शेर आहे,
मैं जिसे ओढ़ता-बिछाता हूँ
वो ग़ज़ल आपको सुनाता हूँ
कलाकृतीच्या माध्यमातून जीवनाचे विविध कंगोरे वाचक, श्रोते, प्रेक्षकांना दाखवताना ’मला खूप काही कळलंय’ ही वृत्ती बाजूला ठेवावी लागते. मला सापडलेल्या एका पायवाटेवर कदाचित मी दोन पावले पुढे आलो आहे म्हणून मागून येणा-यांना या मार्गातले खाचखळगे माझ्या पध्दतीने समजावून सांगतो आहे, हा एकच भाव शेवटी महत्त्वाचा ठरतो. अर्थातच सगळ्या सुविचारांप्रमाणे हा ही बोलायला सोपा आणि आचरणात आणायला अवघड. खूप कमी कलाकारांना अभिनिवेष विसरून सातत्याने ’जगणं’ लिहायला जमतं, त्यातलचं एक ठळक नाव म्हणजे ’अरविंद जगताप’. अरविंदचं कुठलंही लेखन थेट काळजाला भिडतं, आपलं वाटतं याचं माझ्यामते एकमेव कारण म्हणजे तो जे जगतो तेच लिहितो आणि जे लिहितो ते जगत राहतो. त्याची गाणी आपल्याला ’लाईक,लव्ह,हिट्स’ च्या पल्याड घेऊन जातात त्यापैकी हे एक गाणं.
जगन्याच्या वारीत मिळेना वाट,
साचले मोहाचे धुके घनदाट
आपली माणसं, आपलीच नाती
तरी कळपाची मेंढरास भिती
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती
कुठल्याही गाण्याची सुरुवात कशी होते यावरही बरेचदा त्याचं यशापयश अवलंबून असावं. ’जगन्याच्या वारीत मिळेना वाट’ ही ओळ सरळ सरळ प्रत्येक मराठी मनाचा ताबा घेते. भारंभार प्रतिकांच्या ओझ्याने वाकलेली अनेक सालंकृत गाणी आपण ऐकतो, वाचतो. वरकरणी देखण्या दिसणा-या या गाण्यांमधे आत्मा हरवलेला दिसतो. अरविंद प्रतिकांच्या मोहात कधीच ’म्हणणं’ हरवू देत नाही हे विशेष. आयुष्याच्या वारीतला विठ्ठल म्हणजे ध्येय, स्वप्न, उद्दिष्टं, ध्यास, आदर्श. त्याची अशी कितीतरी मनोहारी रुपे आपण डोळ्यांत साठवून चालत असतो. अशावेळी जेव्हा आपल्याबरोबर चालणारा एक वारकरी ’वाट मिळेना’ म्हणतो तेव्हा अठरा पगड जातीच्या करोडो हळव्या जनांचा ठोका चुकतो. ही वाट का मिळत नाहीये हे सांगताना अरविंद ’साचले’ मोहाचे धुके घनदाट असं लिहितो तेव्हा स्तिमित व्हायला होतं. धुकं म्हणा किंवा अगदी मोहाचं धुकंही म्हणा, हे तसं मराठी गीतलेखनात नवीन नाही पण धुके ’साचणे’ ही कमाल आहे. जवळपास सगळ्यांनी धुके ’दाटले’ लिहिले असते पण ’साचले’ लिहून अरविंदने त्याची छटा इतकी गडद केली आहे की मुलायम धुक्याची दलदल झाल्यासारखी वाटते. गाणं भिडण्याची ही बारीक सारीक कारणे आपल्याला लवकर लक्षात येत नाहीत. हे गाणं, हे ’गा-हाणं’ अगदी आतून आलेलं आहे त्याचा हा आणखी एक पुरावा.
आपला जिवलग असो, डॉक्टर असो किंवा देव, गा-हाणं मांडताना आधी काय दुखतंय हे सांगावं लागतं आणि ते ही थोडक्यात! ’आपली माणसं, आपलीच नाती..तरी कळपाची मेंढरास भीती’ या एका ओळीत जन्माचा सल मांडून अरविंद कळीचा सवाल टाकतो आता सांग, ’विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?’
