बदली

Wednesday, 14 October 2020

गीताई

 गीताई


          आज पुन्हा रागाला पारावार राहिला नाही.रोज रोज बोलवायला पाठवायचं म्हणजे काय? आपण आपले रोज निशीचे काम सोडून मुलांना बोलवायला जायचं ! मुलांची प्रार्थना घेऊन मी पाड्यावरचा रस्ता धरला.डोक्यात असंख्य विचारांच्या मुंग्या वारूळ करत होत्या.मी पावलं झप झप टाकतंच गावची चढण चढत होतो.मागून कोणी आवाज दिला ते विचारांच्या काहूरानं कळलंच नाही. "ओ गुरुजी"असा आवाज कानात पडला.मी मागे वळून पाहिलं चिंत्या दादा आवाज देत होता. मी जरा घाईत असल्यामुळे चालतच 'बोला' म्हणत पुढचं पाऊल टाकत होतो.परत आवाज आला "आवो जरा दम धरा की" मनात नसताना मला पावलांचा वेग कमी करावा लागला. अनवाणी चालत ,अंगावर मळकी बंडी घातलेली ,डोक्यावर फाटका रुमाल गुंडाळून,एका हातात लांब बांबूची काठी,दुसऱ्या हातात शेवग्याच्या शेंगा घेऊन चिंत्या दादा माझ्या जवळ येत म्हणाला."अवो भाजीला घेऊन जावा ही चार दोन शेंगा". मी म्हणालो "वाडीतून येताना घेऊन जाईल ओटीवर ठेवा " क्षणाचा विलंब न करता त्यांनी कुठलीशी वेल तोडली आणि शेंगाचा एक गठ्ठा केला."अवो तुम्ही येईतोर ओटीवर कोण ठेवणार आहे होय? धरा हातात काय भारा नाही देत डोक्यावर" अस म्हणून त्यांनी त्या शेंगा हातात दिल्या.आणि पायवाटेच्या रस्त्यानं ते निघून गेले.
             मनात परत विचारांची कालवाकालव सुरू झाली.आज तरी गीता घरी सापडली पाहिजे. नाहीतर काल सारखं एवढ्या लांब येऊन फेरी फुकट जायची.काल तिची आई बोलली होती उदया पाठवेल मग रोजंच असं का फसवा फसवी करत असेल....विचारांची दिशा गीताचा शोध घेऊ लागली.पावलं ओळखीचा रस्ता झपाझप चालू लागली.चढण वरून आता ओढ्याच्या उताराच्या दिशेने पाण्याचा आवाज कानाला येऊ लागला.पाण्याच्या दिशेनं काही जनावरं येताना दिसली.पाठीमागून वासरं हुंदड्या मारत तर कधी गाईंच्या कासेत तोंड घालून चालत होती. पाठीमागे शिदाप्पा मोठी काठी घेऊन च्याक - च्याक आवाज करत चालत होता.मध्येच मोठ्याने आवाज देत "मास्तर खालच्या वाटेनं जाऊ नको मोठा भुजंग हाय" म्हणत उभा राहून आपला फाटलेला शर्ट काढला. खिशात हात घालून साबणाचा एक छोटा तुकडा काढला.काटेरी गवतातून वाट काढत ओढ्याच्या काळ्याशार दगडावर जाऊन बसला.मनाशी काहीबाही गुणगुणत शर्ट पाण्यात टाकला.साबणाने फाटलेला शर्ट धुवू लागला. "अरे ती देवल्याची पोर आहे का खोपात" मी विचारले.त्याने लगेच उत्तर दिले "कोण जा."
              पायातील चप्पल काढून हातात घेतली आणि ओढा पार केला.पलीकडे पाय सुकल्यावर चप्पल परत पायात घातली आणि वाडीवरच्या खोपांकडे चालू लागलो.हातात शेवग्याच्या शेंगांचा आता मला भार वाटत होता.सूर्य ही आता तापत होता. खिशातून रुमाल काढत मी घाम टिपला.आणि तोच रुमाल डोक्यावर ठेऊन चालू लागलो.आता वाडीची खोपट हाकेच्या अंतरावर होती.पाय झटकत कपडे झटकत चालू लागलो.डोक्यावरचा रुमाल काढून परत एकदा चेहऱ्यावरचा घाम टिपला.केस सावरले.
               गीताचा खोपटा जवळ येऊन आवाज दिला."गीता बाहेर ये".वाडीत या टायमाला निरव शांतता असते.सर्व कष्टकरी लोक असल्यामुळे आपआपल्या पोटासाठी सकाळीच घर सोडतात.गीताच्या घराबाहेरील कडुनिंबाच्या झाडावर कावळा मात्र काव काव करत ती शांतता भेदत होता. पुन्हा एकदा "गीता" असा आवाज दिला.तरी गीता बाहेर येत नव्हती. मग थोडं पुढं होऊन मी त्या खोपात वाकून पाहू लागलो.उन्हातून आल्यामुळे प्रथम मला खोपात काहीही दिसलं नाही.नजर स्थिर करत मी आत पहात होतो. काहीतरी हालचाल मला दिसली.नजर रोखून पाहिलं तर गीताचे लहान लहान दोन विवस्त्र भाऊ जमिनीवर टाकलेला भात खात होते.माशा घोंगावत होत्या.केस विस्कटलेले,पोटाचा घेर मोठा,हातापायाची काडं झालेली,नाकातून शेंबूड खाली सरकत,डोळे खोल,गालाची हाडं बाहेर आलेली,छातीचा पिंजरा झालेला अशा स्थितीत ती मुलं पाहिली.एखादी वीज कोसळून डोक्याचा भाग दूर कुठंतरी उडावा तसं काहीसं झालं. गीताला आवाज देत मी पुढे सरकलो.गीता मात्र अंथरुणाच्या वळचटीच्या मागे उभी राहून फक्त तोंड दाखवत उभी होती."बाहेर ये" असं मानेनच मी सांगितलं.गीता बाहेर खाली मान करून आली. मग ती बाहेर का येत नव्हती ते सर्व कळलं.तिच्या अंगावर तिच्या वडिलांचा फाटलेला शर्ट होता.स्थितप्रज्ञ अवस्थेत मी तसाच उभा राहिलो.असंख्य प्रश्न डोक्यात घोंगवू लागले. पण कोणत्याच प्रश्नाचं उत्तर मला सापडत नव्हतं.
              झाडाच्या सावलीत लाकडाच्या माचीवर बसत गीताला बोलतं करण्याचा प्रयत्न केला.गीता एक दोन शब्दात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत होती.गीताला शाळेचा गणवेश कुठं आहे असं विचारलं तेव्हा "बा घेऊन गेला"असं उत्तर मिळालं. "तुझ्या भावांना जमिनीवर भात टाकून का भरवते आहे" असं विचारले तेव्हा तीचं उत्तर ऐकूण मी माचीवरून खाली उभाच राहिलो.तिच्या दोन चार शब्दाच्या उत्तराने तिच्या कौटुंबिक दारिद्र्याची आणि वडिलांचा व्यसनाची कर्म कहानी समजली.
                गीताच्या वडिलांचं हे दुसरं लग्न.पहिली आई आणि तिची दोन मुलं हे जवळच्याच गावात राहतात.गीताची आई,गीता आणि दोन भाऊ हे आताच्या आहे त्या घरात राहतात.बाप व्यसनी दिवसभर पिऊन टाईट.पैसा नसल्यामुळे दारू पिण्यासाठी घरातील भांडी ही त्याला कमी पडतात.भांडी विकून नवीन कपडे विकून तो आपले व्यसन पूर्ण करतो.गीताचा नवा कोरा शाळेचा ड्रेस त्याने हातभट्टी वाल्याला दिला अस गीता सांगत होती. हे सर्व ऐकल्यावर गीताला विचारले "दुपारच्या जेवणाला काय आहे" ती निरुत्तर उभी होती."शाळेत येतेस"मी विचारले. तिने अंगावरील शर्टाकडे पहात मला जणू प्रश्न केला. "चल शाळेत तुला दुसरा ड्रेस देतो दुपारचं जेवण जेवू " हे ऐकल्यावर गीताच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. गीताने भावांच्या तोंडावर पाणी मारले.फाटलेल्या पॅन्ट, अर्धवट आणि एका बाजूने लोंबकळणारे बनियान घातले.खोपट उघडंच टाकून तिने एका भावाला कडेवर आणि एकाचा हात धरून शाळेच्या दिशेने वाटचाल सुरू केली.....कोण जाणे मला तिच्यात त्याही वयात दोन मुलांची आई दिसली.

