थोडसं
प्रिय दादा,
तुझं लिखाण हे हृदयाला अगदी पिळवटून टाकतं.त्यात जीव ओतून प्राण कंठात आणून भावनांची मांडणी असते..खूप खोलवरचं आहे हे सर्व...येऊ दे ते.कदाचित तुझ्या एवढा मी ही वास्तववादी मांडणी नाही करू शकत...कारण मी ही नागरिकरणाला काहीसा भुललो आहेचं...आयुष्यरुपी जिन्याच्या काही पायऱ्या चढताना कित्येकदा ठेचाळलो खरा....पण ते वास्तव लिहितांना त्याची मांडणी करतांना नाही धीर होत कधीचं ,याला तू माझं दुबळेपण म्हण हवं तर नाहीतर न्यूनगंड असावा माझा तो. "नातं" बाबत म्हणशील तर मला ही काही अनुभव आलेत....पण तुझ्या एवढं मी खरंच नाही लिहू शकत....
जन्म आणि मृत्यू यांच्यातील काळ म्हणजे जीवन असं आपण ढोबळ मानाने मानतो.पण त्या दोन शब्दांमधील अंतर पार करतांना कित्येकदा आपण गलितगात्र झालो...त्याला काय म्हणायचं नेमकं...मग आपण खरंच जगलो का ? असा प्रश्न निर्माण होतो...याचं उत्तर ही निर्दालयचं.
खरं तर माणुसकीचा दिपस्तंभच दुर्गातीच्या वाटेवर सोडलायं आपण... मनोविकार वाढताहेत जुलमी अजगरासारखे.हा कृतघ्न विस्तव आता आपलीचं राख करायला निघालायं...आणि आपण ही आता कोणताही प्रतिकार न करता त्याला बळी पडत जातोय...आपल्या शिदोरीतले अनुभव तरी आपले होते का? की तेही आभास होते...? खूप वेळा स्वप्नात दचकून उठतो आताशा.खूप सारं सुटलं....आहे तेही निसटत चाललं आहे...खोल खोल डोहाच्या गोल गोल भोवऱ्यात आत मध्ये ओढला जातोय...नाकातोंडात पाणी गेलंय... श्वास गुदमरून मी आयुष्याला पूर्णविराम दिलाय...असे भास होतायतं ...जगणं खरच एवढं अवघड होऊन बसले का रे?
असं सर्व सध्या उठल्या बसल्या होत असतं...प्राण एकवटून हे सर्व लिहायला बसतो तर भावना शब्दात उतरत नाही.सध्या त्या ही मेल्यात असं आपलेच माझ्या बाबतीत म्हणतात...मग खूप गोंधळ उडतो.त्यात मी नास्तिक मग काय...अजून श्वास गुदमरतो.... आपल्या अवती -भवती सारेच अस्तिकतेचा बाजार मांडणारे. त्यांचे व्रत,पुज्या,उपवास....मग काय आपण त्यांच्या लेखी नतद्रष्ट. खरं तर खूप घुसमट होत आहे....एकदाच पूर्ण विराम दयावा आयुष्याला असं कित्येकदा वाटतं... आणि परत कर्तव्याची आठवण येऊन काही काळ वाट पहावा ...कर्तव्य कर्तव्य म्हणजे तरी काय म्हणा आपल्याचं मनाचे खेळ .आपला एखादा माणूस शरीराने दूर झाला तर चालेल पण मनाने,विचाराने दूर झाला तर फार वाईट.त्यात एखाद्याच्या मनात एखादी वाईट गोष्ट घुसली की ती बाहेर निघण म्हणजे खूप मुश्किल...आणि तो काळ खूप अस्वस्थ करणारा असतो....कदाचित पूर्ण विरामाजवळ पोहचवणारा.वपु म्हणायचे "आपल्या विचारांची -भावनांची तीव्रता आपल्यालाच.ते मग पुष्कळदा खरे असोत,भ्रामक असोत वा दिशाभूल करणारे असोत. काही काळ ते विचार,त्या भावना तुमच्यावर हुकमत गाजवून जातात हेच खरं! म्हणूनच त्यातली उत्कटता ज्याची त्यालाच जाणवते,इतरांना नाही.माणूस तशा अर्थाने एकटाच..".आताशा ठरवलंय दुःखाशी गट्टी करून काही काळ मुक्काम वाढवून घ्यायचा आहे....स्वाभाविक-अस्वाभाविक,प्रयोजक-अप्रयोजक,निद्य-स्तुत्य हे सारे भेदभाव आता हृदयाच्या कप्प्यात ठेवून मुक्काम घेतोच काही काळ वाढवून...मग मोजत राहू आयुष्यनामक चढलेल्या जिन्याच्या एक एक पायऱ्या.... आणि कंठलेले सुख दुःखाचे क्षण....आणि समक्ष भेटू कुठल्याशा वळणावर....त्याचं वेल्हाळ स्वप्नाना घेऊन जे फक्त तुझे नि माझे होते....
तुझा
भाकऱ्या
खूपच सुरेख लेखन
ReplyDeleteधन्यवाद...!!
ReplyDeleteसर्वांची हीच मनाची परिस्थिती झालेली आहे.....करायचे तरी काय? खूपच वास्तविक लिखाण आहे. धन्यवाद....
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद.
Deleteव्वा.. व्वाह....आज प्रत्येक माणसाची हिच अवस्था झालेली आहे.. जगण्यासाठी प्रत्येकाची धडपड.... आणि जे जगले नाही ते खरं जगुन गेलेत का.. आणि जे आहेत ते तरी काही शिकलेय का.. फक्त निर्र्थक जगता आहेत...
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद.
Deleteनिःशब्द,प्रत्येकाच्याच मनात अशीच नि इतकीच अस्वस्थता आहे आणि जगण्याच्याच्या धडपडीत कोणालाही इतका खोल विचार करावा वाटत नाही इतकी अगतिकता ......
ReplyDelete