आजवर ज्यांची वाहिली पालखी
भलताच त्यांचा देव होता
पुरे झाली आता उगा माथेफोडी
दगडात माझा जीव होता
उजळावा दिवा म्हणुनीया
किती मुक्या बिचा-या वाती जळती
वैरी कोण आहे इथे कोण साथी
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती
डोळ्यांदेखत आदर्श ढासळण्यासारखं दु:ख नाही. आपण ज्याची तत्वं स्वीकारतो, काळजावर गोंदून घेतो त्याची तत्वं काही वेगळीच, नव्हे भलतीच होती हे जेव्हा कळतं अवघं अस्तित्व सोलून काढावसं वाटतं.
वल्कलांनीही सुटेना प्रश्न आता
सावली फेडून व्हावे नग्न आता
जगणं व्यर्थ आहे, नश्वर आहे, हे आपण अनेकदा वाचलेलं असतं पण अनेकांसारखं लिहिल ती अरविंदची लेखणी कसली!
बुजगावण्यागत व्यर्थ हे जगनं
उभ्या उभ्या संपून जाई
खळं रितं रितं माझं
बघुनी उमगलं
कुंपन हिथं शेत खाई
राजकीय पार्श्वभूमीचा सिनेमा, पिढ्यानुपिढ्या कार्यकर्त्यांचा होत असलेला वापर एका ’बुजगावणं’ या शब्दाने ठळक होतं. त्याचवेळी ते बारा बलुतेदारांपासून नोकरदारांपर्यंत सगळ्यांनाही लागू होतं. प्राणांतिक टाहोला प्रामाणिक वेदनेची जोड नसली की तो आक्रस्ताळेपणा होतो. दु:ख आहे,शब्दसंपदा आहे म्हणून उठसूठ थयथयाट करून चालत नाही. अरविंदचं लेखन पसरट नाही म्हणूनच त्याच्या तोंडी टोकदार सवाल शोभतात. अशाच काही लेखण्यांना प्रत्यक्ष विठ्ठलासमोर त्याच्याच विश्वातली विसंगती मांडून जाब मागायचा अधिकार प्राप्त होतो.
भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरी
झेंडे येगळे, येगळ्या जाती
सत्तेचीच भक्ती, सत्तेचीच प्रीती
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ??
’झेंडा’ हा दिग्दर्शक म्हणून अवधूत गुप्तेचा पहिला सिनेमा. अवधूत संगीतकार, गायक तर आहेच पण त्याने अनेक उत्तम गाणीही लिहिलेली आहेत. तसं असूनही कुठलं गाणं कधी कुणाला लिहायला द्यायचं हे त्याला अचूक कळतं हे मी माझ्या अनुभवावरून खात्रीने सांगू शकतो. स्वत: लिहायच्या किंवा गायच्या मोहक धुक्यात न अडकता अवधूतने हे गाणं अरविंदला लिहायला सांगितलं आणि ज्ञानेश्वर मेश्राम या नवीन गायकाकडून गाऊन घेतलं. कलेवर निस्सीम प्रेम करणारी अशी माणसं एकत्र येतात तेव्हाच अशा कालातीत कलाकृती तयार होत असाव्यात.
’मला ते मीटर वगैरे येत नाही रे वैभव आणि ते अमुक एक वेळेत, अमक्या चालीवर शब्द लिहिणंही जमत नाही’ अरविंद काल हसत फोनवर म्हणाला. ना का येईना रे, तू तुझा कल्लोळ मांडत राहा, बाकीचं संगीतकार बघून घेतील आणि तुझ्या ओळींचे सुविचार होत राहतील. शेवटी ’डेड’लाईनची गाणी लिहिणं वेगळं आणि ’हेड’लाईनची गाणी लिहिणं वेगळं मित्रा!
सुरेश भट म्हणाले होते तसं
जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती
सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती
’विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?’ काय लिहिलंयस यार!!!
:- वैभव जोशी
फेसबुक साभार
No comments:
Post a Comment