संजय ग. मराठे
9421973888

13 comments:

  1. आपण किती नशीबवान आहोत याची प्रतीती होते, दारिद्र म्हणजे काय हे गावातच कळते

    ReplyDelete
  2. Vastav....Ashya mulan saathi nakkich madaticha hath aasava

    ReplyDelete
    Replies
    1. आदरणीय मॅडम आपल्या सहकार्यातून खूप मदत मिळत आहे.
      धन्यवाद...!!💐

      Delete
  3. हृदयस्पर्शी पण वास्तव....
    आजही बऱ्याच पाड्यांवर ही परिस्थिती आहे.
    खूप छान कथन.......

    ReplyDelete
  4. गीताची कथा जरी काल्पनिक असली तरीही ती कथा जर आपण तिची मेहनत आणि मेहनतीतुन मिळलेले यश अश्याप्रकारे पूर्ण केली तर गरीब होतकरूंना प्रेरणादायी असेल

    तुमचा विद्यार्थी
    दुर्गेश (साईगांव)

    ReplyDelete
  5. त्या वयात गीता ने स्वीकारलेली जबाबदारी, खरंच स्त्रीची रूपं आणि समजूतदारपणा याचं वास्तव आपण समोर आणलंत.

    ReplyDelete
  6. लेखन शैली अतिशय उत्तम

    ReplyDelete

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...